Saturday, March 14, 2020

समाज दर्पण

समाज दर्पण


पाहिला मी
स्वास घेणारा मुडदा.
ज्याचा फ्याक्चर 
झाला होता गुडघा.

तेव्हा
पहातच राहिलो
आश्र्चर्यचकित होवून
त्या स्वासाला.
जो चालू होता
कसाबसा.
रडत होता ढसाढसा.
दुसरीकडे जागा भेटत नव्हती,
म्हणून बसला होता
देहाची लत्करे पांघरूण.
स्वत्व विसरून
निव्वळ टाईमपास साठी.

तेव्हा विचार आला.
मनाला प्रश्न पडला.
विधात्यानं का बनविलं याला ?
तेव्हा
विधाताच
न राहावून बोलला,
हा प्रश्नच का पडला तुला?
तेव्हा निरूत्तर होवून बोललो.
थोडं समाजात विचारून सांगतो तुला...

डॉ प्रभाकर लोंढे
गोंदिया

Saturday, February 22, 2020

पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

            *डॉ प्रभाकर लोंढे*

आज मी खूप विवादाचा नसला तरी विविधांगी मतेमतांतरे असण्याची शक्यता असलेला महत्त्वाचा विषय हाताळण्याची हिम्मत करतो आहे. त्याला कोणीही भावनात्मक स्वरूपात न घेता वैचारिक दृष्टिकोनातून त्यावर विचारमंथन करावं. एवढीच आग्रही अपेक्षा.
          राजमाता अहिल्याबाई होळकर विचार, आचार, कर्तृत्व,  युद्ध, न्याय, समाजसेवा, जनकल्याणाकारी कार्य यासाठी जगात नावलौकिक असलेलं एक मोठं नाव. एका संस्थानाची महाराणी असली तरी वैश्विक नजरेने जगणारं व्यक्तिमत्व की ज्यामध्ये एक विशाल चरित्र दडलेलं आहे. नाव ऐकताच आदराने चरण झुकावं एवढं निष्कलंकित, सात्विक, संयमी, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेली विधवा स्त्री सलग २८ वर्ष राज्य करणाऱी ती एक महाराणी.  या कर्तव्यदक्ष राणीने जीवनभर जनसेवेला महत्त्वच नाही तर जीवनाचा एक भाग बनवून खाजगी जीवनातील दुःखाकडे  दुर्लक्ष करीत स्वत:ला प्रजेसाठी समर्पित केलं. *प्रजेच्या सुखात स्वतःचे सुख मानलं. याचाच परिणाम स्वरूप किंवा त्यामुळेच त्यांची प्रतिमा किंवा त्यांचं स्थान सामान्य माणसांच्या मनातील ईश्र्वर संकल्पनेपेक्षा कमी नव्हतंच.*
             एवढी समाजनिष्ठा जपत सामाजिक जगत असताना राजमाता अहिल्याबाईंच्या जिवनात त्यांच्या घराण्यातील जेष्ठांविषयी आदर व घराण्याच्या कुलदैवता विषयी श्रद्धेमध्ये कुठेही कमतरता दिसत नाही. त्यांच्या विषयी त्यांना प्रचंड आदर होता, ही विशेष बाब लक्षात येते. व ती अनेक पुराव्यांनिशी सिद्ध होते.
             इतिहासात लक्ष घातल्यास *विशेषत: होळकर व बहुतांश धनगर राजघराणे शिवपुजक असल्याचे दाखले मिळतात. "शिव" ही मुळात द्रविड देवता. यामध्ये शिवपिंड/शिवलिंग पुजा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच कदाचित होळकर घराणे शिवलिंग पुजनाला महत्त्व देत असावे‌. त्यांच्या पैकीच एक म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आपल्या जिवनात शिवलिंग पुजेला महत्त्वपुर्ण स्थान दिले होते. बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला.  त्यांच्या दैनंदिन जिवनात* शिवपिंड पुजनाशिवाय त्यांच्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नव्हती. एवढा अतुट संबंध राजमाता अहिल्याबाई होळकर व शिवपिंड यांचा होता.
               हे जरी खरं असलं तरी शिवभक्ती, *देवभक्ती व धार्मिक कार्याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक, आर्थिक,  राजकीय व सांस्कृतिक विकासाची उल्लेखनीय कामे त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तित्व बहुआयामी होतं हे सिद्ध होते.* तसेच आजच्या काळात सुध्दा त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्टीने सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.  म्हणूनच त्या *व्यक्तित्वाची मांडणी (project),  प्रदर्शन समाजासमोर तसेच भावी पिढ्यांच्या दृष्टीने करीत असताना किंवा त्यांची प्रतिमा साकारताना/ उभी करीत असताना तशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.*
          अहिल्याबाई होळकर आणि शिवपिंड हे समीकरण आज सर्वत्र परिचित झालेलं आहे. ही बाब धार्मिक दृष्ट्या अतिशय मार्मिक असून आम्ही द्रविड असल्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण पुरावा आहे. तशा प्रकारची त्यांच्या विषयीची धारणा समाजात निर्माण झालेली आहे. आज त्यांचा पुतळा बहूतेक ठिकाणी शिवपिंडधारी दिसून येतो. त्या संबंधाने कोणाचाही आक्षेप असू शकत नाही. माझा तर बिलकुल नाही. परंतु धनुर्विद्या घेण्यासाठी एकलव्यानी *द्रोणाचार्याचा जो पुतळा बनवला होता असं म्हणतात.  त्या पुतळ्यात त्याला त्याचा गुरु दिसत होता, गुरूकडून मिळणारी प्रेरणा, गुरूकडून मिळणारी विद्या, म्हणजेच त्या पुतळ्या मधून त्याला गुरूच्या जीवनातील सर्वच अंगांचे दर्शन घडत होतं. व त्या पुतळ्याला नजरेसमोर ठेवून एकलव्य उत्तम धनुर्धारी बनला.* तो त्या पुतळ्या पासून मिळालेल्या प्रेरणेचा परिणाम होता. असं जर असेल आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आमच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान मानत असू ,त्यांच्या व्यक्तित्वाला पाहून भावी पिढ्या घडवाव्या, त्यातून नवनिर्मित समाज हवा असेल, एक आदर्श नवनिर्मित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने आदर्श राजा किंवा राणी अपेक्षित असेल   तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा कसा असावा याचा विचार सर्वांनी करावा. त्यांच्या पिंडधारी पुतळ्यापासून कोणता बोध होणार आहे किंवा भावी पिढ्यांसाठी कोणती प्रेरणा अपेक्षित आहे याचा सुध्दा विचार व्हावा.
        *कोणी मान्य करो अथवा न करो हे सत्य आहे की, राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक असल्या तरी त्यांचा तो शिवपिंडधारी पुतळा त्यांच्या केवळ धार्मिक जीवनाला प्रदर्शित करीत असतो* . आणि वास्तविकता ही आहे की, *कोणताही व्यक्ती कितीही धार्मिक असला तरी आपल्या जीवनाचा कमीत कमी वेळ धर्मकार्यात घालवत असतो.* त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचे इतर कार्य त्यांच्या धार्मिक कार्यापेक्षा खूप मोठे व लोकाभिमुख तसेच अथांग सागरा सारखे आहे. त्या सर्व कार्याला प्रदर्शित करणारा व भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्या व्यक्तित्वातील सर्वगुणसंपन्नता प्रदर्शित करणारा पुतळा हाच अहिल्याबाई होळकरांच्या व्यक्ती व कृतीला सन्मान तसेच पूर्णत्व देऊ शकतो. भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. याचा अर्थ राजमाता अहिल्याबाई होळकरांचा शिवपिंडधारी पुतळा प्रेरक नाही असं होत नाही किंवा मला तसं म्हणायचं सुद्धा नाही. परंतु या पुतळ्याच्या माध्यमातून केवळ धर्मभावना, धार्मिक श्रद्धा, कृती याशिवाय दुसरा भाव निर्माण होत नाही. हे मात्र सार्वजनिक स्तरावर प्रकर्षाने सांगितल्याशिवाय राहणार नाही.
          संपूर्ण होळकर घराणे व स्वतः अहिल्याबाई होळकर शिवपूजक असले तरी त्यांनी लढाया किंवा रणांगणात उतरण्याची हिम्मत तलवारीचे भरोश्यावर, तिच्यावर विश्वास ठेवून केलेली आहे.  त्यामुळे *रनांगणावर लढणारी तलवारधारी अहिल्याबाई होळकर, समाजात दानधर्म करणारी दानशूर अहिल्याबाई होळकर प्रतिमा/पुतळा, नीती व कायद्याच्या चौकटीत न्यायदान करणारी अहिल्याबाई होळकर, बलाढ्य संस्थानाची राजगादी सांभाळणारी सिंहासनाधिष्ठीत अहिल्याबाई होळकर, लोककल्याणासाठी दक्ष व प्रत्यक्ष काम करणारी अहिल्याबाई होळकर,  पर्यावरणाकडे लक्ष देणारी अहिल्याबाई होळकर,  नर्मदा तीरी बसून मासे व प्राणीमात्रांना अन्न टाकणारी अहिल्याबाई होळकर* अशी त्यांचे विविधांगी सत्यरूपे प्रदर्शित करणारी प्रतिमा/ पुतळे सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
       एखाद्या कर्तबगार पुरुषाचा किंवा स्त्रीचा पुतळा कसा असावा ? हा मोठाच प्रश्न असला तरी पुतळा नेहमी त्या *व्यक्तित्वाचा निदर्शक असावा, त्यातून तो भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करणारा असावा, काही नव्हे तर एक विशिष्ट समाजोपयोगी संदेश पोहोचविणारा असावा.*
              झाशीची राणी लक्ष्मीबाई (पेशव्यांची भाची) च्या हातात ढाल तलवार, पाठीवर लेकरू(वारस) घेऊन घोड्यावर स्वार असलेली प्रतिमा व पुतळा आज सार्वत्रिक दिसून येतो. तो पुतळा किंवा प्रतिमा पाहून मनात शूर वीर भाव जागृत होतो. त्या सातत्याने लढत होत्या असा विचार डोक्यात येतो. (काही विचारप्रवाह त्यांच्या लढण्यावर आक्षेप घेऊन त्या लढल्याच नाही, त्यांच्या नावाने झलकारीबाई लढण्याचा पुरावा देतात) पुतळ्या मधून पराक्रमाच्या छटा अलगत झलकतात. त्यांचा पुतळा पाहून भावी पिढ्यांच्या भल्यासाठी त्या ढाल तलवार घेऊन लढल्या, असा संदेश तो पुतळा देतो, त्यापासून मिळणारी प्रेरणा लढण्याची उर्मी निर्माण करतो. पेशवे तर गणपती भक्त धार्मिक प्रवृत्तीचे होते परंतु कुठल्याही पेशव्याची प्रतिमा त्यांच्या धार्मिक भावना प्रदर्शित करणारी सार्वजनिक स्तरावर दिसत नाही.
         रयतेचा राजा शिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांनी शिवरायांला घडवले ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ते त्यांच्या संस्कारात वाढले हे सुद्धा सत्य. त्यामुळेच कदाचित बालशिवाजीला धडे देत जिजाऊंना दाखवले जाते. अलीकडे तर जिजाऊंच्या हातात तलवार दिसायला लागली आहे. तेव्हा मला प्रश्न पडतोय की त्यांच्या हातात तुळजाभवानी किंवा रेणुका मातेची भक्ती करताना जिजाबाईंना का दाखवले जात नाही.
          असो कोणाची प्रतिमा कशी बनवायची हा इतिहासाचा व अभ्यासकांचा  बनविण्याचा भाग असला तरी *भावी पिढ्यांना प्रेरक व सर्व गुण संपन्नता प्रदर्शित करणारा प्रत्येक पुतळा असावा असं मला वाटते.  अहिल्याबाई होळकर यांच्या हातातील पिंडधारी पुतळा यापुढे अहिल्याबाई होळकर यांना मर्यादित करणार नाही. एवढीच अपेक्षा!*


(या संबंधाने काही सूचना मतमतांतरे असल्यास कृपया ९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद मात्र नक्कीच करावा.)
 ________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचा अभ्यासक*
      *डॉ प्रभाकर लोंढे*
             गोंदिया चंद्रपूर

Thursday, January 16, 2020

राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.     
     

              *डॉ प्रभाकर लोंढे*

   अहिल्याबाई होळकर नावाचं व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर अथांग सागरा सारखं आहे. त्यामुळे या उदात्त व्यक्तीमत्वाला वैश्विक दृष्टिकोनातून, उदात्त नजरेतून जगासमोर मांडणे भावी पिढ्यांच्या दृष्टीने व जागतिक पातळीवर एक आदर्श निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काही लोकांना या संबंधाने कदाचित प्रश्न निर्माण होतील की हा माणूस असं का लिहीत आहे?  परंतु  आजच्या परिस्थितीमध्ये या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष, विशिष्ट नजरेतून या व्यक्तीमत्वाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो आहे, हा खरंच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.  *एकीकडे "राईचे पर्वत" बनत असताना पर्वताचं (अहिल्याबाईंचा व्यक्तित्व) खच्चीकरण होवू नये हाच या लेखाचा उद्देश आहे.*
                  सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक या सर्वच अंगाने त्या व्यक्तिमत्वाने सर्वकालिक काम केले आहे,की ज्याला इतिहासात तोड नाही. असे असतानाच त्या व्यक्तिमत्त्वाची केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडणे, केवळ धार्मिक झालर चढवून एक देवी स्वरूपात तिची वैश्विक प्रतिमा निर्माण करणे,  ही बाब तिच्या ऐतिहासिक सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वावर फार मोठा अन्याय व भविष्याच्या दृष्टीने एक वैचारिक पोकळी निर्माण करणारी आहे.
           एखाद्या अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा, सर्वत्र किनाराच म्हटला जात असला तरी प्रत्येक किनाऱ्याचं वैशिष्ट्य, वेगळेपण व महत्त्व अलग असतं. त्यामुळे समुद्राचं वर्णन करताना किंवा त्यासंबंधीची महती गातांना केवळ एका किनाऱ्यावरून समुद्राची किंवा किनारपट्टीची विशालता स्पष्ट करणं शक्य नसतं. त्याप्रमाणेच राजमाता अहिल्याबाई होळकर *या अठ्ठाविस वर्षे राज्य करणाऱ्या रणरागिणी, लोककल्याणकारी, आदर्श महाराणी, पुरोगामी व्यक्तित्वाच्या केवळ धार्मिक अंगाला प्रदर्शित केल्याने संपूर्ण व्यक्तीत्वाचा परिचय होणार नाही. कोणत्याही व्यक्तीचं केवळ धार्मिक जीवन म्हणजे संपूर्ण जीवन नसतं. कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक संकल्पना, धार्मिक विचार आचार हा त्या व्यक्तित्वाचा एक भाग असतो. परंतु त्याला संपूर्ण जीवन म्हणणे अतिशय चुकीचं आहे.* असे जर होत असेल किंवा केले जात असेल तर त्या व्यक्तित्वाला मर्यादित करण्यासारखे आहे. आणि असा तो अधिकार आज कोणालाही नाही.
        साधारणतः कोणताही व्यक्ती जीवनातील जास्तीत जास्त  १० % (खूप झाले) वेळ काळ धार्मिक कार्यामध्ये देत असतो.  याचा अर्थ उरलेला काळ तो इतर समाजकार्य किवा स्वतःसाठी जगत असतो. अहिल्याबाई होळकर एक महापराक्रमी कर्तबगार महाराणी होत्या. *त्यांनी त्यांच्या 28 वर्षाच्या राजकीय काळात या देशाच्या पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण चहू दिशेला केलेले विकास कार्य आजही त्यांच्या व्यक्तित्वाचा, राजकीय कारकीर्दीचा, विकास कार्याचा, त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, लोककल्याणकारी दृष्टिकोन, धार्मिक सहिष्णुता व वैचारिक प्रगल्भतेचा परिचय करून देतात.*
         असे असताना सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडल्याने त्यांच व्यक्तित्व आज हिमखंडा सारखं वाटायला लागलं आहे. त्यांची केवळ धार्मिक बाब प्रकाशात आणल्याने त्यांचे इतर महाकाय लोककल्याणकारी, समाज हितवादी जनकल्याणार्थ कार्य व भूमिका हे अदृश्य झाल्यासारखे वाटायला लागले आहे. 
          ज्याप्रमाणे हिमखंडाचा फार कमी भाग हा पाण्याच्या वर दृश्य स्वरूपात असतो आणि त्यापेक्षा बराच मोठा भाग पाण्यात व्यापलेला असतो, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई होळकरांचे कार्यकर्तृत्व केवळ धार्मिक बाबतीत दृश्य स्वरूपात दाखवले जात असून इतर कार्याला फारसा उजाळा दिला जात नाही. असं का होतं?? हा प्रश्न असला तरी  स्त्रीशक्ती व बहूजन समाजासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे.
           *होळकर संस्थानात २८ वर्षे राज्य करणाऱी एक महाराणी म्हणून जगाच्या पाठीवर जिने कार्यकाळ गाजवला. अनेक विकृतांना त्यांची जागा दाखवली. स्वतःच्या जगण्यातून जगाच्या पाठीवर दीपस्तंभासारखा आदर्श निर्माण केला. स्वतःच्या खाजगी जीवनातील समस्यांची शृंखला संपत नसताना त्याचा परिणाम कधीच जनमानसावर होऊ दिला नाही. लोककल्याणावर होऊ दिला नाही. सर्वत्र मानव, पशु पक्षी, जीव सुखी समाधानी राहतील, याचा सातत्याने प्रयत्न केला. हा प्रयत्न लोककल्याणकारी भूमिकेतून करीत असताना त्यांच्या कार्याला जगाच्या पाठीवर कुठेच तोड नाही.*
   ‌      परंतु या कार्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्याविषयी केवळ धार्मिक स्त्री, पूजा पाठ करणारी स्त्री, व्रत वैकल्य, कर्मकांडा मध्ये गुंतून राहणारी स्त्री, दानधर्म करणारी स्त्री, याच्याही पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्व देवी स्वरूपामध्ये सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. भारतीय समाजातील मानसिकतेला अनुसरून कदाचित काहींना हे अतिशय चांगलं वाटत असेल, काही लोक त्यांना देवी स्वरूपातच स्विकारायला उत्सुक असतील. यावर माझी काय कोणाचीही काहीही हरकत नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो माझ्या तुमच्या अपेक्षांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करण्यामध्ये का व्हावा?
             *माझ्या तुमच्या अपेक्षांमुळे त्यांच्या व्यक्तित्वावर पडणारा प्रकाश का मर्यादित व्हावा? आमच्या लेखणी वाणी, कृती केवळ त्यांच्या धार्मिक जीवना संबंधाने का अग्रेसर व्हाव्यात? त्यांच व्यक्तित्व राशिभविष्य, कर्मकांड पोथ्या पुराण, धार्मिक पारायण यामध्येच आम्ही का आडकवावं?*

 *आमच्या लेखणी त्यांच्या युद्ध, युद्ध कौशल्य, त्यांचे विजय, तलवारबाजी, अस्सल पुरोगामित्व, नीतिमत्ता, न्यायदान, परधर्म सहिष्णुता, शत्रूला दम व सन्मानजनक वागणूक सुद्धा,  गुंडांचा बंदोबस्त, अनिष्ट प्रथा-रूढींचा विरोध, प्राणिमात्रांवर दयाभाव, पर्यावरण रक्षण, लोक कल्याणकारी राज्य, रोजगार हमी योजना, साहित्य व सांस्कृतिक प्रेम, व्यापाराला प्राधान्य, जनकल्याणासाठी खाजगी संपत्तीचा वापर करण्याची वृत्ती.*

या *गोष्टींना आम्ही का उजाळा देत नाही??? का आमच्या लेखनी अंगाने चालत नाही ?? आमची वाणी यादृष्टीने का व्यक्त होत नाही??  त्यांची स्मारक तयार करतांना आम्ही या गोष्टींना का प्राधान्य देत नाही???*

शेवटी एकच विनंती करावीशी वाटते,
 *उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा कृपया हिमखंड मात्र बनवू नका....*

__________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Tuesday, January 7, 2020

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.
 
डॉ प्रभाकर लोंढे.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली."

         धनगर जमातीच्या राजकीय नेतृत्वाची दुरावस्था आज सार्वत्रिक तसेच सर्वमान्य झालेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका धनगर जमातीने अनुभवलेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका धनगर जमातीच्या हातात आहे. जमातीला  सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थावर अधिराज्य निर्माण होणे तसेच जमातीने भावी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका धनगर जमातीसाठी एक संधी स्वरूपात आहेत.
          लोकसभेतील तसेच विधानसभेतील धनगर उमेदवारांचा दारुन झालेला पराभव, निवडून आलेला एकमेव आमदार हा धनगरांचा विजय म्हणावं की पराभव?????  हा प्रश्र्नच असतांना कोट्यावधी धनगरांचा सार्वत्रिक पराभवच झाला आहे असं प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे व तो पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलाच पाहिजे. तरच यापुढे धनगर राजकीय अस्मिता पुनर्जीवित करणे शक्य आहे.
                धनगर राजकीय अस्मितेची वारंवार लाजिरवाणी पडझड सुरू असतांनाच, महाराष्ट्रातील धनगर "संवेदनाशून्य धनगर" आहे, असं म्हणणं चुकीचं ठरलंच पाहिजे. त्यासाठी जिथे कुठे संवेदना शुन्य धनगर लक्षात येईल तेथे सामाजिक संवेदना जागवायला कोणाची हरकत नसावी. तसा प्रयत्न प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अशा प्रयत्नांचा सार्वजनिक व मिशन स्वरूपात प्रत्येकाने स्विकार केलाच पाहिजे.  राजकीय सत्ता किती महत्त्वाची आहे, हे अलीकडेच महाराष्ट्रातील पार पडलेल्या प्रस्थापितांच्या (प्रस्थापित पक्षांच्या) राजकीय नाट्यावरून लक्षात येईल. सत्तेच्या भरोश्यावर जीवनभर केलेली पापं कसे धुता येते.  याचे प्रमाण/ सबुत गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पहायला मिळते. तेव्हा सत्तेचे महत्त्व धनगरांनी समजून घेवूनच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे.
           सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे. किंवा येणाऱ्या भावि काळात लवकरच त्या होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय समजले जाते. यामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर छोट्या का होईना सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सत्तेचा फायदा जमातीला होवू शकतो. भावी काळात निर्माण झालेले जिल्हा परिषद मधील धनगर  नेतृत्वाच्या जाळ्याच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पैकीच काही विधानभवनात आमदार, संसदेत खासदार  म्हणून नक्कीच पाठविता येतील.
     उभरत्या धनगर नेतृत्त्वाला परस्पर सहकार्याने आपला स्वत:चा तसेच जमातीचा राजकीय विकास करता येईल. राजकीय सत्तेपासून वंचित असलेली, हेतूपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या गेलेली धनगर जमात राजकीय प्रवाहात येईल. दिवसेंदिवस जमातीची चाललेली राजकीय परवड, पडझड थांबविता येईल. तुमच्या छोट्याच्या प्रयत्नातून धनगर राजकीय अस्मितेचे पुनर्जागरण झाल्याशिवाय राहणार नाही.
               म्हणून धनगर असाल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनगर उमेदवार दिसेल तिथे, त्यालाच मतदान केल्या शिवाय राहू नका. "विसरून सारे भेद- धनगर सारा एक" या म्हणीप्रमाणे एक जीवाने संघटित होऊन तन-मन-धनाने मतदान करून सर्वांना प्रोत्साहित करून भावी धनगर नेतृत्वाचे पाय मजबूत करा....
वैचारिक मतभेद का असेना रक्ताचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवा.  जिल्हा परिषद,पंचायत समितीतून, ग्रामपंचायत मधून धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि राजकीय अस्मितेचे पुनर्भरण करा.
    त्यावेळी लक्षात ठेवा!!! मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पासूनच होत असते. थेंबा थेंबाने तळे साचत असते. शतकांपासून गमावलेली राजकीय अस्मिता पुनर्जीवित करण्यासाठी कदाचित पुढील शतक सुद्धा लागण्याची शक्यता असेल.  परंतु या कार्याची सुरुवात करणारे तुम्हीच असाल. म्हणून जगायचं तर स्वतःसाठी!! स्वतःच्या माणसांसाठी!! स्वतःच्या राजकीय अस्मितेसाठी!! स्वतःच्या भावी पिढ्यांच्या सुंदर जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवस्था परिवर्तनासाठी!!! 
    उठा!! जागे व्हा!! जागवा आणि मतदान करा!! आपल्यासाठी!! आपल्याच माणसांना!! आपल्या सर्वांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!
,
खूप खूप शुभेच्छा!!!

अरे!
उष:काल होता होता,काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......

___________________________&__
जय यशवंतराव !! जय मल्हार

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, December 2, 2019

महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.

🇮🇳🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🇮🇳
महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.
                      *डॉ प्रभाकर लोंढे*

           थोर राष्ट्रभक्त महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज जन्मदिवस! जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तित्व, कर्तुत्व, विचार, राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाला सलाम करतो आणि या समाजव्यवस्थेतील पारंपारिक अप्रत्यक्ष जातीयवादी व्यवस्थेमध्ये जगत असताना थोर पराक्रमी यशवंतराव होळकर यांची जातीनिरपेक्ष खरी ओळख समजून घ्यावी ही विनंती करतो.

 *महाराजा यशवंतरावांचे श्रेष्ठत्व कशात आहे?*

              भारतीय इतिहासाला यशवंतराव नावाचं पान जोडला गेलं ते केवळ एक व्यक्ती म्हणून नाही किंवा एका राजवंशातील पुरुष म्हणून नाही तर विपरीत परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून स्वतःच्या राजवंशाचा नाश थांबविण्याचा व होळकरांचे बलाढ्य साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या गिधाडांना धडा शिकवून स्वतःच अस्तित्व कायम टिकविण्याचा, त्याही पेक्षा इंग्रजांचा धोका ओळखून राष्ट्रीय भावना जपण्याचा महाप्रलयकारी प्रयत्न *ज्या (दुर्दम्य आशावाद तसेच पराक्रमी) मनगटातून व स्वाभीमानी वृत्तीतून घडला तो म्हणजेच महाराज यशवंतराव होळकर.*

 *राजकीय परिस्थितीवर मात.*

    एकीकडे इंग्रजांच्या रुपाने भारतावरील संकट, पेशवाईचा (ब्राम्हण) उन्माद व मराठेशाहीचा (मराठे- शिंदे) अतिरेक झाला असताना होळकरशाहीची (धनगर) अस्मिता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न कदाचित हेतुपुरस्सरपणे या दोघांकडून (शिंदे व पेशवे) संगनमताने सुरू होता. थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या  मृत्युपासूनच यांची नियत फिरलेली होती. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी यांना जोरदार धडा शिकविला. त्यांच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्य सांभाळण्याचे कार्य तुकोजीराव होळकर यांनी केले. केवळ दोनच वर्षात *तुकोजीराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचे १) काशीराव, २) दुसरे मल्हारराव, ३) विठोजीराव व ४) यशवंतराव असे चार मुले होती.* परंतु त्यांना  दासीपुत्र, अनौरस संतती अशा नावाने हीनवण्याचा व होळकर वंशात भांडणे लागतील, या दृष्टीने वारंवार प्रयत्न केला जात होता. तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर वारसा संबंधाने होळकरशाही मध्ये हेतूपुरस्सर कलह माजवला गेला. त्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद या सर्वांचाच सहारा घेतला गेला, यातून पेटलेला संघर्ष इतका महाभयंकर होता की, *पेशव्याकडून शनिवारवाड्यावर विठोजी राजेंचा निर्दयपणे खून करण्यात आला. शिंदे यांच्या सैनिकाकडून झालेल्या अचानक हल्ल्यामध्ये मल्हारराव दुसरा मारला गेला.* दोन कर्तबगार भाऊ मारले गेले. सोबतच होळकर वंशातील स्त्रिया- मुलांना बंदिवासात टाकण्यात आले. *काशीराव पेशव्यांच्या गोटात जावून बसला होता.* आता आशा बाळगू शकेल असा फक्त यशवंतराव बाकी होता. होळकर राजवंशाची वाताहत झाली होती. त्यामागे एकच उद्देश होता हे स्पष्ट होते, *तो म्हणजे होळकरांचा (धनगरांचा) राजकीय वारसा समाप्त करणे.*
           एकूण प्रकरणांत होळकर राजवंशातील अस्थिरतेला खतपाणी घालण्याचे सातत्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न पेशव्यांनी व दौलतराव शिंदे कडून झाले. त्यांची संपूर्ण नजर होळकर साम्राज्याच्या समृद्धीवर होती. त्यांनी *दुबळ्या काशीरावाला हाताशी धरून होळकरांचे एक एक महाल ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. तोपर्यंत मालक पेशवे आपल्याला होळकर राजगादीचा वारस घोषित करतील या खोट्या आशावादात होळकर वंशज काशीराव जगत होता* . त्याच्या माध्यमातून होळकरांचे प्रदेश, महाल ताब्यात घेण्याचा सपाटा शिंद्यांनी लावला होता, ही बाब त्याच्या लक्षात आली नाही.
     या सर्व बाबींमुळे *होळकरशाही लयास जाते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना तो यशवंतरावांच्या स्वाभिमानाला डिवचत होता.* त्यातून महान पराक्रमी यशवंतराव होळकरशाहीचा तारणहार म्हणून पुढे आला. त्यानी आपली सुटका करून घेतली व स्वत:च सैन्य उभारलं. *होळकरांचे शिंद्यांनी ताब्यात घेतलेले प्रदेश मुक्त करण्याचा विडाच उचलला. पेशवे शिंद्यांची दानादान उडवत होळकरशाहीला पुनर्वेभव मिळवून देत भारतात राष्ट्रीय भावना सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला.* इंग्रज भारतात स्थिरावणार नाही, यासाठी *स्वातंत्र्य संग्राम उभारणारा प्रथम स्वातंत्र्ययोध्दा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहासात उल्लेख केला जातो.*

 *_यशवंतरावांचे असामान्यत्व._*

         यशवंतरावांनी पेंढाऱ्याचं सैन्य उभं केलं. एकट्याच्या भरोशावर आपल्या होळकर राजघराण्यातील प्रश्र्न सोडविले, *भारत इंग्रजांच्या तावडीत जाणार नाही याचा पूरेपूर प्रयत्न केला. इंग्रजांच्या फौजेची दाणादाण उडवली. त्यावेळी पेशवे व शिंदे यांनी यशवंतरावांचं ऐकलं असतं तर इंग्रजांच्या नावाने दीडशे वर्षाचा इतिहास या भारत भूमी मध्ये लिहिला गेला नसता.* सोबतच अख्या महाराष्ट्रावरच नाहीतर संपूर्ण भारतावर आपल्या न्यायिक राजसत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या होळकरशाहीचं पुनरुज्जीवन केलं. म्हणून  *महाराजा यशवंतराव होळकर खर्‍या अर्थाने राष्ट्रपुरुष ठरतात* . त्यांचा पराक्रम, दुरदृष्टी, राष्ट्रीय भावना यांना आज मी विनम्र अभिवादन करतो. तो काळ पेशवाईचा होता. होळकर ( धनगर) संस्थान सर्वाधिक समृद्ध होत. त्याचा नाश व्हावा. सर्व संपत्ती, प्रदेश आपल्या अधिपत्याखाली यावा. असे शिंदे आणि पेशव्यांना मनोमन व कृतीतून वाटत होतं. त्या *घाण विकृत मनोवृत्तीला धडा शिकवून इंग्रजांसारखे परकीय येथे नकोत अशी राष्ट्रीय भावना जपणारा एक राष्ट्रपुरूष म्हणून यशवंतरावांकडे भारतातील इतिहासकारांनी पहावं.* हीच आजच्या प्रसंगी अपेक्षा.....

 *जय यशवंतराव !!*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Sunday, November 24, 2019

एकूण राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे?

👁👁👁👁👁👁👁👁👁
राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे??*

               *डॉ प्रभाकर लोंढे*

            अख्खा महाराष्ट्र होरपळून निघत आहे, नाट्यमय घडामोडी घडत आहे. मात्र सत्ता कोणाची हे अजून निश्चित झालेलं नाही.  प्रत्येक चेहऱ्यावर, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच चर्चा,  प्रत्येकाच्या शब्दाचा आधार महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व राजपटावर कोण बसणार? किती काळ बसणार? कोणाची महत्त्वाची भूमिका असणाऱ? या चर्चेमध्ये गल्ली बोळात, घरातल्या घरात, वाड्या-वस्त्यांवर, शेतात, जनावरां मागे *होणाऱ्या चर्चेत कदाचित धनगर सुद्धा सहभागी असेल. की जो आज राजकीय बाबतीत प्रवाहापासून दूर फेकला गेला* आहे.  पण या सत्तेचा हक्कदार कोण ठरणार? हे मात्र धनगर सह बहुजनांच्या हातात काहीही दिसत नाही.
                   मागे पडला आरक्षणाचा प्रश्न, संपून गेला उमेदवारीचा प्रश्‍न, मागे पडला शेतकऱ्यांचा प्रश्र्न, मागे पडला याचा प्रश्र्न, मागे पडला त्याचा प्रश्न, *आता फक्त प्रश्र्न व चर्चा . पवार, फडणवीस, ठाकरे, -------- आणि सत्ता व राजपद ? पण या सर्वांच्यामध्ये कुठेही धनगर रक्ताचा माणूस दिसत नाही.*
           कोणी म्हणेल महाराष्ट्र बदलला. आता लोकशाही आहे. नकळत मान्य करावेच लागेल. मात्र *सरंजामी थाटात वागणारे घराणे आजही महाराष्ट्रात दिसून येत आहे.* तेही स्विकारावे लागेलच. पूर्वी *पेशवे, होळकर, शिंदे, पवार, भोसले यासोबतच पांढरे , देवकते, आणि अनेक मरहट्टी धनगर सरदार घराणे या महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपली महत्त्वाची भूमिका बजावत होते* . याठिकाणी त्याकाळी *धनगर सत्तेचे वाटेकरी होते,* एवढेच सांगायचे आहे.
                   तो काळ पेशवाईचा होता, पेशवे सर्वेसर्वा असले तरी महाराष्ट्रातील *पेशवाईच्या गादी पासून तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या राजगादीवर कोण बसेल? याचा निर्णय, तो राजकीय प्रश्न सोडवणे थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रभावात्मक अधिकार कक्षेत होता.*  यासंबंधाने सुभेदार मल्हारराव होळकरांचा निर्णय, शब्द व सल्ला शिरसावंद्य मानला जात होता.  त्यामुळे त्यांचा सल्ला हा त्यावेळच्या केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सत्ताकारणाला दिशा देऊ शकत होता. *एवढी ताकद व व्यवस्थेवर प्रभाव, तो तसा सन्मान सुभेदार मल्हारराव यांच्या शब्दाला होता.* हे मी कल्पनेवरून नाही तर त्यांच्या पराक्रमाचा परिणाम म्हणून लक्षात आलेल्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  हे आपल्याला मराठेशाहीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल, की येथील वारसा हक्काचे व राजगादीचे अनेक प्रश्न, किल्ल्यांवरील अधिकाराचे प्रश्न, सुभेदार मल्हाररावांनी सल्लामसलत करून, प्रसंगी बळाचा वापर करून सोडविण्याचे अनेक दाखले मल्हाररावांच्या विषयी इतिहासामध्ये दिसून येतात.
                        यावरून मला एवढेच लक्षात आणून द्यायचं आहे, की *तत्कालीन पेशवाईमध्ये होळकर व इतर सरदारांच्या माध्यमातून तत्कालीन धनगर हा दखलपात्र होता. त्याचा तेव्हा दरारा होता. त्याचा या व्यवस्थेवर प्रभाव होता. महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये धनगरांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.* या धनगर रक्ताला विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील निर्णय पूर्णत्वाकडे जात नव्हता. एवढा व्यवस्थेवर राज करणारा *धनगर आजच्या काळात पूर्णतः बेदखल कसा काय झाला ????* हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक वाचकांने करावा, हिच या लेखामागची अपेक्षा आहे.
         आजच्या एकूण राजकीय घडामोडी व सत्ताकारणात धनगर कुठेच दिसत नाही.  सत्य आहे की, काळ बदलतो, व्यवस्था बदलते पण बदलत्या परिस्थितीत स्वत:ला प्रवाहित ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. काळाबरोबर पेशवाई गेली. *आज लोकशाही (घराणेप्रधान) प्रस्थापित झाली.* सत्तापद बदलली पण पदावरील मक्तेदारी मात्र कायम आहे, असं म्हटल तर चूकीचे होणार नाही.  या महाराष्ट्रातील पेशवाई पासून येथे राज करणारे पेशवे (ब्राम्हण), मुळ पेशवाईत दुय्यम स्थान असणारे मराठे आज सत्तेच्या आखाड्यात प्रथम स्थानी दिसून येतात. *आज मराठे व ब्राम्हण हे दोन्ही आज सत्तेची सुत्रे हालवितांना दिसून येतात.* तेव्हा येथील इतिहास पाहिला तर *धनगर, मराठे व ब्राम्हण या तिन समुदायांनीच महाराष्ट्रातील इतिहास घडविला ही बाब लक्षात येते.*
             पाणीपत युध्दात मराठ्यांचा पराभव झाला, या पराभवाचं खापर फोडण्यापुरतेच मल्हारराव मराठ्यांच्या इतिहासात नव्हते. अरे *पेशवाईचा खडा न खडा मल्हाररावांच्या विश्वासाने सुरक्षित होता. पेशवाईच्या बेंबीच्या देठापासून मल्हारराव पेशवाईला जाणत होते.* कारण तिचा मुख्य आधारस्तंभच मल्हाररावच होते.
            परंतु ऐतिहासिक प्रभावशाली असलेला धनगर मात्र आज सत्तेच्या आखाड्यात कुठेच दिसत नाही. ही गंभीर बाब होळकरांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या धनगर व इतरांना विचार करायला लावणारी आहे.
 *सर्वांनी याचा विचार करावा. याची कारणं मिमांसा तपासून पहावी हिच या लेखाची पार्श्र्वभूमी....*


खूप खूप शुभेच्छा!!


 *एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश* .
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Thursday, November 21, 2019

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

                     डॉ प्रभाकर लोंढे

महाराष्ट्रातील धनगर जमात बहूसंख्य, ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न, तरीही वर्तमानात राजकीय दृष्ट्या ती इतकी अस्पृश्य का? हा प्रश्न प्रत्येकालाच पडणे सहाजिकच आहे.

           आपणा सर्वांना एक माहिती आहे की एखाद्याला नियंत्रणात ठेवण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्या अफाट ताकतीची जाणीव आहे, त्याच्या त्या ताकदीपुढे आपण टिकू शकणार नाही याची हमखास भिती आहे. तेव्हा समोरच्याला त्याच्या ताकदीची व त्याच्या अधिकाराची जाणीवच होणार नाही. यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरीकडे त्याला संधीच मिळणार नाही यासाठी हेतुपुरस्सर डावलण्याचे तसेच त्याची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. त्याच्या कमजोरी शोधून त्याबाबतीत त्याला पुन्हा कमजोर कसा करता येतील यावर जोर दिला जात असते, कारण त्यांना माहित असते की, हे शक्य झालं तरच आपण समोरच्याला नियंत्रणात ठेवून त्याचा आपल्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे वापर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर बैल या पाळीव प्राण्यांचं घेता येईल.

                मानवी विकास प्रक्रियेत त्याला बैलाची मिळालेली साथ समस्त मानव जात कधीच विसरू शकत नाही, परंतु त्याला नाकात व्यसन घातल्याशिवाय व त्याला निर्बीज केल्याशिवाय माणूस त्याच्या ताकतीचा वापर करण्याची हिंमत सुध्दा करू शकत नाही, हे माणसाला माहीत असल्यामुळेच माणूस स्वार्थापोटी बैलावर ही दोन अमानुष ( वेसन- नाकात दोरी घालणे व नपुसक करणे) कृत्य करीत असतो. तो बैल आपल्या नियंत्रणात (वेसन)राहिल  व त्याला त्याची क्षमता (नपुसक) सुद्धा वापरता येणार नाही. याची काळजी मानवाने घेतली. म्हणूनच पिढ्यानपिढ्या पासून मानवाची गुलामी  स्वीकारून बैल इमानेइतबारे मानवाच्या सेवेत रुजू आहे. एवढंच काय गुलामीची हद्द तेव्हा ओलांडली जेव्हा बैलाने नंदीबैल म्हणून माणसाच्या चरणी  संपूर्ण समर्पण केलं.
            यामध्ये त्या बैलावर अन्याय होत आहे हे जरी मानवाधिकारांच्या व प्राण्यांच्या हक्काच्या गोष्टी करणाऱ्या माणसाला मान्य असलं तरी त्याशिवाय बैलाच्या शक्तीचा वापर करण्याची लायकी आपल्यात नाही,  याची जाणीव/ भीती माणसाला वाटत असल्यामुळेच तो बैलांसाठी वेसनमुक्तीचा जाहीरनामा हा पशूप्रेमी माणूस कधीच प्रसिद्ध करणार नाही. बैलाच्या  नाकातील ती वेसन काढणार नाही. कारण मानवाने हे ओळखलं आहे की, त्यावरच यांच्या स्वामित्वाचं व बैलाच्या गुलामीचं सुत्र आधारलेलं आहे तसेच मानवी विकासाचं गुणसुत्र अवलंबून आहे.
   
        हे सर्व गुणसूत्र महाराष्ट्रातील आजच्या धनगर जमातीच्या बाबतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लागू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या भारतातील सर्वांगीण दृष्टीने सर्वाधिक बलवान जमात कोणती असेल तर धनगर जमात आहे, इतिहास,  समाज, संस्कृती, पराक्रम, धैर्य, मेहनत, व अत्यंत महत्त्वाची लोकाभिमुखता याबाबतीत परिपूर्ण असलेली महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील धनगर जमात येथील समाजव्यवस्थेच्या विकासाचा आधारभूत केंद्रबिंदू आहे. हे या धनगर जमातीचं प्रमुख बलस्थान आहे.
                या देशातील संपूर्ण इतिहास व ऐतिहासिक पराक्रम, राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे याच जमातीच्या सभोवताल फिरतात. ही या जमातीची प्रमुख वास्तविकता. ती त्यांची ताकद येथील विशिष्ट गैरधनगर लोकांनी ओळखलेली आहे. ही बाब धनगर जमातीच्या लक्षात येवू म्हणून ते या जमातीच्या बाबतीत सातत्याने षडयंत्र रचून तिला दुर्बल करण्याचा प्रयत्न करतात. या जमातीला संधीच मिळणार नाही याची दक्षता घेतात.
        याठिकाणी आपण अलीकडील काळाचा विचार करू, पेशवाईच्या काळानंतर येथील प्रस्थापित व्यवस्था सुव्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी या धनगर जमातीतील लोक गुलाम मानसिकतेत, अदृश्य गुलाम म्हणून जगत राहले तरच ह्या व्यवस्थेतील विशिष्ट प्रस्थापितांच्या अस्तित्वाची सूत्र जुळते. ते सुत्र सतत कायम रहावे यासाठी या धनगर जमातीला अंधश्रद्धेच्या माध्यमातून, त्यांच्या पराक्रमी इतिहासापासून अनभिज्ञ ठेवून, तो इतिहास नष्ट-भ्रष्ट करून, यांच्या कर्तबगार स्त्री पुरुषांना देव- देवी बनवून, त्यांच्यासंबंधी दैविक, चमत्कारिक आख्यायिका बनवून,  त्यांच्यामध्ये कर्तबगार पुरुष निर्माण होणारच नाही याची दक्षता घेऊन केवळ वैचारिक नपुसक, आज्ञाधारी गुलाम पिढी जन्माला येईल अशी परिस्थिती सातत्याने टिकवून ठेवली जाते
                  त्या परिस्थितीमुळे धनगरांना स्वतःची, स्व अस्तित्वाची, स्वपराक्रमाची, स्वताच्या क्षमतांची जाणीवच होत नाही, परिणामी धनगर जमातीतील बहूतांश वर्ग मान्य करीत नसला तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक गुलाम म्हणून जगत असताना दिसून येतो. यावर काहींचा आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सामाजिक आत्मपरीक्षणा शिवाय आपणाकडे पर्याय उरत नाही.
                 दुसरं असं की, या जमातीतील जे लोक सामाजिक दृष्ट्या धडपडतात, काही तरी करण्याची आकांक्षा ठेवतात, त्यापैकी काहींना नियंत्रित सत्तापद, संपत्ती, नोकरी याचे लाभ देवून किंवा काही वेळा नुसती प्रलोभने देऊन कायमची गुलामी लादण्याचा प्रयत्न सुरू असतो. जमातीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे गुलामांची फौज निर्माण होत राहील व ती सातत्याने टिकून राहील याचा सातत्याने प्रयत्न या प्रस्थापितांकडून सुरू असतो. त्यासाठी धनगर लोकांमधील काशिराव (कच्चे दुवे Under control लाभार्थी) हाताशी धरून स्वयंनिर्भर/स्वाभिमानी विठोजीचा राजकीय खून केला जातो.  आणि लाभार्थीच्या माध्यमातून संपूर्ण जमातीला भावनिक आव्हाने केली जातात व त्या बेसवर संपूर्ण जमात स्वत्व विसरून भावनिक होवून प्रस्थापितांच्या मागे फिरतात. याची उदाहरणे आज मी देण्याची गरजच नाही. प्रत्यक्ष अनुभवू शकता.
              म्हणूनच. आज गुलामीच्या वेसनी कापून अंधश्रद्धा, अंधभक्ती, प्रलोभने यांच्याआधारे हेतूपुरस्सर लादले  जाणारे राजकीय नपुंसकत्व ओळखून धनगरांच्या सामाजिक, ऐतिहासिक ताकदीची जाणीव करून देणारे विचार व नेतृत्वच धनगरांची राजकीय हालत सुधारू शकतात.
तेव्हा आपणास शून्यातून विश्व निर्माण करणारे मल्हारराव प्रेरणा देवू शकतात. पेशवाईचे शडयंत्र जाणणाऱ्या राजमाता अहिल्याबाई जगण्याचा संदेश देतात. सर्वांची पराक्रम गाजविण्याची क्षमता जाणणारे यशवंतरावच परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग दाखवू शकतात.
           तेव्हा परिस्थितीला शरण जायचं व माझं भलं होईल याची अपेक्षा करीत स्वकियांना लाथाडून शडयंत्राला बळी पडत काशिराव म्हणून जगायचं?  की ती विदारक परिस्थिती लाथाडून यशवंतरावांसारखं पुणर्उत्थान करायचं?  ज्याचं त्यांनी ठरवायचं.......

खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३