Sunday, October 16, 2022

आजचे मतदारसंघ म्हणजेच ऐतिहासिक किल्ले...

 आजचे मतदारसंघ म्हणजेच ऐतिहासिक किल्ले...


डॉ प्रभाकर लोंढे 



धनगरांचा इतिहास आणि त्यातही पेशवाईच्या इतिहास जर पाहिला तर मराठ्यांच्या पराक्रमांमध्ये धनगरांच्या तलवारीचा पराक्रम महान होता. म्हणूनच काश्मीर ते कन्याकुमारी कच्छ गुजरात ते बंगाल अशा संपूर्ण भारतात धनगरांच्या हातात असलेल्या राजकीय सत्तेने विकासाची काम केली.. याचे नमुने आजही पाहायला मिळतात. 

        तत्कालीन धनगरांना ते तेव्हा शक्य झालं कारण ते तत्कालीन परिस्थितीनुसार  धनगर वागले. त्यांनी तलवारीच्या भरोसावर प्रत्येक किल्ले काबीज केले. काही मुसद्देगिरीच्या भरोशावर मिळवून घेतले. काही किल्ले पराक्रमाने शासकाला प्रभावित करून मिळवून घेतले. कारण किल्ले ही तत्कालीन राजकीय सत्ता प्राप्तीची केंद्र होती. त्या किल्ल्यांमधून त्यांनी आपली स्वतःची प्रशासन यंत्रणा, आपली कायदे व्यवस्था स्वतःच निर्माण केली, किल्यां मधून राज्यव्यवस्था चालविली जात होती. याचे उत्तर उदाहरण म्हणजेच "होळकरशाही".....

      याशिवाय धनगरांच्या जीवनातील किल्ल्यांचे दुसरे उदाहरण देता येईल. (ज्यावर मी यापूर्वी स्वतंत्र असा लेख लिहिला होता). "आसा अहिर" नावाच्या धनगरांनी एक किल्ला बांधला होता, अत्यंत कठीण,  शत्रूंनी स्वबळावर कधीही पराक्रमाने जिंकलेला नाही, तर केवळ फंद फितूरी करूनच जिंकता आला, हा त्यांचा इतिहास. त्याला "दख्खनद्वार" म्हटलं जात होतं, तो असिरगड.. उत्तरेतील ज्याला कोणाला दक्षिणेवर राज्य करायचं असेल त्याला सर्वप्रथम असीरगड जिंकावा लागत होता. म्हणूनच त्याला दख्खन द्वार म्हटलं जातं...

           एवढे मोठे किल्ले व त्या किल्ल्यांमधून राजकीय सत्तेचं संचलन धनगरांनी केलं असेल तर आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये धनगरांना मतदार संघाच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करणं का शक्य नाही?

       ती राजकीय सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून मतदारसंघ हे राजकीय सत्ता प्राप्तीचे महाद्वार आहे.  त्या महाद्वारात प्रवेश करणार नाही तोपर्यंत आम्हाला सत्तेची दारं कधीच उघडी होणार नाही. तोपर्यंत आम्हाला चोरवाटांनीच सत्तेपर्यंत जावं लागेल. तोपर्यंत  सत्ता हे धनगरांसाठी लोकशाहीतील दिवास्वप्नच असणार आहे.

             लोकशाहीचं वास्तव हेही आहे की, प्रत्येक मतदारसंघात मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी झाल्याशिवाय सत्ता हस्तगत करता येत नाही. म्हणून विविध सामाजिक समीकरणे जोडून लोकांचा विश्वास संपादन केल्यास निवडणुकीच्या प्रसंगी त्या विश्वासाला सत्तेपर्यंत जाण्याचं साधन बनवता येईल. त्यासाठी तसा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण या जगातील सत्य हा परमेश्वर सुद्धा प्रयत्नाने प्राप्त होतो, असाच जनतेचा विश्वास आहे.

      सत्ता प्राप्तीचा अतिशय महत्त्वाचा आणि धनगरांसाठी गंभीर असलेला विषय म्हणजे "उमेदवारी प्राप्त करणे". आज पर्यंत या महाराष्ट्रात कुठल्याच मोठ्या पक्षांनी धनगरांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात तर सोडाच कधी उमेदवारीच दिलेली नाही. त्यांना सत्तेची दारं बंद कसे करता येतील, याचाच विचार केलेला आहे. तेव्हा जिथे मिळत असेल तिथे उमेदवारी प्राप्त करून जनतेच्या विश्वासाला पात्र होणे. त्या विश्वास संपदानातून सत्ता संपादन करणे आणि सत्ता संपादनातून जमातीच्या इतिहासातील असलेल्या वैभवाला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, अत्यावश्यक आहे.

        त्यासाठी तत्कालीन ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे आजचे "मतदारसंघ" काबीज करण्याशिवाय धनगरांकडे दुसराही पर्याय नाही...



----------------------


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

 खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

डॉ प्रभाकर लोंढे


         दोन दिवसापूर्वी एक (सौरभ हटकर आणि संतोष महात्मे) या दोन बांधवांचा वाद- संवाद ऐकला, त्या संवादामध्ये आदरणीय संतोष महात्मे यांनी एक वाक्य वापरले, की, "धनगरांच्या प्रश्न/ आंदोलनामुळे डॉ. विकास महात्मे साहेबांना  खासदारकी मिळालेली नाही, तर त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, पद्मश्री (लता मंगेशकर प्रमाणे) या बाबींमुळे त्यांना खासदारकी मिळाली. त्यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा सोडला तर हे ऐकून खूप चांगलं वाटलं. परंतु मला एक प्रश्न निर्माण झाला आणि तो वारंवार सतावतो आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच... की, 

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे/वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे खासदारकी मिळाली होती!?

      याचे उत्तर "होय" असेल तर अतिशय उत्तम, कारण ही व्यवस्था धनगरातील गुणवत्तेची कदर करायला लागलेली आहे.

महाराष्ट्रातील नेत्रतज्ञ क्षेत्रातील पद्मश्री प्राप्त एक महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉ. 'विकास महात्मे' असं मला वाटत होतं. इतकं मोठं "नेत्रतज्ञ" म्हणून महत्त्वाचं व्यक्तीत्व धनगर जमातीत असल्याचा अभिमान प्रत्येकालाच वाटावा,  ही अत्यावश्यक बाब असली तरी 2013 पूर्वी डॉ. विकास महात्मे साहेब धनगर असल्याचा अनेकांना संशय येत होता. त्या अगोदर त्यांनी कधीही स्वतःला धनगर म्हणून प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. किंवा  धनगरांच्या     

कुठल्यातरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधीच आढळलेले नाही. (कदाचित असेलही? ) परंतु मला माझ्या 2003 पासूनच्या धनगर जमातीच्या अभ्यासामध्ये दिसले नाही. होऊ शकते माझा अभ्यास तिथंपर्यंत पोहोचला नसावा....

         खरं काय ते संपूर्ण समाज जाणतो आहे. २०१३-१४ च्या समस्त धनगरांच्या दृढ भावनेच्या आधारे तन-मन-धनातून उभं राहिलेलं जनआंदोलन त्यांच्या घटनात्मक अधिकारासाठी होतं. वर्षानुवर्षीपासून चालू असलेला अन्याय आता संपणार, त्यासाठी सर्वांनी मिळून मोठ्या ताकतीने व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारला. संपूर्ण महाराष्ट्र धनगरांच्या मोर्चा, आंदोलन उपोषण यांनी वेठीस धरला, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात धनगर जमात आहे, याची प्रचिती सर्वांना आली. इतरांना धनगरांच्या संख्येची जाणीव झाली. ‌

      धनगरांच्या आंदोलनाची धग, त्या आंदोलनातील आक्रोश, आवेश आणि उर्मी पाहून येथील व्यवस्था व प्रस्थापित नेते घाबरले होते हे मात्र नक्की.. अशा त्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला एकछत्री नेतृत्व देणे हा धनगरांपुढे मोठा प्रश्न होता. 

      पहिल्याच अडाणी, अशिक्षित धनगरांना त्या "पद्मश्री व नेत्रतज्ज्ञ" शब्दाची भुरळ पडली. पहिलाच भावनाप्रधान समाज आणि त्यातही नेतृत्वाचा अभाव, यामुळे सर्वांनी त्या पद्मश्री व नेत्रतज्ञ या शब्दाला हृदयात घेऊन डॉ. विकास महात्मे साहेबांचा नेतृत्व म्हणून स्वीकार केला.  

       धनगर आंदोलनाचं नेतृत्व आता डॉ. विकास महात्मे साहेबांनी आपल्याकडे घेतलं.  देवभोळ्या, अंधश्रद्धाळू, अंधविश्वासू धनगरांच्या आंदोलनाचं भवितव्य आता महात्मे साहेबांच्या हातात आलं.. त्यानंतर धनगरांचंं आंदोलन टप्प्याटप्प्याने कसं शांत शांत होत गेलं, हे मी किंवा इतर कोणी समाजाला किंवा अन्य कोणाला सांगण्याची गरज नाही, प्रत्येक जण ते जाणतो आहे. 

       इतिहासात राजकीय सत्ता भोगणाऱ्या धनगरांना आज आपण येथील राजकीय सत्तेत नसल्याची कधी नव्हे ती जाण झाली. ती काही वेळेस करून देण्यात आली. धनगरांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी डॉ. विकास महात्मे साहेबांची राज्यसभेसाठी सेटिंग सुरू झाली.

          पहिलेच धनगरांच्या आंदोलनाने घाबरून गेलेल्या व्यवस्थित प्रस्थापित नेत्यांनी ही बाब हेरली. आणि धनगरांचं आंदोलन दडपायचं असेल तर "नेताच" आपल्या काबूत घ्यायचा, या तत्त्वाने डॉ. विकास महात्मे साहेबांना राज्यसभेमध्ये खासदारकी देण्यात आली. डॉ. विकास महात्मे साहेबांनी स्वीकारली. धनगरांचे प्रश्न राजदरबारी मांडण्यासाठी मी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली, आसा काही ठिकाणी स्वतः डॉ साहेबांनी कबुली जवाब सुद्धा दिला. याचे साक्षीदार समाजात अनेक आहेत.

        राज्यसभेतील गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी धनगरांच्या प्रश्नाला किती मार्गाला लावलं? किती प्रश्न सोडवले? कितीला पाने पुसली? हे आदरनीय डॉ विकास महात्मे साहेबांचे वैयक्तिक प्रश्न असले तरी धनगरांच्या आंदोलनाचा त्यांच्या राज्यसभेतील खासदारकीमध्ये १००% वाटा ते नाकारू शकत नाही. सहा वर्षे खासदारकी उपभोल्यानंतर जर ती खासदारकी पद्मश्री व नेत्रतज्ञ म्हणून मिळाली होती, असं  माननीय संतोष महात्मे साहेब किंवा कोणी म्हणत असेल तर यापुढे सुद्धा ती कायम राहिली पाहिजे.... त्यासाठी डॉ. महात्मे साहेब प्रयत्न करतील. राज्यसभेमध्ये जातील परंतु आपल्या राजकीय जीवनातील धनगरांचे स्थान ते कदापिही विसरू शकणार नाही. त्यांना विसरता येणार नाही.

       ते अगदी खर आहे की, त्यांच्या पद्मश्री व नेत्रतज्ञ यामुळे त्यांना धनगर समाजाने स्वीकारलं. डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे ते धनगरांच्या गळ्यातील ताईत बनले.  आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना धनगरांसाठी खासदारकी दिली.. 

एवढं सर्वांना मान्य करावंच लागेल की, डॉ. महात्मे साहेबांच्या खासदारकीचा/ त्यांच्या राजकीय जीवनाचा मार्ग धनगराच्या आंदोलनातून जातो हे सर्वांना सदा सर्वकाळ मान्य करावंच लागेल.   

         हे सत्य आहे की, राजकीय नेत्यांना खोटं बोलावचं लागतं परंतु धनगर नेत्यांनी जमातीत खोटं बोलू नये. जेवढं बोलायचं आहे, तेवढे धनगराच्या हितासाठी बाहेर जाऊन बोलावं,  धनगरांमध्ये कोणीही भ्रम पसरवू नये. चुकीच्या बाबीचे कोणीही समर्थन करू नये, एवढीच या लेखणा मागची अपेक्षा आहे..


(सदर लेखाला आ. डॉ. विकास महात्मे साहेबांच्या भक्त किंवा विरोधकांनी भावनात्मक न होता वाचावा. ही विनंती)


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

Monday, October 10, 2022

धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?

 धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?


डॉ प्रभाकर लोंढे


            परळी म्हणलं तर मुंडे, संजय राठोड - दारव्हा, नारायण राणे परिवार-सिंधुदुर्ग कोकण, पवार परिवार- पुणे बारामती,  गोंदिया+भंडारा- प्रफुल्ल पटेल, नाशिक- भुजबळ परिवार, गडकरी- नागपूर, फडणवीस- नागपूर, सांगोला-स्व गणपत आबा देशमुख, अकोला- प्रकाश आंबेडकर, नवनीत रवी राणा- अमरावती अशी अनेक मतदार संघ आपल्याला सांगता येईल की; ज्यांची ओळखच त्या राजकीय नेत्याच्या नावाने झालेली आहे. याचा अर्थ त्यानी त्या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला बनवलेला आहे. आपली स्वतःची ओळख त्या मतदारसंघाच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. त्या त्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढवून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे केवळ आपला जातीच्या नाही तर विविध समाजातील कार्यकर्त्यांची फौज आहे..‌‌         

      जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता मिळाली तेव्हा राजकीय सत्तेचा वापर करून तेथील विकास कामांना महत्व देऊन सामाजिक समीकरणे आपल्याला पोषक करून घेतलेली आहे. जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. तेथे आपला सातत्याने विजय होत राहील याची काळजीच नाही तर नियोजन केलेला आहे. परिणाम तर त्या त्या मतदारसंघातून त्यांना हरविणे कठीण नसले तरी सहज शक्य होत नाही.. 

      या ठिकाणी सांगायचं हेच आहे की त्या त्या नेतृत्वाची तेथील जनमाणसामध्ये

राजकीय सत्तेत असो वा नसो एक छबी निर्माण झाली, त्यांनी त्या मतदारसंघात आपला सत्तेत जाण्याचा मार्ग निश्चित केलेला आहे. 

      त्यांनी कधीही आपल्या जातीचं, जातीच्या प्रश्नांचं, जमातीच्या भावनांचं भांडवल केलेलं दिसून येत नाही, किंवा आपल्या जातीचे भावनात्मक मुद्दे घेऊन त्यांनी कधी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेलं नाही. (याचा अर्थ ते त्या विशिष्ट जाती जमातीचे नाहीत असा होत नाही),  त्यामुळेच ते विशिष्ट जातीचे नेते आहेत, या आधारे त्यांना कधी जनतेने स्वीकारले नाही. विविध जाती जमाती मध्ये त्यांचे असलेले कार्यकर्ते हाच त्यांच्या सर्वांगीण शक्तीचा उगम स्त्रोत असतो.

         धनगर जमातीच्या विद्यमान नेत्यांमध्ये काही विशिष्ट अपवाद नेते सोडले तर ते केवळ धनगर जमातीच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  आपण त्या धनगर जमातीचा महाराष्ट्राचा मोठा नेता आहो.  किती मोठ्या प्रमाणात धनगर माझ्या पाठीमागे आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे ते का करतात? त्यांचं त्यांनाच माहित. परंतु पक्षश्रेष्ठीला खुश करून जमातीच्या बहुसंख्येच्या आधारे आपल्याला एखादं राजकीय पद मिळावं, ही अपेक्षा नाकारता येत नाही. 

        आणि आज पर्यंतच्या बहुतांश धनगर नेत्यांचा तो छुपा अजेंडा राहिलेला आहे, हे अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. तेव्हा हे नेते अखंड महाराष्ट्रामध्ये धनगरांचे नेते म्हणून मिरवत बसण्यापेक्षा एखाद्या मतदारसंघांमध्ये आपलं वजन का निर्माण करीत नाही??  एखाद्या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे का बांधत नाही?? त्या विशिष्ट मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना घेऊन पक्षश्रेष्ठींकडे का जात नाही?? मतदारसंघांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन त्या मतदारसंघात आपली स्वतःची ओळख का निर्माण करून घेत नाही??

जमातीच्या प्रश्नांच्या भांडवलाच्या आधारे एखाद्या वेळेस आमदारकी खासदारकी उपभोगल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच भावनात्मक मुद्द्यांच्या आधारे स्वतःचं राजकीय स्वहित का साध्य करू इच्छितात?

         विधानसभा राज्यसभेच्या माध्यमातून मिळालेल्या राजकीय सत्तेतून किंवा अन्य मार्गातून मिळालेला अमाप पैसा, त्यातून कार्यकर्ता निर्माण झाला असताना एखाद्या मतदारसंघावर ते केंद्रित का होत नाहीत? त्यांना लोकमताच्या आधारे निवडून जाण्याची हिंमत का होत नाही??हा मोठा प्रश्न निर्माण होतो व वैतागून समर्पक उत्तरासाठी सार्वजनिक करावासा वाटतो..


उत्तराच्या अपेक्षेत! प्रतिक्षेत!!


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि राजकीय जागृतीचा अभ्यासक)