Monday, August 20, 2018

धनगरांवरील अन्यायाचे सर्वाधिक श्रेय कोण धनगर नेता घेणार?
 
                     डॉ प्रभाकर लोंढे


             ज्याप्रमाणे या देशांमध्ये सर्वाधिक कर्तबगार व  पराक्रमी जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख करता येतो, त्याचप्रमाणे अलीकडील काळात भारतीय लोकशाहीमध्ये या जमातीवरील अन्यायाची फार मोठी लांबलचक यादीच तयार होऊ शकते.  हे सर्व अन्याय सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, इतिहास लेखन, या सर्व प्रकारांमध्ये आपणास वर्गीकृत करता येते. यामध्ये याला जबाबदार कोण? व हे अन्याय, अत्याचार का झाले? याचा विचार केला तर ती जबाबदारी सामाजिक दृष्ट्या निश्चित करता येत नसली तरी त्याची जबाबदारी स्वीकारणारा मात्र एकही नेता सापडलेला नाही. किंवा दिसत नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो, त्यामुळे धनगर जमातीतील असे कोणी समोर येतील ही अपेक्षा असणे सहाजिक आहे.
        मात्र दुसरीकडे छोट्या-मोठ्या वेळ काढू फसवणुकीतून बाहेर न काढता अंशतः का होईना मिळालेल्या यशाचे(भोपळा देवून आवळा भेटला तरी) श्रेय घेण्याची संधी मात्र आजचे धनगर नेते सोडत नसल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. मग न झालेल्या विद्यापीठ नामांतराचे असो, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असो, राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाला निधी मिळविण्याचे असो, वाड्या-वस्त्यांवर हायमास्ट लाइट्स लावल्याचे असो, एखादी सरकारी योजना जर घोषित झाली तर त्याचे श्रेय असो, परदेशात न गेलेल्या मेंढ्यांचे श्रेय असो, सरकारी अन्यायाविरोधात आवाज उठविणारे डॉक्टर भिसेंना (उशिरा का होईना) तुरुंगातून बाहेर आणल्याचे श्रेय असो, धनगर आरक्षणा संबंधाने पुरावे गोळा करून न्यायालयात केस टाकण्याची बाब असो, (दोन दिवसांपूर्वी एक धनगर नेता बोलला, की मधु शिंदे साहेब, डॉ जे पी. बघेल साहेब, यांच्या अगोदर आम्हीच न्यायालयात केस टाकणार होतो. सत्य काय ते त्यांनाच माहीत) (आरक्षणासंदर्भात पूरावे सर्वप्रथम गोळा करणारे व आम्हा धनगर  तरूणांना प्रोत्साहित करणारे तरूण तुर्क म्हातारे आकोटचे अघडते गुरुजी मात्र धनगर श्रेयवादाच्या लढाईत बाहेर फेकले गेले हे मात्र विशेष)  असे धनगर श्रेयवादाचे असंख्य उदाहरणे देता येतील. या श्रेय वादाच्या स्पर्धेत जमात भरकटत जाते. हे मात्र आम्ही कधीच कोणी न स्विकारलेलं सत्य!
        सामाजिक हिताच्या दृष्टीने  या ठिकाणी मी माझा श्रेयवादाचा सिद्धांत आपणा समोर मांडतो आहे. श्रेयवाद हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. अशा परिस्थितीत ज्याचे त्याने श्रेय घेतलंच पाहिजे, हा त्याचा नैसर्गिक हक्क!  त्याला दिलंच पाहिजे हे सर्वांच सामाजिक कर्तव्य! मिळालेल्या फळाच्या संबंधाने कर्माच्या प्रमाणात प्रत्येकालाच त्याचं श्रेय मिळणे हा झाला सामाजिक न्याय!
यशाबरोबरच आपल्या अपयशाचेही श्रेय स्वतः स्विकारणे ही प्रगल्भता! एक निष्काम सामाजिक भावनेतून कर्म करतो,  आणि दुसराचं त्याचं फळ व श्रेय लाटतो हा झाला सामाजिक अन्याय, अत्याचार!! किंवा विशिष्ट सामाजिक वातावरणाचा गैरफायदा एखादाच नेता घेतो ही झाली सामाजिक गद्दारी! 
         अशा परिस्थितीत मला धनगर म्हणून नोकरी लागली,  धनगर म्हणून मला मान मिळाला, एखादं छोटं मोठं राजकीय, सामाजिक पद मिळालं, राजकीय पक्षांत वजन वाढलं, . बहुसंख्य असलेल्या धनगर जमातीचा कार्यकर्ता, नेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. समस्त धनगर बांधव मला आपला म्हणून स्विकारतात, माझा शब्द प्रमाण मानतात. ही माझी उपलब्धी नाही तर समाजाने दिलेली माझ्यावर जबाबदारी आहे, म्हणून मी तेवढ्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्यासाठी बांधील आहे. व माझी त्यांच्या प्रती निष्ठा सदैव कायम आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या विश्वासाचा/ भल्याचा विचार केल्याशिवाय मी माझा वैयक्तिक स्वार्थ/हेतू गौण माणून सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देईल. याला म्हणतात सामाजिक प्रतिबद्धता!  हे जर घडत असेल तर जमात नक्कीच विकासाच्या नियोजनबध्द मार्गावर जाईल. भविष्यात जमातीचे चांगले दिवस येईल. परंतु धनगर जमातीमध्ये हे किती प्रमाणात घडतंय हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे.
        काही दिवसातच विद्यमान महाराष्ट्र​ राज्य सरकार,  केंद्र सरकार कडे धनगर आरक्षण संबंधाने शिफारस पत्र पाठवणार किंवा त्यासंबंधाने काही तरी नक्कीच करणार.   हे काही धनगर नेत्यांच्या एकूण वागण्या-बोलण्यावरून सुद्धा स्पष्ट होते, स्पष्ट निदर्शनास येते.शिवाय भावी 2019 ची सार्वत्रिक  निवडणूक व विद्यमान एकूण वातावरण/घडामोडी पाहता निश्चित लक्षात येते. काहींनी तर आपण आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या नावावर सरकारसाठी? कि विरोधात? किती माहोल निर्माण करू शकतो, यासाठी शक्तिप्रदर्शनाचाच खटाटोप लावलेला आहे. "धनगर- धनगड एकच आहेत"  हे आम्ही वर्षानुवर्षे सांगत आलो याकडे कोणीच धनगर नेते लक्ष देत नव्हते, आता मात्र तेच बोंबलताना दिसत आहे. याचं औचित्य मात्र अजून समजलेलं नाही. आरक्षण अंमलबजावणीचे काय होणार! आज जरी सांगता येत नसले तरी या शक्ती प्रदर्शनातून खासदार-आमदारकीच्या सिटा निश्चित होतील हे मात्र खरं आहे.  असंच काहींच्या वागण्या बोलण्यातून वाटायला लागले आहे. त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!! असो .
       धनगरांचा राजकीय विकास कोणत्या ना कोणत्या मार्गातून​ झाला हे धनगरांसाठी, धनगरांच्या राजकीय प्रगतीसाठी हितावहच राहणार आहेत. परंतु स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण धनगर जमात एखाद्या पक्षाला नेऊन बांधणे, जमातीचा स्वाभिमान गहाण ठेवणे, संपूर्ण जमातीचा सत्यानाश करून स्वतःच्या खासदार आमदारकी च्या सीटा निश्चित करणे हे किती संयुक्तिक राहणार हे मात्र काळच ठरवणार आहे. यापुढे तरी धनगरांच्या इतिहासाला लाजवेल अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडणार नाही. अशा प्रकारचे अपयश धनगरांच्या पदरात पडणार नाही. एवढीच माफक अपेक्षा सामान्य धनगर म्हणून आम्ही करू शकतो. कशाही प्रकारे नेत्यांना यश/अपयश जर पदरात पडलं तर मात्र नेत्यांनी त्याचं श्रेय घेण्यासाठी तत्पर राहवे, कारण यशाबरोबरच अपयश जरी हाती लागले, तर धनगर नेता म्हणून ते अवश्य स्विकारावं, कारण तो सुध्दा आपला हक्क आहे.

                  सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक 
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment