Wednesday, May 13, 2020

जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!*

🥈🥉🥈🥉🥈🥉🥈🥈🥈🥉
*जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!* 
 
                    *डॉ प्रभाकर लोंढे.* 

                 माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार जगत असतो, असं असलं तरी त्याचा दृष्टीकोन त्याला त्याच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करीत असतो. हा त्याचा दृष्टीकोन त्याच्यावरील संस्कार, उपलब्ध परिस्थिती व त्याने जीवनामध्ये पाहिलेल्या स्वप्नांवरून ठरत असतो. यापुढे त्याने आपल्या दृष्टिकोनाला सांभाळत असताना केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा त्याच्या जीवनाचा दर्जा ठरवित असतो, प्रसंगी त्याच्या/ तिच्या व्यक्तित्वाला अमरत्व प्राप्त करून देत असतो. तेच अमरत्व इतर सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याला महापुरुषाचा दर्जा प्राप्त करून देत असतो. व त्याच्या प्रेरणेतून सामान्य माणूस संपूर्ण जीवन जगत असतो.
        असे *कर्तुत्ववान प्रेरणादायी महापुरुष पैदा करता येत नाही तर ते घडविता येतात. महापुरुष हा विचारांनी व कर्तुत्वानी घडत असतो,*  त्यामुळे स्वतःच्या जीवनातील आचारपद्धती व स्वप्न साकार करण्यासाठी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांची कार्य पद्धती व जीवन कार्य सामान्यांना जीवनामध्ये आधारस्तंभ दीपस्तंभ यासारखे कार्य करीत असते.  समाजात घडून गेलेले महापुरुष समाजात सातत्याने दीपस्तंभासारखे जळत राहावे, सर्वसामान्यांपर्यंत जगण्याची दृष्टी देत राहावे, यादृष्टीने महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या समाजामध्ये साजरा करावयाच्या असतात. 
             *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हे व्यक्तित्व समाजामध्ये अनेक अंगाने मार्गदर्शक असून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जगण्याची ऊर्जा देऊन जात. संपूर्ण जग दुःखमय असताना दुःखातही सुख शोधण्याची वृत्ती निर्माण करतं. खाजगी जगत असताना सार्वजनिक, सर्वकालिक होण्याची प्रेरणा देतं. सर्वधर्मसमभाव यातून सामाजिक समतोल साधण्याची एक विचार प्रेरणा घेऊन जगण्यासाठी माणसाला प्रेरित करतं. सत्तेचा माज उतरवून समाजामध्ये सेवाभावी दृष्टीने जगण्यासाठी मजबूर करतं.* म्हणून ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोनाचार्याचा पुतळा बनवला होता तो पुतळा एकलव्या तील सर्व स्कील विकसित करण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातूनच तो उत्तम धनुर्धारी बनला. यातून मला एवढेच सांगायचे आहे की महापुरुषांचे पुतळे, चित्र, स्मृती ह्या बाबी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठी व स्वतःतील गुण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत असतात. 
                 त्यासाठीच यावर्षीची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे २०२० ला सर्व सामाजिक व राजकीय बंधन पाळून आपण आपल्या घरी वाड्या-वस्त्यांवर राहून उत्साहात साजरी करू शकतो. यावेळी कोणीही शासकीय निर्बंध,नियम, कायदा तोडणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जयंती साजरी करावी. व ते सर्वांवर बंधनकारक आहे. परंतु याचा असा एक फायदा आहे की, त्यामुळे दरवर्षी जयंतीसाठी मोठ्या खर्च होणारा पैसा वाचणार आहे. *हा वाचलेला पैसा खर्च झालाच पाहिजे, असं बंधनकारक नाही. परंतु त्या मधून भुकेलेल्यांना अन्न, पैशावाचून शिक्षण थांबणाऱ्यांना शिक्षणाच्या सोयी, बिमारांना आर्थिक मदत, समाजातील अन्याय, अत्याचारग्रस्त यांना मदत, याशिवाय प्रत्येकाच्या मनात असलेले समाज उद्धारक नवोउपक्रम राबवण्यासाठी या जयंतीचा वापर करून खऱ्या अर्थाने आपण दानदात्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारस असल्याचे सिद्ध करू शकतो.* 
        याशिवाय लॉक डाऊनचा काळ असल्यामुळे कुठे सार्वजनिक स्थळी राजमाता *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी न करण्याचं शल्य मनात येऊ न देता पारंपारिक उत्साह जोश कायम ठेवून त्याला मात्र वेगळ्या वळणावर परिस्थितीसापेक्ष निर्णय घेऊन यावर्षीची जयंती साजरी केली तर ती अविस्मरणीय राहणार आहे.*         

अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वाड्या-वस्त्या यांना महापुरुषांची नावे देण्याची ट्रेंड प्रचलित होताना दिसत आहे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक अंगाने मार्गदर्शक जीवन असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा चौक, रोड, रस्ता उड्डाणपूल दिसत नाही किंवा ऐकायला मिळत नाही.  *यावर्षीच्या जयंती निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव एखाद्या चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वार्ड, मोहल्ला, वाड्या-वस्त्यांना  देऊन, त्याची ३१ मेला तत्वतः घोषणा करून सर्वांनी आपल्या घरीच राहुन ऑनलाइन पद्धतीने विचारविनिमय करून ऑनलाइन पद्धतीनेच त्याची घोषणा केली तर लाकडाऊन नंतर त्याची अंमलबजावणी करता येईल.* या लाकडाऊनच्या निमित्ताने ती अविस्मरणीय बाब ठरणार आहे. 
       सर्वांनी सार्वजनिक व खाजगी आरोग्याची काळजी घेऊन लाकडावून चे पालन करण्यासाठी शासनाला व प्रशासनाला संपूर्णतः सहकार्य करावे. *राष्ट्र प्रथम कर्तव्य समजावे.* .. ही विनंती..

 *त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!* 


 *डॉ प्रभाकर लोंढे*
*गोंदिया* 
९६७३३८६९६३

Wednesday, April 29, 2020

धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

📚🖊️🖊️📚📖🖊️🖊️📚📚🖊️🖊️🖊️📚
 *धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

           *डॉ प्रभाकर लोंढे.*

   या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत सर्वाधिक पराक्रमी सर्वगुणसंपन्न म्हणून नावलौकिक असलेले राजे/ राजकीय वंशांचा विचार केल्यास त्यापैकी बहुतांश धनगर वंशाचे आहेत असा उल्लेख करावा लागतो. हे *मी जातीय अस्मिता म्हणून नाही तर वास्तविकतेच्या आधारे बोलतो आहे.* (ज्यांना कुणाला यावर आक्षेप असेल त्यांनी थोडे इतिहासात डोकावून पाहावं ही विनंती) असे असले तरी मी येथे सर्व वंशांचा उल्लेख करणार नाही. परंतु याच शृंखलेतील *मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ असलेले संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांच्यापासून सुरु झालेल्या होळकर वंशातील राजपुत्र खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, शूरवीर महाराजा यशवंतराव यांना इतिहासकारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा वारंवार बदनाम/संकुचित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
              *तेव्हा प्रश्न निर्माण होतं की असं का झालं???*

याचे उत्तर आपल्याला प्रथमतः

 🖊️१) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनीच दिलेलं आहे. " *आम्हा कडील लोकांची कामे यथास्थित होतात. परंतु उजेडात आणणार कोणी नाही. न होत्याचे उजेडात येते. असो दिवस असेच आहेत"* (महेश्वर दरबारची बातमीपत्रे पान-१९) याचा अर्थ तेव्हापासून असं चालत होतं आणि आजही ते बंद झालं आहे, असं म्हणता येत नाही.
 *🖊️२) "होळकरांची कैफियत"* म्हणजे होळकर यांच्या पराक्रमाचा आलेख आहे. ती *भाऊसाहेबांच्या बखरीच्या तोडीची आहे, परंतु ती मागे पडण्याची दोन कारणे ये. ना. खेडकर यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये दिलेली आहेत.*
 *अ) मराठी इतिहासकारांनी शिंदे* होळकर घराण्याची वारंवार तुलना करून होळकरांची कृती सारी स्वार्थ मुलक तर शिंद्यांची कृती तेवढी सारी उदात्त, असे रंगवण्याचा प्रघात पाडला. यामुळे होळकर बदनाम झाले.
 *ब) "भाऊसाहेबांची बखर" अप्रत्यक्षपणे पेशव्यांची बखर म्हणून प्रसिद्ध झाली, याला कारण लेखन कलेवर त्यांचे असलेले प्रभुत्व. ही बखर भाऊसाहेबांची बखर नावाने ओळखली जात असली तरी त्यामधून शिंद्यांचा उदोउदो करण्यात आलेला आहे.* (हे असं का झालं? याचा सर्वांनी विचार करावा). तुलनेने होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाला, शिंदे व पेशव्यांच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीने दडपण्याचाच किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. *यामध्ये होळकरांचा इतिहास किंवा पराक्रम कमजोर होता हे कदाचित त्यांना सुद्धा मान्य होणार नाही. पण त्यादृष्टीने त्यांची लेखणी मात्र चालली नाही. याला कारण इतिहासामध्ये शिंद्यांपेक्षा होळकरांना श्रेष्ठ दाखवण्याची त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नव्हती. यापुढे जाऊन त्यांची तशी नियत नव्हती असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचे हिरो असलेले होळकर हे खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आहे.* त्यामुळे येथे आपल्याला संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे ही बाब समजून घेतल्याशिवाय पुढचं कार्य करता येणार नाही.

🖊️ *३) माझ्या मते, साधारणता* समाजात जेव्हा एखाद्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येते, तेव्हा त्याच्याशी स्वतःची तुलना करता आपण त्याची बरोबरी करू शकत नाही हे तो मान्य करतो,पण ते त्याला सहन होत नाही.  तिथूनच तो त्या व्यक्तीच्या बदनामीला सुरुवात करतो. यामध्ये समोरच्याला बदनाम करणे हा त्याचा  मुख्य उद्देश नसतो तर आपण त्यापेक्षा कमजोर दिसू नये एवढीच तो दक्षता घेत असतो.व त्याच्यासाठी त्याचा सर्व खटाटोप चाललेला असतो. हेच होळकरांच्या इतिहासाच्या बाबतीत झालेलं नाकारता येत नाही.

🖊️ ४) " *बोलक्याचे बोंड खपते, मुक्याचे मोती लपते"* ही एक म्हण आहे. ती होळकरांच्या इतिहासाला समर्पकपणे लागू होते. मराठी इतिहासकारांना वगळून इतर संदर्भ लक्षात घेता मराठी इतिहासकारांच्या इतिहास लेखनावर संशय निर्माण होतो. त्यामुळे होळकरांच्या इतिहासलेखनासंबंधी ची आत्मियता असणाऱ्या *इतिहासकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असती तर कदाचित होळकरांच्या इतिहासाला न्याय मिळाला असता. होळकरांच्या इतिहासाला बदनाम होण्याची वेळ आली नसती.*

🖊️ *५) या चार बाबींबरोबरच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की समाजातील जागृत लोकांचाच समाजावर, संस्कृतीवर, राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेवर नेहमी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे लेखन सुद्धा त्याच अंगाने झालेल्या आहेत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो कि, धनगर जमातीचे किती लोक इतिहास लेखनाच्या बाबतीत जागृत होते व आहे ??*

 🖊️ *६)  दैनंदिन जीवनात व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीच्या चुका होणे, ही बाब स्वाभाविक आहे. आणि जो कर्तुत्वप्रधान जगत असतो, त्यांच्याकडून तर चुका नक्कीच होतं असतात. त्यामुळे होळकर राजांकडून चुका झाल्या असेल तर ते नक्कीच कर्तुत्व प्रधान होते. म्हणून त्याच्या चुका दाखवत असताना त्यांच्या कर्तुत्वाची सुद्धा तेवढ्याच प्रगल्भ नजरेने मांडणी होणे आवश्यक आहे. पण ती होता ना किंवा झालेली दिसत नाही*

🖊️७) *इतिहास लेखन करताना आपण ज्याप्रमाणे होळकरांच्या इतिहासाविषयीची जे आत्मीयता दाखवतात* त्याप्रमाणे तत्कालीन मराठी इतिहासकारांना होळकरी इतिहासा पेक्षा पेशवे आणि शिंदे यांच्या इतिहासाशी जवळीकता वाटली असेल आणि त्यातून जर ते इतिहास लेखन झाले असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. तर *तो आत्मियता असणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे मान्य व स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.*
             ही बाब सत्य असताना एखाद्याच्या नकळत झालेल्या चुकांचा अतिरंजितपणा किंवा राईचा पर्वत करून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू , व्यक्तिमत्वाचे विविधांगी समाजोपयोगी व कर्तबगार पैलू याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते तेव्हा *ऐतिहासिक दृष्ट्या त्या व्यक्तीत्वावर नक्कीच अन्याय होत असतो. आणि होळकर राजवंशाचे बाबतीत हे नक्कीच झालं आहे,* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. 
       आणि याची आपणास उशिरा का होईना *जाणीव झाली असेल तर इतिहास संशोधना बरोबरच इतिहास लेखन शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही....*


 *धन्यवाद*
------------------------------------
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक*

🖊️ *डॉ. प्रभाकर लोंढे*🖊️
          ९६७३३८६९६३

Saturday, April 18, 2020

राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

                             *डॉ प्रभाकर लोंढे*

     मराठेशाहीच्या इतिहासामध्ये होळकर संस्थान बलाढ्य संस्थान म्हणून सर्वपरिचित होतं. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खुद्द पेशवे तसेच इतर सरदार यांचेवर  तसेच अखंड भारतामध्ये सर्वत्र दबदबा होता.  मल्हाररावांना विश्वासात घेतल्याशिवाय पेशवाईतील कोणताही निर्णय होत नव्हता. अशा या महान सुभेदारांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांना इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. त्या इतिहासाची वास्तविकता सत्तेच्या आधारे पुढच्या काळामध्ये सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी *खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला तो काही संदर्भांवरून संशयास्पद वाटतो.*
                 सुरजमल जाट कुंभेरीचा किल्ला बळकावून बसला होता. त्यावेळी पेशवा रघुनाथराव, जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. तसा हा किल्ला जिंकण्याचा आग्रह सुभेदार मल्हाररावांचाच होता. त्यावेळी *रघुनाथराव व जयाजी शिंदे होळकरांच्या सोबत असले तरी आतून ते जाटांसोबत मिळाले होते.* त्यामुळे ते होळकरांना मदत करीत नव्हते. व ते स्पष्ट दिसत होते.
         तत्पूर्वी मल्हारराव होळकर यांचा पुत्र *खंडेराव होळकर चारशे स्वरांच्या पथकासोबत दिल्ली स्वारी आटोपून जानेवारी १७५४ च्या आरंभी होडाळ येथे आपला तळ ठोकून बसला होता.* जाट वाड्यातील जाटांची त्यांच्या केंद्रापासून दूर असलेली ठाणी उठवून लावण्याचे कामावर तो होता. (कदाचित हा मल्हाररावांचा युद्धनीतीचा भाग असावा) असे असताना या पथकाने आता कुंभेरी च्या वेढ्यात येऊन सामिल व्हावे, असा पिताश्री मल्हारराव कडून त्याला आदेश मिळाला. त्याप्रमाणे खंडेराव होळकर कुंभेरीच्या वाटेने निघाला. वाटेत मेवातचे ठाणे लुटून तो कुभेरीला पोहोचला.(इथे प्रश्न निर्माण होतात की,
 *१) मल्हाररावांना कुभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना का बोलावावं लागलं?*
*२) जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे त्यावेळी काय करीत होते?*
    एकाकी लढा देत असताना  कुंभेरी चा प्रदेश रेताळ असल्याने लांब पल्ल्यांच्या तोफांची आवश्यकता मल्हाररावांना वाटली. त्याची पूर्तता व्हावी म्हणून दिल्ली दरबार कडे *तोफांची मागणी केली परंतु दिल्ली दरबारने ती नाकारली. (दिल्ली दरबारातील गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या मुलाच्या(खंडेराव) नेतृत्वात सेना पाठवणाऱ्या मल्हाररावांना दिल्ली दरबार/ बादशाहाने ही मदत का नाकारली? हा येथे मोठा प्रश्न निर्माण होतो)*
         त्यावेळी जाटां विरुद्ध लढण्यासाठी इमाद उल- मुल्क तसेच अकितब यांना मल्हाररावानी बोलावून घेतले. बोलण्यावरून ते लढ्यात सामील झाले. *खंडेराव सुद्धा नेटाने लढत होते. अतिशय बिकट परिस्थिती असताना खंडेरावांनी किल्ल्याच्या तटा पर्यंत झाकलेल्या भुयारा सारख्या खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा तयार केल्या होत्या व तो किल्ल्याच्या तटा पर्यंत जाऊन पोहोचला होता.* हा खंडेरावाचा इतिहास खंडेरावांवर आक्षेप घेणाऱ्यांसाठी अतिशय चपराक देणारा आहे.
           सुरजमल जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दबा मारून बसला होता. पेशवा रघुनाथराव व जयाजी शिंदे वेढयात उपस्थित असले तरी त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. ते दोन्ही आतून सुरजमल जाटाशी जवळीक साधून होते. (नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवा जाटाशी तह करून २२ मे १७५४ ला कुंभेरीची छावणी मोडून निघून गेला.) त्यामुळे कुभेरीचा संपूर्ण लढा होळकरांना लढावा लागला.         
         *मल्हारराव आणि खंडेराव यांचेकडून सर्वतोपरीने लढा सुरू असताना त्यांना जाटा सह अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागत होता. अन्नाशिवाय पोट भरणे व शस्त्राशिवाय युद्ध जिंकणे कठीण जाते.  कुंभेरीच्या रेताळ प्रदेशावर लढण्यासाठी होळकर पिता-पुत्रांना लांब पल्ल्याच्या तोफा जर बादशहा किंवा कुठून मिळाल्या असत्या तर कदाचित कोणत्याही परिस्थितीत होळकर मराठा साम्राज्याचा झेंडा कुभेरीवर फडकला असता.*
            होळकर पिता पुत्राचे जिकरीचे प्रयत्न सुरू असतानाच *१५ मार्च १७५४ ला खंडेराव जेवणानंतर खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता अचानकपणे किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला.* जंबरुकचा एक गोळा लागून *खंडेराव मारला गेला* .... एकुलता एक खंडेराव मृतप्राय झाला याची माहिती कळताच मल्हारराव देहभान विसरले. या सर्व प्रकारात कुंभेरीचा लढा अर्धमेला झाला खरा.  तरी त्याठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात.  १. *) खंडेराव खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा कसा काय झाला?*
 *२) सुरजमल जाटाशी संबंध जोडून असलेल्या जयाजी शिंदे व खुद्द रघुनाथराव पेशवे यांनी मल्हाररावांचा काटा काढण्यासाठी सुरजमलला माहिती पुरवून खंडेरावांचा मृत्यू घडवून तर आणला नाही ना?*
               परिस्थिती काहीही असो, खंडेरावाच्या मृत्यूने मल्हारराव पुर्णतः खचून गेले होते. अशाही परिस्थितीत *रघुनाथराव व जयाजी शिंदे पातशहाचा दबाव दाखवून जाटांशी मेळ घालण्यासाठी मल्हाररावांना बोलू लागले. दबाव टाकू लागले.* परिस्थितीने अगतिक असलेले मल्हारराव एकीकडे मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने व्याकुळ होते. तेव्हा मल्हारराव उदास होऊन *जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे यांना बोलले "आपण धनी व शिंदे मुखत्यार सरदार, सांगाल ती चाकरी करू!* असे उद्विग्न होवून मल्हारराव बोलले व कोणतीही पूर्वसूचना न देता खंडेरावाच्या मृत्यूचे उत्तरकार्य निमित्त मथुरेला निघून गेले..
          *मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाहेर येणार नाही तो सुभेदार मल्हारराव कसला?* खंडेरावाचे उत्तर कार्य आटोपून मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली." _*सूरजमल जाट याचे शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन. तरीस जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राण त्याग करिन."*_
             यावरून आपल्याला मल्हाररावांना पुत्रमृत्यूचं किती दुःख झालं होतं, हे लक्षात येईल. *यावेळी मल्हाररावांचं दुःख एकट्या मल्हाररावांचं न राहता सर्व मराठा सरदारांचं व ज्यांचं अस्तित्व मल्हाररावाच्या तलवार व भरोशावर निर्माण झालं होतं त्या पेशव्यांना व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही.* (याचा अर्थ खंडेरावाच्या मृत्यू संबंधाने संशयास जागा आहे) *सर्व मराठा सरदार व पेशवे यांनी एकत्र येऊन मल्हाररावांवर आलेला प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती. सर्वांनी मिळून सुरजमलला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही.*
       मात्र मल्हाररावांच्या प्रतिज्ञेने तिकडे सुरजमल जाट पूरता घाबरून गेला होता. त्याने *जयाजी शिंदे कडे आपल्या वकिलामार्फत पगडी व पत्र पाठवून, माहिती मिळेल त्या मार्गाने बचाव करावा, अशी विनंती केली. त्यावर जयाजी शिंदेनी जाटाना बेलभंडार व अभयपत्र पाठवले. दोघेही पगडी बंधू बनले. जयाजी शिंदेनी जाटाची बाजू घेतली व संरक्षणाची हमी दिली.*
   यावेळी प्रश्न निर्माण होतो
     १) सुरजमल जाटानी जयाप्पा शिंदेनाच संरक्षण का मागितले?
     २) जयप्पा शिंदेना खंडेरावाच्या मृत्यूचं दुःख झालं नव्हतं काय?
३) मल्हाररावांच्या दुःखाशी जयप्पा मराठा सरदार म्हणून त्यांच काही नातं नव्हतं काय?
४) खंडेरावाचा मृत्यू संगनमताने तर झाला नव्हता ना?
५) रघुनाथरावानी "पेशवा" या नात्याने मल्हारराव च्या बाजूने उभे न राहता जाटाशी तह करण्याचा आग्रह का धरला?
६) या दोघांना मल्हाररावांपेक्षा जाट जवळचे का वाटले?
 *असे अनेक प्रश्न निर्माण करून*
                  *कुंभारीचा लढा संपला.*
                 खंडेराव मारला गेला.
                 पराक्रमी मल्हारराव काही अंशी खचला.
         *पण हा सर्व प्रकार मला संशय निर्माण करून गेला, की, खंडेरावाच्या मृत्यूमागे येथील प्रवृत्तीचा तर हात नव्हता ना??*
(सत्यता तपासणीच्या दृष्टीने लेख आपणास पाठवित आहे)

------------------------------------
 *डॉ. प्रभाकर लोंढे*
*९६७३३८६९६३*

Saturday, March 14, 2020

समाज दर्पण

समाज दर्पण


पाहिला मी
स्वास घेणारा मुडदा.
ज्याचा फ्याक्चर 
झाला होता गुडघा.

तेव्हा
पहातच राहिलो
आश्र्चर्यचकित होवून
त्या स्वासाला.
जो चालू होता
कसाबसा.
रडत होता ढसाढसा.
दुसरीकडे जागा भेटत नव्हती,
म्हणून बसला होता
देहाची लत्करे पांघरूण.
स्वत्व विसरून
निव्वळ टाईमपास साठी.

तेव्हा विचार आला.
मनाला प्रश्न पडला.
विधात्यानं का बनविलं याला ?
तेव्हा
विधाताच
न राहावून बोलला,
हा प्रश्नच का पडला तुला?
तेव्हा निरूत्तर होवून बोललो.
थोडं समाजात विचारून सांगतो तुला...

डॉ प्रभाकर लोंढे
गोंदिया

Saturday, February 22, 2020

पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

            *डॉ प्रभाकर लोंढे*

आज मी खूप विवादाचा नसला तरी विविधांगी मतेमतांतरे असण्याची शक्यता असलेला महत्त्वाचा विषय हाताळण्याची हिम्मत करतो आहे. त्याला कोणीही भावनात्मक स्वरूपात न घेता वैचारिक दृष्टिकोनातून त्यावर विचारमंथन करावं. एवढीच आग्रही अपेक्षा.
          राजमाता अहिल्याबाई होळकर विचार, आचार, कर्तृत्व,  युद्ध, न्याय, समाजसेवा, जनकल्याणाकारी कार्य यासाठी जगात नावलौकिक असलेलं एक मोठं नाव. एका संस्थानाची महाराणी असली तरी वैश्विक नजरेने जगणारं व्यक्तिमत्व की ज्यामध्ये एक विशाल चरित्र दडलेलं आहे. नाव ऐकताच आदराने चरण झुकावं एवढं निष्कलंकित, सात्विक, संयमी, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेली विधवा स्त्री सलग २८ वर्ष राज्य करणाऱी ती एक महाराणी.  या कर्तव्यदक्ष राणीने जीवनभर जनसेवेला महत्त्वच नाही तर जीवनाचा एक भाग बनवून खाजगी जीवनातील दुःखाकडे  दुर्लक्ष करीत स्वत:ला प्रजेसाठी समर्पित केलं. *प्रजेच्या सुखात स्वतःचे सुख मानलं. याचाच परिणाम स्वरूप किंवा त्यामुळेच त्यांची प्रतिमा किंवा त्यांचं स्थान सामान्य माणसांच्या मनातील ईश्र्वर संकल्पनेपेक्षा कमी नव्हतंच.*
             एवढी समाजनिष्ठा जपत सामाजिक जगत असताना राजमाता अहिल्याबाईंच्या जिवनात त्यांच्या घराण्यातील जेष्ठांविषयी आदर व घराण्याच्या कुलदैवता विषयी श्रद्धेमध्ये कुठेही कमतरता दिसत नाही. त्यांच्या विषयी त्यांना प्रचंड आदर होता, ही विशेष बाब लक्षात येते. व ती अनेक पुराव्यांनिशी सिद्ध होते.
             इतिहासात लक्ष घातल्यास *विशेषत: होळकर व बहुतांश धनगर राजघराणे शिवपुजक असल्याचे दाखले मिळतात. "शिव" ही मुळात द्रविड देवता. यामध्ये शिवपिंड/शिवलिंग पुजा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच कदाचित होळकर घराणे शिवलिंग पुजनाला महत्त्व देत असावे‌. त्यांच्या पैकीच एक म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आपल्या जिवनात शिवलिंग पुजेला महत्त्वपुर्ण स्थान दिले होते. बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला.  त्यांच्या दैनंदिन जिवनात* शिवपिंड पुजनाशिवाय त्यांच्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नव्हती. एवढा अतुट संबंध राजमाता अहिल्याबाई होळकर व शिवपिंड यांचा होता.
               हे जरी खरं असलं तरी शिवभक्ती, *देवभक्ती व धार्मिक कार्याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक, आर्थिक,  राजकीय व सांस्कृतिक विकासाची उल्लेखनीय कामे त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तित्व बहुआयामी होतं हे सिद्ध होते.* तसेच आजच्या काळात सुध्दा त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्टीने सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.  म्हणूनच त्या *व्यक्तित्वाची मांडणी (project),  प्रदर्शन समाजासमोर तसेच भावी पिढ्यांच्या दृष्टीने करीत असताना किंवा त्यांची प्रतिमा साकारताना/ उभी करीत असताना तशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.*
          अहिल्याबाई होळकर आणि शिवपिंड हे समीकरण आज सर्वत्र परिचित झालेलं आहे. ही बाब धार्मिक दृष्ट्या अतिशय मार्मिक असून आम्ही द्रविड असल्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण पुरावा आहे. तशा प्रकारची त्यांच्या विषयीची धारणा समाजात निर्माण झालेली आहे. आज त्यांचा पुतळा बहूतेक ठिकाणी शिवपिंडधारी दिसून येतो. त्या संबंधाने कोणाचाही आक्षेप असू शकत नाही. माझा तर बिलकुल नाही. परंतु धनुर्विद्या घेण्यासाठी एकलव्यानी *द्रोणाचार्याचा जो पुतळा बनवला होता असं म्हणतात.  त्या पुतळ्यात त्याला त्याचा गुरु दिसत होता, गुरूकडून मिळणारी प्रेरणा, गुरूकडून मिळणारी विद्या, म्हणजेच त्या पुतळ्या मधून त्याला गुरूच्या जीवनातील सर्वच अंगांचे दर्शन घडत होतं. व त्या पुतळ्याला नजरेसमोर ठेवून एकलव्य उत्तम धनुर्धारी बनला.* तो त्या पुतळ्या पासून मिळालेल्या प्रेरणेचा परिणाम होता. असं जर असेल आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आमच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान मानत असू ,त्यांच्या व्यक्तित्वाला पाहून भावी पिढ्या घडवाव्या, त्यातून नवनिर्मित समाज हवा असेल, एक आदर्श नवनिर्मित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने आदर्श राजा किंवा राणी अपेक्षित असेल   तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा कसा असावा याचा विचार सर्वांनी करावा. त्यांच्या पिंडधारी पुतळ्यापासून कोणता बोध होणार आहे किंवा भावी पिढ्यांसाठी कोणती प्रेरणा अपेक्षित आहे याचा सुध्दा विचार व्हावा.
        *कोणी मान्य करो अथवा न करो हे सत्य आहे की, राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक असल्या तरी त्यांचा तो शिवपिंडधारी पुतळा त्यांच्या केवळ धार्मिक जीवनाला प्रदर्शित करीत असतो* . आणि वास्तविकता ही आहे की, *कोणताही व्यक्ती कितीही धार्मिक असला तरी आपल्या जीवनाचा कमीत कमी वेळ धर्मकार्यात घालवत असतो.* त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचे इतर कार्य त्यांच्या धार्मिक कार्यापेक्षा खूप मोठे व लोकाभिमुख तसेच अथांग सागरा सारखे आहे. त्या सर्व कार्याला प्रदर्शित करणारा व भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्या व्यक्तित्वातील सर्वगुणसंपन्नता प्रदर्शित करणारा पुतळा हाच अहिल्याबाई होळकरांच्या व्यक्ती व कृतीला सन्मान तसेच पूर्णत्व देऊ शकतो. भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. याचा अर्थ राजमाता अहिल्याबाई होळकरांचा शिवपिंडधारी पुतळा प्रेरक नाही असं होत नाही किंवा मला तसं म्हणायचं सुद्धा नाही. परंतु या पुतळ्याच्या माध्यमातून केवळ धर्मभावना, धार्मिक श्रद्धा, कृती याशिवाय दुसरा भाव निर्माण होत नाही. हे मात्र सार्वजनिक स्तरावर प्रकर्षाने सांगितल्याशिवाय राहणार नाही.
          संपूर्ण होळकर घराणे व स्वतः अहिल्याबाई होळकर शिवपूजक असले तरी त्यांनी लढाया किंवा रणांगणात उतरण्याची हिम्मत तलवारीचे भरोश्यावर, तिच्यावर विश्वास ठेवून केलेली आहे.  त्यामुळे *रनांगणावर लढणारी तलवारधारी अहिल्याबाई होळकर, समाजात दानधर्म करणारी दानशूर अहिल्याबाई होळकर प्रतिमा/पुतळा, नीती व कायद्याच्या चौकटीत न्यायदान करणारी अहिल्याबाई होळकर, बलाढ्य संस्थानाची राजगादी सांभाळणारी सिंहासनाधिष्ठीत अहिल्याबाई होळकर, लोककल्याणासाठी दक्ष व प्रत्यक्ष काम करणारी अहिल्याबाई होळकर,  पर्यावरणाकडे लक्ष देणारी अहिल्याबाई होळकर,  नर्मदा तीरी बसून मासे व प्राणीमात्रांना अन्न टाकणारी अहिल्याबाई होळकर* अशी त्यांचे विविधांगी सत्यरूपे प्रदर्शित करणारी प्रतिमा/ पुतळे सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
       एखाद्या कर्तबगार पुरुषाचा किंवा स्त्रीचा पुतळा कसा असावा ? हा मोठाच प्रश्न असला तरी पुतळा नेहमी त्या *व्यक्तित्वाचा निदर्शक असावा, त्यातून तो भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करणारा असावा, काही नव्हे तर एक विशिष्ट समाजोपयोगी संदेश पोहोचविणारा असावा.*
              झाशीची राणी लक्ष्मीबाई (पेशव्यांची भाची) च्या हातात ढाल तलवार, पाठीवर लेकरू(वारस) घेऊन घोड्यावर स्वार असलेली प्रतिमा व पुतळा आज सार्वत्रिक दिसून येतो. तो पुतळा किंवा प्रतिमा पाहून मनात शूर वीर भाव जागृत होतो. त्या सातत्याने लढत होत्या असा विचार डोक्यात येतो. (काही विचारप्रवाह त्यांच्या लढण्यावर आक्षेप घेऊन त्या लढल्याच नाही, त्यांच्या नावाने झलकारीबाई लढण्याचा पुरावा देतात) पुतळ्या मधून पराक्रमाच्या छटा अलगत झलकतात. त्यांचा पुतळा पाहून भावी पिढ्यांच्या भल्यासाठी त्या ढाल तलवार घेऊन लढल्या, असा संदेश तो पुतळा देतो, त्यापासून मिळणारी प्रेरणा लढण्याची उर्मी निर्माण करतो. पेशवे तर गणपती भक्त धार्मिक प्रवृत्तीचे होते परंतु कुठल्याही पेशव्याची प्रतिमा त्यांच्या धार्मिक भावना प्रदर्शित करणारी सार्वजनिक स्तरावर दिसत नाही.
         रयतेचा राजा शिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांनी शिवरायांला घडवले ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ते त्यांच्या संस्कारात वाढले हे सुद्धा सत्य. त्यामुळेच कदाचित बालशिवाजीला धडे देत जिजाऊंना दाखवले जाते. अलीकडे तर जिजाऊंच्या हातात तलवार दिसायला लागली आहे. तेव्हा मला प्रश्न पडतोय की त्यांच्या हातात तुळजाभवानी किंवा रेणुका मातेची भक्ती करताना जिजाबाईंना का दाखवले जात नाही.
          असो कोणाची प्रतिमा कशी बनवायची हा इतिहासाचा व अभ्यासकांचा  बनविण्याचा भाग असला तरी *भावी पिढ्यांना प्रेरक व सर्व गुण संपन्नता प्रदर्शित करणारा प्रत्येक पुतळा असावा असं मला वाटते.  अहिल्याबाई होळकर यांच्या हातातील पिंडधारी पुतळा यापुढे अहिल्याबाई होळकर यांना मर्यादित करणार नाही. एवढीच अपेक्षा!*


(या संबंधाने काही सूचना मतमतांतरे असल्यास कृपया ९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद मात्र नक्कीच करावा.)
 ________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचा अभ्यासक*
      *डॉ प्रभाकर लोंढे*
             गोंदिया चंद्रपूर

Thursday, January 16, 2020

राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.     
     

              *डॉ प्रभाकर लोंढे*

   अहिल्याबाई होळकर नावाचं व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर अथांग सागरा सारखं आहे. त्यामुळे या उदात्त व्यक्तीमत्वाला वैश्विक दृष्टिकोनातून, उदात्त नजरेतून जगासमोर मांडणे भावी पिढ्यांच्या दृष्टीने व जागतिक पातळीवर एक आदर्श निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काही लोकांना या संबंधाने कदाचित प्रश्न निर्माण होतील की हा माणूस असं का लिहीत आहे?  परंतु  आजच्या परिस्थितीमध्ये या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष, विशिष्ट नजरेतून या व्यक्तीमत्वाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो आहे, हा खरंच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.  *एकीकडे "राईचे पर्वत" बनत असताना पर्वताचं (अहिल्याबाईंचा व्यक्तित्व) खच्चीकरण होवू नये हाच या लेखाचा उद्देश आहे.*
                  सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक या सर्वच अंगाने त्या व्यक्तिमत्वाने सर्वकालिक काम केले आहे,की ज्याला इतिहासात तोड नाही. असे असतानाच त्या व्यक्तिमत्त्वाची केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडणे, केवळ धार्मिक झालर चढवून एक देवी स्वरूपात तिची वैश्विक प्रतिमा निर्माण करणे,  ही बाब तिच्या ऐतिहासिक सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वावर फार मोठा अन्याय व भविष्याच्या दृष्टीने एक वैचारिक पोकळी निर्माण करणारी आहे.
           एखाद्या अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा, सर्वत्र किनाराच म्हटला जात असला तरी प्रत्येक किनाऱ्याचं वैशिष्ट्य, वेगळेपण व महत्त्व अलग असतं. त्यामुळे समुद्राचं वर्णन करताना किंवा त्यासंबंधीची महती गातांना केवळ एका किनाऱ्यावरून समुद्राची किंवा किनारपट्टीची विशालता स्पष्ट करणं शक्य नसतं. त्याप्रमाणेच राजमाता अहिल्याबाई होळकर *या अठ्ठाविस वर्षे राज्य करणाऱ्या रणरागिणी, लोककल्याणकारी, आदर्श महाराणी, पुरोगामी व्यक्तित्वाच्या केवळ धार्मिक अंगाला प्रदर्शित केल्याने संपूर्ण व्यक्तीत्वाचा परिचय होणार नाही. कोणत्याही व्यक्तीचं केवळ धार्मिक जीवन म्हणजे संपूर्ण जीवन नसतं. कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक संकल्पना, धार्मिक विचार आचार हा त्या व्यक्तित्वाचा एक भाग असतो. परंतु त्याला संपूर्ण जीवन म्हणणे अतिशय चुकीचं आहे.* असे जर होत असेल किंवा केले जात असेल तर त्या व्यक्तित्वाला मर्यादित करण्यासारखे आहे. आणि असा तो अधिकार आज कोणालाही नाही.
        साधारणतः कोणताही व्यक्ती जीवनातील जास्तीत जास्त  १० % (खूप झाले) वेळ काळ धार्मिक कार्यामध्ये देत असतो.  याचा अर्थ उरलेला काळ तो इतर समाजकार्य किवा स्वतःसाठी जगत असतो. अहिल्याबाई होळकर एक महापराक्रमी कर्तबगार महाराणी होत्या. *त्यांनी त्यांच्या 28 वर्षाच्या राजकीय काळात या देशाच्या पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण चहू दिशेला केलेले विकास कार्य आजही त्यांच्या व्यक्तित्वाचा, राजकीय कारकीर्दीचा, विकास कार्याचा, त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, लोककल्याणकारी दृष्टिकोन, धार्मिक सहिष्णुता व वैचारिक प्रगल्भतेचा परिचय करून देतात.*
         असे असताना सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडल्याने त्यांच व्यक्तित्व आज हिमखंडा सारखं वाटायला लागलं आहे. त्यांची केवळ धार्मिक बाब प्रकाशात आणल्याने त्यांचे इतर महाकाय लोककल्याणकारी, समाज हितवादी जनकल्याणार्थ कार्य व भूमिका हे अदृश्य झाल्यासारखे वाटायला लागले आहे. 
          ज्याप्रमाणे हिमखंडाचा फार कमी भाग हा पाण्याच्या वर दृश्य स्वरूपात असतो आणि त्यापेक्षा बराच मोठा भाग पाण्यात व्यापलेला असतो, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई होळकरांचे कार्यकर्तृत्व केवळ धार्मिक बाबतीत दृश्य स्वरूपात दाखवले जात असून इतर कार्याला फारसा उजाळा दिला जात नाही. असं का होतं?? हा प्रश्न असला तरी  स्त्रीशक्ती व बहूजन समाजासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे.
           *होळकर संस्थानात २८ वर्षे राज्य करणाऱी एक महाराणी म्हणून जगाच्या पाठीवर जिने कार्यकाळ गाजवला. अनेक विकृतांना त्यांची जागा दाखवली. स्वतःच्या जगण्यातून जगाच्या पाठीवर दीपस्तंभासारखा आदर्श निर्माण केला. स्वतःच्या खाजगी जीवनातील समस्यांची शृंखला संपत नसताना त्याचा परिणाम कधीच जनमानसावर होऊ दिला नाही. लोककल्याणावर होऊ दिला नाही. सर्वत्र मानव, पशु पक्षी, जीव सुखी समाधानी राहतील, याचा सातत्याने प्रयत्न केला. हा प्रयत्न लोककल्याणकारी भूमिकेतून करीत असताना त्यांच्या कार्याला जगाच्या पाठीवर कुठेच तोड नाही.*
   ‌      परंतु या कार्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्याविषयी केवळ धार्मिक स्त्री, पूजा पाठ करणारी स्त्री, व्रत वैकल्य, कर्मकांडा मध्ये गुंतून राहणारी स्त्री, दानधर्म करणारी स्त्री, याच्याही पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्व देवी स्वरूपामध्ये सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. भारतीय समाजातील मानसिकतेला अनुसरून कदाचित काहींना हे अतिशय चांगलं वाटत असेल, काही लोक त्यांना देवी स्वरूपातच स्विकारायला उत्सुक असतील. यावर माझी काय कोणाचीही काहीही हरकत नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो माझ्या तुमच्या अपेक्षांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करण्यामध्ये का व्हावा?
             *माझ्या तुमच्या अपेक्षांमुळे त्यांच्या व्यक्तित्वावर पडणारा प्रकाश का मर्यादित व्हावा? आमच्या लेखणी वाणी, कृती केवळ त्यांच्या धार्मिक जीवना संबंधाने का अग्रेसर व्हाव्यात? त्यांच व्यक्तित्व राशिभविष्य, कर्मकांड पोथ्या पुराण, धार्मिक पारायण यामध्येच आम्ही का आडकवावं?*

 *आमच्या लेखणी त्यांच्या युद्ध, युद्ध कौशल्य, त्यांचे विजय, तलवारबाजी, अस्सल पुरोगामित्व, नीतिमत्ता, न्यायदान, परधर्म सहिष्णुता, शत्रूला दम व सन्मानजनक वागणूक सुद्धा,  गुंडांचा बंदोबस्त, अनिष्ट प्रथा-रूढींचा विरोध, प्राणिमात्रांवर दयाभाव, पर्यावरण रक्षण, लोक कल्याणकारी राज्य, रोजगार हमी योजना, साहित्य व सांस्कृतिक प्रेम, व्यापाराला प्राधान्य, जनकल्याणासाठी खाजगी संपत्तीचा वापर करण्याची वृत्ती.*

या *गोष्टींना आम्ही का उजाळा देत नाही??? का आमच्या लेखनी अंगाने चालत नाही ?? आमची वाणी यादृष्टीने का व्यक्त होत नाही??  त्यांची स्मारक तयार करतांना आम्ही या गोष्टींना का प्राधान्य देत नाही???*

शेवटी एकच विनंती करावीशी वाटते,
 *उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा कृपया हिमखंड मात्र बनवू नका....*

__________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Tuesday, January 7, 2020

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.
 
डॉ प्रभाकर लोंढे.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली."

         धनगर जमातीच्या राजकीय नेतृत्वाची दुरावस्था आज सार्वत्रिक तसेच सर्वमान्य झालेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका धनगर जमातीने अनुभवलेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका धनगर जमातीच्या हातात आहे. जमातीला  सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थावर अधिराज्य निर्माण होणे तसेच जमातीने भावी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका धनगर जमातीसाठी एक संधी स्वरूपात आहेत.
          लोकसभेतील तसेच विधानसभेतील धनगर उमेदवारांचा दारुन झालेला पराभव, निवडून आलेला एकमेव आमदार हा धनगरांचा विजय म्हणावं की पराभव?????  हा प्रश्र्नच असतांना कोट्यावधी धनगरांचा सार्वत्रिक पराभवच झाला आहे असं प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे व तो पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलाच पाहिजे. तरच यापुढे धनगर राजकीय अस्मिता पुनर्जीवित करणे शक्य आहे.
                धनगर राजकीय अस्मितेची वारंवार लाजिरवाणी पडझड सुरू असतांनाच, महाराष्ट्रातील धनगर "संवेदनाशून्य धनगर" आहे, असं म्हणणं चुकीचं ठरलंच पाहिजे. त्यासाठी जिथे कुठे संवेदना शुन्य धनगर लक्षात येईल तेथे सामाजिक संवेदना जागवायला कोणाची हरकत नसावी. तसा प्रयत्न प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अशा प्रयत्नांचा सार्वजनिक व मिशन स्वरूपात प्रत्येकाने स्विकार केलाच पाहिजे.  राजकीय सत्ता किती महत्त्वाची आहे, हे अलीकडेच महाराष्ट्रातील पार पडलेल्या प्रस्थापितांच्या (प्रस्थापित पक्षांच्या) राजकीय नाट्यावरून लक्षात येईल. सत्तेच्या भरोश्यावर जीवनभर केलेली पापं कसे धुता येते.  याचे प्रमाण/ सबुत गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पहायला मिळते. तेव्हा सत्तेचे महत्त्व धनगरांनी समजून घेवूनच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे.
           सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे. किंवा येणाऱ्या भावि काळात लवकरच त्या होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय समजले जाते. यामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर छोट्या का होईना सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सत्तेचा फायदा जमातीला होवू शकतो. भावी काळात निर्माण झालेले जिल्हा परिषद मधील धनगर  नेतृत्वाच्या जाळ्याच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पैकीच काही विधानभवनात आमदार, संसदेत खासदार  म्हणून नक्कीच पाठविता येतील.
     उभरत्या धनगर नेतृत्त्वाला परस्पर सहकार्याने आपला स्वत:चा तसेच जमातीचा राजकीय विकास करता येईल. राजकीय सत्तेपासून वंचित असलेली, हेतूपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या गेलेली धनगर जमात राजकीय प्रवाहात येईल. दिवसेंदिवस जमातीची चाललेली राजकीय परवड, पडझड थांबविता येईल. तुमच्या छोट्याच्या प्रयत्नातून धनगर राजकीय अस्मितेचे पुनर्जागरण झाल्याशिवाय राहणार नाही.
               म्हणून धनगर असाल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनगर उमेदवार दिसेल तिथे, त्यालाच मतदान केल्या शिवाय राहू नका. "विसरून सारे भेद- धनगर सारा एक" या म्हणीप्रमाणे एक जीवाने संघटित होऊन तन-मन-धनाने मतदान करून सर्वांना प्रोत्साहित करून भावी धनगर नेतृत्वाचे पाय मजबूत करा....
वैचारिक मतभेद का असेना रक्ताचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवा.  जिल्हा परिषद,पंचायत समितीतून, ग्रामपंचायत मधून धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि राजकीय अस्मितेचे पुनर्भरण करा.
    त्यावेळी लक्षात ठेवा!!! मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पासूनच होत असते. थेंबा थेंबाने तळे साचत असते. शतकांपासून गमावलेली राजकीय अस्मिता पुनर्जीवित करण्यासाठी कदाचित पुढील शतक सुद्धा लागण्याची शक्यता असेल.  परंतु या कार्याची सुरुवात करणारे तुम्हीच असाल. म्हणून जगायचं तर स्वतःसाठी!! स्वतःच्या माणसांसाठी!! स्वतःच्या राजकीय अस्मितेसाठी!! स्वतःच्या भावी पिढ्यांच्या सुंदर जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवस्था परिवर्तनासाठी!!! 
    उठा!! जागे व्हा!! जागवा आणि मतदान करा!! आपल्यासाठी!! आपल्याच माणसांना!! आपल्या सर्वांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!
,
खूप खूप शुभेच्छा!!!

अरे!
उष:काल होता होता,काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......

___________________________&__
जय यशवंतराव !! जय मल्हार

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३