Tuesday, May 3, 2022

धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?

 धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?


                  डॉ प्रभाकर लोंढे


              शिर्षक वाचून प्रथम दर्शनी काहीना आश्चर्य वाटेल की संघटना सुद्धा आत्महत्या करतात? तेव्हा आज पर्यंत च्या अनुभव आणि अभ्यासावरुन मी त्यांना म्हणेल "होय". धनगर संघटना आत्महत्याच करतात... तसं यामध्ये त्यांना आश्चर्य वाटण्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही कारण आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या , तरुणांच्या आत्महत्या, सुनेची आत्महत्या अशा खाजगी जीवन संपविणाऱ्या आत्महत्या ऐकलेल्या आहेच, परंतु  त्यांनी "आत्महत्या" हा शब्द केवळ एका व्यक्तीशी संबंधित आहेत, या अर्थाने ऐकलेला आहे हे नक्की...  आता संघटना सुद्धा "आत्महत्या" करीत असते, हा विचार कदाचित त्यांना प्रथम दर्शनी नवीन असल्याने.. आश्र्चर्यकारक वाटू शकतो.


         साधारणतः "आत्महत्या" तो करीत असतो, जो आत्मबल गमावून बसतो. तशी आत्महत्या ही एक मानसिक प्रक्रिया असते,  त्याच्या असण्या- नसण्यात, त्याच्या जगण्या- मरण्यात त्याला काहीच रस उरत नसतो. तो विवेकशून्य होवुन जातो आणि नकळत स्वतःच स्वतःला संपवून घेतो. स्वत:ला संपविण्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. कधी कधी यामागे कारणीभूत भलेही दुसराच कोणीतरी वाटत असेल तरी आत्महत्येची जबाबदारी मात्र त्याच्यावरच निश्चित होत असते. कारण आत्मबल, आत्महत्या ह्या बाबी व्यक्तीच्या मनोबलाशी संबंधित असतात. मनोबलाच्या नकारात्मक अवस्थेचा अंतिम परिणाम "आत्महत्या" हा असतो. 

           प्रत्येकाच्या मनोबलाची अवस्था ही त्याची विचारक्षमता तसेच वैचारिक गुणवत्ता आणि वैचारिक दिशा यावरून निर्धारित होत असते. आणि या सर्व बाबींचा प्रमुख आधार असतो तो "विचारप्रणालीचा".... साधारणतः व्यक्तिगत पातळीवर विचार केल्यास व्यक्तीच्या खाजगी जीवनात आध्यात्मिकतेला किंवा भौतिकतेला प्राधान्य देणारी विचारसरणी जीवनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार असतो... विचारसरणी खाजगी जीवनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. आणि तिला अनुसरण्याच्या प्रमाणावरून जीवनाच्या आलेखाची दिशा व अंत निर्धारित होत असतो.

         हाच विचार किंवा हिच सत्यता संस्था, संघटना, चळवळीच्या बाबतीत सुद्धा लागू होत असते.  त्यामुळे  संस्था, संघटना, चळवळी मोडित का निघतात? याचा विचार करतांना मी म्हणेल, काही संघटना तर नकळत स्वतःच आत्महत्या करीत असतात... स्वत:च्या कार्यपद्धतीतून अनपेक्षित, अनभिज्ञपणे स्वत:च स्वतःच्या आत्महत्येची बीजं पेरतात. आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की, ती संघटना काही काळाने आपोआप अंतिम घटका मोजायला लागते.. आणि नामशेष होवून जाते. 

          यालाच संघटनेची "आत्महत्या" असे म्हणता येईल. असे मला वाटते. आणि धनगर जमातीतील विविध संघटनांच्या बाबतीत ऐतिहासिक अभ्यास केला तर अशा अनेक संघटनांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. किंवा वर्तमानातील बहूतांश संघटना आता आत्महत्येच्या मार्गावर आहेत. आर.एस.एस आणि बामसेफ यांच्या धनगर जमातींमध्ये घुसलेल्या "विंग" सोडल्या तर  इतर बहुतेक धनगर संघटना (स्वत;ला बुध्दिजीवी समजणाऱ्यांच्या सुद्धा)  आत्महत्येच्या मार्गावर आहे, असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दीर्घायुष्यी धनगर संघटनां दिसत नाही.... हे समाजाची खंत आहे. (हे माझं विश्लेषणात्मक मत आहे, काहीच्या बाबतीत चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे.. त्यांनी संशोधन करावे)

              धनगर संघटनांच्या आत्महत्ये मागे अनेक कारणे कारणीभूत असली तरी, त्यापैकी काही निवडक, ठळक, महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे मांडता येईल.


१) अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वस्थाच्या भावनेचा अभाव...


२) निर्मिती मागचा छुपा संकुचित दृष्टिकोन...


 ३) एका निश्चित सर्वसमावेशक विचारसरणीचा कमी अधिक अभाव, 


४) दुरगामी ध्येयवृत्तीचा अभाव,


५) स्वामीत्वाच्या छुप्या भूमिकेत असलेले संघटनेचे मालक ठरवेल तीच अंतिम कार्यपद्धती... 


 ६) एखाद्या संघटनात्मक पदावर आरूढ होऊन, पदांची झालर चढवून पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्याची मनिषा...


७) सभासदांचा  विचार, संघटनेप्रती धारणा, दृष्टिकोन यांना स्थान न देता संघटनेची होणारी एककल्ली,- एकवल्ली सरंजामी वाटचाल. 

८) एखादा व्यक्ती, संकुचित प्रवृत्ती संबंधात बटीक वृत्ती


या कमी अधिक अभावात्मक परिस्थितीमध्ये केवळ भावना(काहितरी दिव्य करण्याची) व स्वार्थ (पदांची लालसा, प्रसिद्धीची भूक किंवा प्रासंगिक/संघटनांत्मक प्रतिशोध/व्यक्तिगत विरोध) यांच्या आधारे संघटना जन्म घेते. भावनात्मक आधार घेऊन संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्या मनाला भावेल अशी ती "संघटना" ही संघटनेची व्याख्या होऊ लागते, तिचा विस्तार सुद्धा संकुचित ध्येयासह मनाच्या समाधानासाठी एककल्ली मार्गाने होवू लागते, तेव्हा ती संघटना ----------- लिमिटेड & कंपनी सिध्द होते. संघटनेविषयी मालकीची भावना निर्माण होते व  बळावते. विचारसरणी पेक्षा स्वार्थाला/ व्यक्तीला महत्त्व दिले जाते. 

         अशी ती संघटना काही प्रमाणात श्वास घेत असली तरी तिचा प्रवास मात्र सर्वनाशा कडे सुरू झालेला असतो. केवळ स्वार्थाने चिपकलेली माणसं त्या संघटनेचे पायिक नाही तर "वाहक"  या अर्थाने कार्य करीत असतात. स्वाभिमानी (Self respect) माणसं कधीचेच दूर झालेले असतात.

          गाय मरताच गेचूडांनी पलायन करावे, या भूमिकेत असलेले स्वार्थपिपासू संघटनेच्या अंतिम घटकेला सोबत राहीलच याचा नेम नसतो.. शेवटी संघटनेचा मालक स्वरूपात असलेला अध्यक्ष किंवा इतर वाहक संघटनेच्या आत्महत्येचा साक्षिदार ठरतो. हा संघटनेच्या निर्मितीपासून पेरल्या गेलेल्या बिजांकूराचा परिणाम असतो.


         असले बिजांकूर वेळीच ओळखले नाही तर फार मोठं सामाजिक व खऱ्या समाजहित चिंतकांच खूप मोठं नुकसान होत असतं.... कारण जीवनातील वेळ, पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो... अनपेक्षित चुकीच्या प्रवृत्तींना बळ मिळतं.. यातून एखादा "ढेंड्या" मोठा होतो आणि समाजाचा लिलाव होतो...  समाज प्रवाहाबाहेर फेकला जातो. 

         असला प्रकार संघटनेच्या बाबतीत कुठे होऊ नये कारण, "संघटना" कुठल्याही समाजाचा आत्मा असतो. संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेला समाज एक कृतिशील तसेच आत्मनिष्ठ आणि कार्यप्रवण प्रगल्भ समाज असतो. अशा त्या संघटना समाजामध्ये सातत्याने परिवर्तन तसेच प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. अशा संघटना म्हणजे काय याचा विचार केला तर एका "विशिष्ट विचारसरणीच्या आधारे संघटित होऊन विशिष्ट कार्यपद्धतीनुसार विशिष्ट ध्येयासाठी कार्य करणारा संघटित प्रवाही गट म्हणजेच संघटना होय"


धनगर संघटनांना आत्मपरीक्षणार्थ, समाजहितार्थ सदर लेखन प्रपंच....

यामध्ये काही आक्षेप असल्यास कृपया

९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद साधू शकता....




डॉ प्रभाकर लोंढे

Wednesday, November 3, 2021

शहीद दिवाली

 शहीद दिवाली


पुरा देश मना रहा है पापा 

आज देश का त्योहार दिवाली

हर घर मे है घरवाला और घरवाली

अपना ही तो घर है पापा 

जहाँ आपकी आस मे मा जी रही अकेली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यु खेल रहे हो होली.


समज सकता हू पापा 

आपका ईमान और राष्ट्रभक्ती 

पर यहा कौन जान रहा है 

आपके जिंदगी की क्या है 

होली और दिवाली 

फिर भी पापा आप सीमा पर

क्यू खेल रहे हो होली..


सालोसाल बीते पापा आपके 

सरहद्द और सीमा पर 

करते देश और दुनिया की रखवाली 

क्या कभी सवाल आया पापा ?

कितनी सुरक्षित है आपकी घरवाली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली?


एक तो दिन निकालो पापा 

मनाने हमारे साथ दिवाली 

अब तुम्हारी छकुली भी नही रही 

वह भोली भाली.

उसको भी सहा नही जाता अब

आपके बिना ये घर खाली 

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली.


यहा तो सब जी रहे पापा

 मदमस्त वह जिंदगानी 

गुजरता है हर दिन उनका

जैसे मना रहे दिवाली.

पर आपको लडते हुए देखकर पापा 

बंद हो जाती है मेरी बोली.

 फिर भी पापा आप सीमा पर 

क्यू खेल रहे हो होली.


आप तो नही थे इतने

बेवकूफ या पत्थरदिल पापा.

जब मै आप की लाडली छकुली थी

मेरे चिकने चिल्लाने की आवाज 

आपको लगती थी जैसे 

दुश्मन की बंदूक से आयी गोली.

फिर भी पापा आप सीमा पर 

क्यु खेल रहे हो होली?


आज तो आये हो पापा 

क्या मनाऊ गम या खुशीयाली 

पर आपकी बंद सासे ही बता रही है मुझे

मेरी हुई है झोली खाली  

ऐसे मे आपही बताओ पापा 

क्या मनावू मै?

मेरे जिंदगी की होली 

या आपकी शहीद दिवाली....



शब्द प्रभू

डॉ प्रभाकर लोंढे

Sunday, December 20, 2020

ऋणानुबंध

 ऋणानुबंध


जेव्हा आपलेच 

आपल्याला खेटतात,

नकळत लुटतात.

पुन्हा नाक वर करून भेटतात.

तेव्हा होतो वेदनांचा 

महाभयंकर कडकडाट,

मनाचा थरथराट.


अशा विस्फोटक अवस्थेत

दु:खानी भरलेल्या ढगातून

नकळत ढसाढसा 

अश्रुंचा पाऊस बरसावा.

अन् आलेल्या महापुरात

वाहून जावी ती 

दु:खांची जळमटं.

निर्विकार नात्यांसाठी....

अन् त्या नात्यांच्या समृद्धीसाठी.....


हे शक्य होत नाही

तेव्हा उभा राहतो 

नात्यांचा महाभयंकर कलह

नात्यांच्याच विरोधात

अणि त्या कोलाहलात

नष्ट होवून जातात नाती...

मग रक्ताची असो वा 

असो जिव्हाळ्याची....


डॉ प्रभाकर लोंढे

मातृदेवता

 मातृदेवता


असेल कोट्यावधी देवता

या जगात‌ पण 

माझा देव जन्मदात्या मायेत आहे 

गाई मध्ये काय शोधता राव

तिच्यातही वासराची माय आहे.


ज्या घरात माय आहे

तेथे एकाच काय ?

सर्वच देवाचा वास आहे.

मायेशिवाय घर म्हणजे

घर नसून वनवास आहे.


अरे जाणून घ्या 

घरातील वृद्ध मातेचं महत्त्व

ती तर घरातील स्वास आहे.

करीत असेल जराशी किटकिट

पण तिच्या प्रत्येक कृतीला

तुमच्याच भल्याचा ध्यास आहे.


दगडांना नवस अन्

पोथ्या पुराणं वाचत बस

यापेक्षा जन्मदात्या मातेला

देवता माणून घराचच

मंदिर बनविणारा जगातील खास आहे.

विचारता काय राव 

त्याच्याच जगण्याला माणूसकीचा वास आहे...



डॉ प्रभाकर लोंढे

Sunday, July 19, 2020

वर्तमान सासूबाई

वर्तमान सासूबाई

बर आहे सुनबाई
तुमचा जमानाच मोठा हाय.
तुमच्या या जमान्यात
आता काहीच कमी नाय.

खिशात तुमच्या नवरा अन्
तुमची हवाच अलग  हाय.
वृद्धाश्रमात जाऊन पडली
जरी तुमच्या नवऱ्याची माय.

बेस वाटते तुम्हाले
तुमचे जन्मदाते बाप माय.
नवऱ्याचे मायबाप तुम्हाले,
काव्हून सहन होत नाय?

हाच होय काय नविन
तुमचा जमाना अन् फ्रेंड बाय.
रोजच घसरताना दिसतोय,
तुमचा जागोजागी पाय.

सासरा झोपला उपाशी
अन् सासू कन्हत हाय.
मोबाईल वर गेम खेळताना
कशी लाजही वाटत नाय?

सगळे झाले ऑनलाईन
म्हणे उधारीवर भेटते बाप माय.
तुमच्या जमान्यात लेकराले
मायेची माया कळेल काय?

चालवा बाई तुम्ही मोबाईल
अन् तुमचं ते व्हाय फाय.
पोरांनं लाथ मारल्यावर म्हणाल,
हे कसं झालं वो माय!

वटयात रडते लेकरू
गोठ्यात हंबरते गाय.
तुमच्या पेक्षा बरी वाटते वो
त्या वासराची माय.....

पिझ्झा, बर्गर, पुन्हा काही
जसी तुम्हा सुटली खाय खाय.
अन्नासाठी भटकते वो
त्या गरिब लेकरांची माय..

बदला बाई किती बदलायचं तर,
जमाना तुमचाच नक्की हाय.
जिवंत ठेवा फक्त ती,
तुमच्यातली लेकरांची ती माय..


                       तुझीच सासू
________________________________

डॉ प्रभाकर सीमा लोंढे
गोंदिया ९६७३३८६९६३

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..


                             डॉ प्रभाकर लोंढे


            समाजात जगत असताना मनुष्य नेहमी भावना व बुद्धी या दोन्हीच्याच भरोशावर जीवनातील निर्णय घेत असतो. बहुतांश वेळा जास्तीत जास्त निर्णय हे बुद्धीपेक्षा भावनेच्याच भरोशावर घेतले जात असतात. परंतु भावनेच्या भरोशावर घेतलेले निर्णय चुकीचे सुध्दा होवू शकतात. त्यामुळे माणसाच्या बुद्ध्यांक(I.Q) पेक्षा भावनांक(E.Q) हा अतिशय योग्य रीतीने वापरणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते असे असले तरी परंतु जेव्हा या भावनेला बुद्धीची जोड मिळत असते तेव्हा ते निर्णय योग्य व परिस्थितीसापेक्ष दीर्घायुषी व हितकारी होत असते. म्हणून कधीही भावनेपेक्षा बुध्दी ला जास्त महत्व देणे कधीही श्रेष्ठ ठरते.
               धनगर जमातीच्या आजच्या संक्रमणावस्थेचा विचार करता त्यामध्ये धनगर नेत्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असून त्यांनी घेतलेले निर्णय हे जमातीसाठी, जमातीच्या तसेच नेत्यांच्या भविष्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे. तेव्हा धनगर नेत्यांनी केवळ भावनेच्या आधारे निर्णय न घेता त्याला बुद्धीची विशेष जोड देऊन प्रत्येक निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण हजारो सामान्य माणसे चुकले तरी त्याचे वैयक्तिक परिणाम होतील परंतु जर एक नेता जर चुकीचे वागत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. याचे अनुभव धनगर जमातीकडे खूप मोठे आहेत. त्यामुळे इथे उल्लेख करण्याची गरजच वाटत नाही.
              धनगर जमात आज ज्या प्रश्नांना समोर जात आहे, ज्या प्रश्नांमुळे संपूर्ण जमात अस्वस्थ आहे, ज्या प्रश्नांमुळे तरुण वर्ग पेटून उठलेला आहे, ते सर्व प्रश्न धनगर जमातीच्या इतिहासातील नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे व राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेले आहे. भूतकाळातील धनगर नेत्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती सापेक्ष मनात कोणताही कलुषित भाव न ठेवता योग्य ते निर्णय घेतले असते तर आज धनगर जमात प्रगतीच्या शिखरावर राहिली असती. परंतु व्यर्थ!!
          इतिहास नेहमी मार्गदर्शन करीत असतो, झालेल्या चुका सुधारण्याची संधी देत असतो व भविष्याकडे वाटचाल करीत असताना झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुद्धा शिकवतो. हीच बाब या ठिकाणी प्रत्येक धनगर नेत्यांनी(मानत असेल तर) लक्षात घेणे आवश्यक आहे तरच ते जमातीचा विश्वास संपादन करू शकतात. कारण आज धनगर जमातीतील तरुण वर्गाच्या भावनेचा आदर करून बुद्धीच्या आधारे निर्णय घेणारे नेतेच धनगर जमातीचे नेतृत्व करू शकतात हे प्रयोगाने सिद्ध झालं आहे. या अवस्थेमध्ये धनगर जमातीची कार्यक्षमता लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे अश्या परिस्थितीत परिस्थिती सापेक्ष (व्यक्तीसापेक्ष नाही)असे निर्णय घेत असताना धनगर नेत्यांनी स्वतःच्या भावनेपेक्षा बुद्धीला शाबूत ठेवून, प्रमाण मानून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे
                  याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आज  खोट्या गुन्हयांच्या आधारे जे धनगर तरुण तुरुंगात आहे त्यांना निर्दोष मुक्त करणे, त्यासाठी सरकारवर आवश्यक तो दबाव निर्माण करणे हा धनगर नेत्यांनी भावनेपेक्षा बुद्धीच्या आधारे घेतलेला निर्णय हा केवळ समाजाच्याच हिताचा नाही तर धनगर नेत्यांच्या सुध्दा खाजगी हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी फायद्याचाच ठरणार आहे. भलेही या आंदोलनकर्त्यांचा प्रचंड राग काही धनगर नेतृत्वामध्ये असेल, अद्दल घडविण्याचा काहींना अभिमान ही वाटत असेल, पुन्हा धनगर जमातीचे तरुण रस्त्यावर उतरणार नाही याचा बंदोबस्त केल्याचा काहींना विश्वासही वाटत असेल.
            हे त्यांचं थोड्या फार प्रमाणात खरं असल तरी ते पूर्ण सत्य होवू शकत नाही. सत्य समजून घेणे व ते स्विकारण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. सरकारने केलेल्या फसवणुकीची चीड, त्यामध्ये असलेली धनगर नेत्यांची भूमिका, यातून धनगर जमातीतील तरुणांमध्ये निर्माण झालेली उद्विग्नता, यापुढे धनगर तरुणांना नक्कीच शांत बसू देणार नाही आणि म्हणून असे ते धनगर तरुण विद्यमान नेतृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या आंदोलनकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील, कोणावर वैयक्तिक टिका, कोणत्या नेत्यावर वैयक्तिक रागही व्यक्त केला असशील,  तरी परिस्थिती, जमातीची भावना व शुद्ध फसवणूक समजून घेवून त्यांना उदार अंतःकरणाने जमातीचे प्रगल्भ नेतृत्व या नात्याने माफ करण्याचा, निर्दोष मुक्त करण्याचा, (लोकशाहीमध्ये जाब विचारणे गुन्हा नसतो)  निर्णय धनगर नेतृत्वाला नक्कीच दीर्घायुष्य देईल व त्यांनी घेतलेला निर्णय हा जमातीला नेहमीच स्वीकारार्य राहील यात कोणतीच शंका असू शकत नाही.
---------------&-----------------

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास___________&_____________________धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासकडॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, June 19, 2020

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

डॉ प्रभाकर लोंढे

         कुठलीही चळवळ ही एका विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत असते. त्या विचाराला मानणारी मंडळी जुळत जातात. तन मन धन देऊन चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्येक चळवळीला कार्यकर्त्यांमुळे खरी बळकटी येत असते. त्यातून चळवळ शक्तिशाली होवून आपला मार्गक्रमण करीत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका असते त्यावेळी सामान्य जनता हा चळवळीचा मुख्य आधार असते. चळवळीतील कार्यकर्ते हे चळवळ व सामान्य जनता याना जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा असते. त्या कार्यकर्त्यांमुळेच जनसामान्यांचा चळवळीवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जातो. आणि तीच चळवळीची खरी ताकद असते. 
     सामान्यांचा व कार्यकर्त्यांचा विश्वास ही चळवळीची ताकद असल्यामुळे ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. व ती नेतृत्वाची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय सामान्य जनता तसेच कार्यकर्ते यांचा विश्वासघात होणार नाही शिवाय चळवळीला कोणतेही नुकसान होणार नाही या दोन दृष्टीने होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच निरंतरता व गतिशीलता हे दोन गुण सदासर्वकाळ चळवळीच्या सोबत राहू शकतात. 
        चळवळ ही कोणाही एका व्यक्तीमुळे नाही तर विचारांमुळे ध्येयाच्या दिशेने प्रवाहित असते. त्यामुळे विचार हा नेहमी चळवळीचा गाभा असलाच पाहिजे. विचारांच्या आधारे निर्माण झालेल्या चळवळीला दिशा देण्याचे कार्य मात्र नेतृत्व करीत असते. त्यामुळे नेतृत्वाने आपली  विवेकनिष्ठा व ध्येयनिष्ठा सोबतच समाजनिष्ठा जपलीच पाहिजे, कारण  नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे चळवळीचे भवितव्य ठरत असते.   
          नेतृत्वाविषयी जनमानसात निर्माण झालेली विश्वासार्हता ही नेतृत्वाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता सोबतच जनभावना व तिचा आदर यावर अवलंबून असते. जनभावनेशी जुळलेली चळवळ वेगाने फोफावत असते. परंतु तिचा अनादर झाला तर त्याचे वाईट परिणाम नेतृत्वावर नाही पण चळवळ व कार्यकर्ता यांच्या वर होतात. कार्यकर्त्यांची तर फार मोठी फजिती होते. कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला सुध्दा जागा नसते. कारण सामान्य जनतेपर्यंत नेता नाही तर कार्यकर्ता जात असते. चळवळीतील कार्यकर्ताच सामान्य ते असामान्य यांपासून चळवळीसाठी तन-मन-धन जमा करीत असते. त्यामुळे चळवळीतील नेतृत्वाने जनभावनेचा आदर करीत सर्व बाबतीत निर्णय घेणे, पारदर्शकता जपणे अतिशय आवश्यक आहे. 
       चळवळीमध्ये व्यक्ती व व्यक्तीसंबंधी भक्ती या दोन गोष्टी चळवळीला अतिशय मारक असतात. त्यामुळे नेतृत्वाचे विचार व कृती यांचे कार्यकर्त्यांकडून नेहमी समीक्षण व्हायलाच पाहिजे. याच आधारे नेतृत्वाच्या खाजगी कर्तुत्वाचे पोवाडे नाही तर सामाजिक कार्याचा आलेख मांडायला काही हरकत नाही. परंतु तो भक्ती स्वरूपाचा नसावा. त्यासाठी कार्यकर्त्यांची नेतृत्वावर श्रद्धा असलीच पाहिजे परंतु ती अंधश्रद्धा नसावी.
           धनगर चळवळी उभ्या राहत असताना चळवळीतील ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वांनी समजून घ्याव्या. त्यादृष्टीने कार्य करावे
नाहीतर अनेक महान आत्मे (नेते)जन्माला येतील, चळवळ मात्र जागेवर मरून जातील, कार्यकर्ते कडीपत्यासारखे स्वाद घेवून (वापरून) फेकले जातील, सामान्य माणसांमध्ये नैराश्य, औदासिन्य सातत्याने पहायला मिळतील. सामाजिक प्रश्न जागचे जागेवर पिढ्या बरबाद करतील. समाज मात्र भरकटत राहतील. 
          हे होवू नये असं जर वाटत असेल तर चळवळी भरडल्या जाणार नाही यादृष्टीने सर्वांनी आपली कर्तव्य भावना जपावी. ही विनंती त्यासाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!

डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३..