Monday, May 7, 2018

धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...


         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!


--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक


डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963

No comments:

Post a Comment