Sunday, December 20, 2020

ऋणानुबंध

 ऋणानुबंध


जेव्हा आपलेच 

आपल्याला खेटतात,

नकळत लुटतात.

पुन्हा नाक वर करून भेटतात.

तेव्हा होतो वेदनांचा 

महाभयंकर कडकडाट,

मनाचा थरथराट.


अशा विस्फोटक अवस्थेत

दु:खानी भरलेल्या ढगातून

नकळत ढसाढसा 

अश्रुंचा पाऊस बरसावा.

अन् आलेल्या महापुरात

वाहून जावी ती 

दु:खांची जळमटं.

निर्विकार नात्यांसाठी....

अन् त्या नात्यांच्या समृद्धीसाठी.....


हे शक्य होत नाही

तेव्हा उभा राहतो 

नात्यांचा महाभयंकर कलह

नात्यांच्याच विरोधात

अणि त्या कोलाहलात

नष्ट होवून जातात नाती...

मग रक्ताची असो वा 

असो जिव्हाळ्याची....


डॉ प्रभाकर लोंढे

मातृदेवता

 मातृदेवता


असेल कोट्यावधी देवता

या जगात‌ पण 

माझा देव जन्मदात्या मायेत आहे 

गाई मध्ये काय शोधता राव

तिच्यातही वासराची माय आहे.


ज्या घरात माय आहे

तेथे एकाच काय ?

सर्वच देवाचा वास आहे.

मायेशिवाय घर म्हणजे

घर नसून वनवास आहे.


अरे जाणून घ्या 

घरातील वृद्ध मातेचं महत्त्व

ती तर घरातील स्वास आहे.

करीत असेल जराशी किटकिट

पण तिच्या प्रत्येक कृतीला

तुमच्याच भल्याचा ध्यास आहे.


दगडांना नवस अन्

पोथ्या पुराणं वाचत बस

यापेक्षा जन्मदात्या मातेला

देवता माणून घराचच

मंदिर बनविणारा जगातील खास आहे.

विचारता काय राव 

त्याच्याच जगण्याला माणूसकीचा वास आहे...



डॉ प्रभाकर लोंढे

Sunday, July 19, 2020

वर्तमान सासूबाई

वर्तमान सासूबाई

बर आहे सुनबाई
तुमचा जमानाच मोठा हाय.
तुमच्या या जमान्यात
आता काहीच कमी नाय.

खिशात तुमच्या नवरा अन्
तुमची हवाच अलग  हाय.
वृद्धाश्रमात जाऊन पडली
जरी तुमच्या नवऱ्याची माय.

बेस वाटते तुम्हाले
तुमचे जन्मदाते बाप माय.
नवऱ्याचे मायबाप तुम्हाले,
काव्हून सहन होत नाय?

हाच होय काय नविन
तुमचा जमाना अन् फ्रेंड बाय.
रोजच घसरताना दिसतोय,
तुमचा जागोजागी पाय.

सासरा झोपला उपाशी
अन् सासू कन्हत हाय.
मोबाईल वर गेम खेळताना
कशी लाजही वाटत नाय?

सगळे झाले ऑनलाईन
म्हणे उधारीवर भेटते बाप माय.
तुमच्या जमान्यात लेकराले
मायेची माया कळेल काय?

चालवा बाई तुम्ही मोबाईल
अन् तुमचं ते व्हाय फाय.
पोरांनं लाथ मारल्यावर म्हणाल,
हे कसं झालं वो माय!

वटयात रडते लेकरू
गोठ्यात हंबरते गाय.
तुमच्या पेक्षा बरी वाटते वो
त्या वासराची माय.....

पिझ्झा, बर्गर, पुन्हा काही
जसी तुम्हा सुटली खाय खाय.
अन्नासाठी भटकते वो
त्या गरिब लेकरांची माय..

बदला बाई किती बदलायचं तर,
जमाना तुमचाच नक्की हाय.
जिवंत ठेवा फक्त ती,
तुमच्यातली लेकरांची ती माय..


                       तुझीच सासू
________________________________

डॉ प्रभाकर सीमा लोंढे
गोंदिया ९६७३३८६९६३

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..


                             डॉ प्रभाकर लोंढे


            समाजात जगत असताना मनुष्य नेहमी भावना व बुद्धी या दोन्हीच्याच भरोशावर जीवनातील निर्णय घेत असतो. बहुतांश वेळा जास्तीत जास्त निर्णय हे बुद्धीपेक्षा भावनेच्याच भरोशावर घेतले जात असतात. परंतु भावनेच्या भरोशावर घेतलेले निर्णय चुकीचे सुध्दा होवू शकतात. त्यामुळे माणसाच्या बुद्ध्यांक(I.Q) पेक्षा भावनांक(E.Q) हा अतिशय योग्य रीतीने वापरणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते असे असले तरी परंतु जेव्हा या भावनेला बुद्धीची जोड मिळत असते तेव्हा ते निर्णय योग्य व परिस्थितीसापेक्ष दीर्घायुषी व हितकारी होत असते. म्हणून कधीही भावनेपेक्षा बुध्दी ला जास्त महत्व देणे कधीही श्रेष्ठ ठरते.
               धनगर जमातीच्या आजच्या संक्रमणावस्थेचा विचार करता त्यामध्ये धनगर नेत्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असून त्यांनी घेतलेले निर्णय हे जमातीसाठी, जमातीच्या तसेच नेत्यांच्या भविष्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे. तेव्हा धनगर नेत्यांनी केवळ भावनेच्या आधारे निर्णय न घेता त्याला बुद्धीची विशेष जोड देऊन प्रत्येक निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण हजारो सामान्य माणसे चुकले तरी त्याचे वैयक्तिक परिणाम होतील परंतु जर एक नेता जर चुकीचे वागत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. याचे अनुभव धनगर जमातीकडे खूप मोठे आहेत. त्यामुळे इथे उल्लेख करण्याची गरजच वाटत नाही.
              धनगर जमात आज ज्या प्रश्नांना समोर जात आहे, ज्या प्रश्नांमुळे संपूर्ण जमात अस्वस्थ आहे, ज्या प्रश्नांमुळे तरुण वर्ग पेटून उठलेला आहे, ते सर्व प्रश्न धनगर जमातीच्या इतिहासातील नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे व राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेले आहे. भूतकाळातील धनगर नेत्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती सापेक्ष मनात कोणताही कलुषित भाव न ठेवता योग्य ते निर्णय घेतले असते तर आज धनगर जमात प्रगतीच्या शिखरावर राहिली असती. परंतु व्यर्थ!!
          इतिहास नेहमी मार्गदर्शन करीत असतो, झालेल्या चुका सुधारण्याची संधी देत असतो व भविष्याकडे वाटचाल करीत असताना झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुद्धा शिकवतो. हीच बाब या ठिकाणी प्रत्येक धनगर नेत्यांनी(मानत असेल तर) लक्षात घेणे आवश्यक आहे तरच ते जमातीचा विश्वास संपादन करू शकतात. कारण आज धनगर जमातीतील तरुण वर्गाच्या भावनेचा आदर करून बुद्धीच्या आधारे निर्णय घेणारे नेतेच धनगर जमातीचे नेतृत्व करू शकतात हे प्रयोगाने सिद्ध झालं आहे. या अवस्थेमध्ये धनगर जमातीची कार्यक्षमता लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे अश्या परिस्थितीत परिस्थिती सापेक्ष (व्यक्तीसापेक्ष नाही)असे निर्णय घेत असताना धनगर नेत्यांनी स्वतःच्या भावनेपेक्षा बुद्धीला शाबूत ठेवून, प्रमाण मानून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे
                  याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आज  खोट्या गुन्हयांच्या आधारे जे धनगर तरुण तुरुंगात आहे त्यांना निर्दोष मुक्त करणे, त्यासाठी सरकारवर आवश्यक तो दबाव निर्माण करणे हा धनगर नेत्यांनी भावनेपेक्षा बुद्धीच्या आधारे घेतलेला निर्णय हा केवळ समाजाच्याच हिताचा नाही तर धनगर नेत्यांच्या सुध्दा खाजगी हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी फायद्याचाच ठरणार आहे. भलेही या आंदोलनकर्त्यांचा प्रचंड राग काही धनगर नेतृत्वामध्ये असेल, अद्दल घडविण्याचा काहींना अभिमान ही वाटत असेल, पुन्हा धनगर जमातीचे तरुण रस्त्यावर उतरणार नाही याचा बंदोबस्त केल्याचा काहींना विश्वासही वाटत असेल.
            हे त्यांचं थोड्या फार प्रमाणात खरं असल तरी ते पूर्ण सत्य होवू शकत नाही. सत्य समजून घेणे व ते स्विकारण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. सरकारने केलेल्या फसवणुकीची चीड, त्यामध्ये असलेली धनगर नेत्यांची भूमिका, यातून धनगर जमातीतील तरुणांमध्ये निर्माण झालेली उद्विग्नता, यापुढे धनगर तरुणांना नक्कीच शांत बसू देणार नाही आणि म्हणून असे ते धनगर तरुण विद्यमान नेतृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या आंदोलनकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील, कोणावर वैयक्तिक टिका, कोणत्या नेत्यावर वैयक्तिक रागही व्यक्त केला असशील,  तरी परिस्थिती, जमातीची भावना व शुद्ध फसवणूक समजून घेवून त्यांना उदार अंतःकरणाने जमातीचे प्रगल्भ नेतृत्व या नात्याने माफ करण्याचा, निर्दोष मुक्त करण्याचा, (लोकशाहीमध्ये जाब विचारणे गुन्हा नसतो)  निर्णय धनगर नेतृत्वाला नक्कीच दीर्घायुष्य देईल व त्यांनी घेतलेला निर्णय हा जमातीला नेहमीच स्वीकारार्य राहील यात कोणतीच शंका असू शकत नाही.
---------------&-----------------

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास___________&_____________________धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासकडॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, June 19, 2020

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

डॉ प्रभाकर लोंढे

         कुठलीही चळवळ ही एका विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत असते. त्या विचाराला मानणारी मंडळी जुळत जातात. तन मन धन देऊन चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्येक चळवळीला कार्यकर्त्यांमुळे खरी बळकटी येत असते. त्यातून चळवळ शक्तिशाली होवून आपला मार्गक्रमण करीत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका असते त्यावेळी सामान्य जनता हा चळवळीचा मुख्य आधार असते. चळवळीतील कार्यकर्ते हे चळवळ व सामान्य जनता याना जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा असते. त्या कार्यकर्त्यांमुळेच जनसामान्यांचा चळवळीवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जातो. आणि तीच चळवळीची खरी ताकद असते. 
     सामान्यांचा व कार्यकर्त्यांचा विश्वास ही चळवळीची ताकद असल्यामुळे ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. व ती नेतृत्वाची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय सामान्य जनता तसेच कार्यकर्ते यांचा विश्वासघात होणार नाही शिवाय चळवळीला कोणतेही नुकसान होणार नाही या दोन दृष्टीने होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच निरंतरता व गतिशीलता हे दोन गुण सदासर्वकाळ चळवळीच्या सोबत राहू शकतात. 
        चळवळ ही कोणाही एका व्यक्तीमुळे नाही तर विचारांमुळे ध्येयाच्या दिशेने प्रवाहित असते. त्यामुळे विचार हा नेहमी चळवळीचा गाभा असलाच पाहिजे. विचारांच्या आधारे निर्माण झालेल्या चळवळीला दिशा देण्याचे कार्य मात्र नेतृत्व करीत असते. त्यामुळे नेतृत्वाने आपली  विवेकनिष्ठा व ध्येयनिष्ठा सोबतच समाजनिष्ठा जपलीच पाहिजे, कारण  नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे चळवळीचे भवितव्य ठरत असते.   
          नेतृत्वाविषयी जनमानसात निर्माण झालेली विश्वासार्हता ही नेतृत्वाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता सोबतच जनभावना व तिचा आदर यावर अवलंबून असते. जनभावनेशी जुळलेली चळवळ वेगाने फोफावत असते. परंतु तिचा अनादर झाला तर त्याचे वाईट परिणाम नेतृत्वावर नाही पण चळवळ व कार्यकर्ता यांच्या वर होतात. कार्यकर्त्यांची तर फार मोठी फजिती होते. कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला सुध्दा जागा नसते. कारण सामान्य जनतेपर्यंत नेता नाही तर कार्यकर्ता जात असते. चळवळीतील कार्यकर्ताच सामान्य ते असामान्य यांपासून चळवळीसाठी तन-मन-धन जमा करीत असते. त्यामुळे चळवळीतील नेतृत्वाने जनभावनेचा आदर करीत सर्व बाबतीत निर्णय घेणे, पारदर्शकता जपणे अतिशय आवश्यक आहे. 
       चळवळीमध्ये व्यक्ती व व्यक्तीसंबंधी भक्ती या दोन गोष्टी चळवळीला अतिशय मारक असतात. त्यामुळे नेतृत्वाचे विचार व कृती यांचे कार्यकर्त्यांकडून नेहमी समीक्षण व्हायलाच पाहिजे. याच आधारे नेतृत्वाच्या खाजगी कर्तुत्वाचे पोवाडे नाही तर सामाजिक कार्याचा आलेख मांडायला काही हरकत नाही. परंतु तो भक्ती स्वरूपाचा नसावा. त्यासाठी कार्यकर्त्यांची नेतृत्वावर श्रद्धा असलीच पाहिजे परंतु ती अंधश्रद्धा नसावी.
           धनगर चळवळी उभ्या राहत असताना चळवळीतील ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वांनी समजून घ्याव्या. त्यादृष्टीने कार्य करावे
नाहीतर अनेक महान आत्मे (नेते)जन्माला येतील, चळवळ मात्र जागेवर मरून जातील, कार्यकर्ते कडीपत्यासारखे स्वाद घेवून (वापरून) फेकले जातील, सामान्य माणसांमध्ये नैराश्य, औदासिन्य सातत्याने पहायला मिळतील. सामाजिक प्रश्न जागचे जागेवर पिढ्या बरबाद करतील. समाज मात्र भरकटत राहतील. 
          हे होवू नये असं जर वाटत असेल तर चळवळी भरडल्या जाणार नाही यादृष्टीने सर्वांनी आपली कर्तव्य भावना जपावी. ही विनंती त्यासाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!

डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३..

Wednesday, June 17, 2020

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज!
  
           डॉ. प्रभाकर लोंढे

संपूर्ण समाज विकास प्रक्रियेतील सर्व समाज घटकांच्या त्या समाजासाठी चाललेल्या कार्याचे निरपेक्षपणे समीक्षण केले असता प्रत्येक समाजामध्ये व त्या समाजाच्या चळवळ, वळवळ, उपक्रम, उपद्रव एकूणच विकास प्रक्रियेमध्ये तीन प्रकारचे लोक कार्य करीत असतात. प्रत्येकाचा उद्देश समाज विकास हाच असतो, असा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो.  हाच त्यांच्यात ठासून भरलेला भाव समाजामध्ये काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करीत असतो. त्याच प्रेरणेने प्रत्येकाचे समाज विकासाच्या नावाने कार्य सुरू असते. आणि त्यातून समाज विकास प्रक्रियेची पावलं पडत असतात. त्या सर्व पावलांचं सरासरी दृष्ट्या चाललेलं मार्गक्रमण समाजाच्या विकास प्रक्रियेचा वेग ठरवत असते.
             माझ्या मते, या सर्व प्रक्रियेत कार्य करणाऱ्यां समाजधुरीणांचे  भक्त, कार्यकर्ता आणि समाजसेवक असे प्रकार आपल्याला वर्णन करता येतात, असं मला वाटत.  असा त्याला पर्यायी विचार सर्वांना नक्कीच करता येईल. तो प्रत्येकाचा अधिकार असतो. आणि तो प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. मात्र सार रूपाने अशा प्रकारचे वर्णन मात्र संयुक्तिक ठरेल. असे वर्गीकरण करताना कितीही कठीण काम असले तरी समाज चळवळीचा ओघ व वेग निश्चित करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे असं मला वाटते.
              धनगर समाजात काम करणाऱ्या या तिन्ही वर्गाची मिळून एकूण संख्या खूप झाले तर १० ते १५ टक्के आहे. त्यातही भक्तांची संख्या अधिक आहे. त्यानंतर तर कार्यकर्त्यांची संख्या व सर्वात शेवटी समाजसेवकांची संख्या फार दुर्मिळ आहे. पहिले दोन वर्ग समाज सेवक हा शब्द कधीकधी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. असो! काही का असेना या दहा पंधरा टक्के लोकांमुळे समाजातील चळवळ व उपक्रम सातत्याने सुरू असतात.  आज समाधान आहे की अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
      आता कोणी म्हणतील या सर्वांची व्याख्या कशी काय करता येईल, हे फार कठीण काम आहे तरी पण मी माझ्या परीने त्याचा प्रयत्न करतो त्यापैकी पहिला प्रकार 
१) भक्त - 
     हा शब्द प्रत्येकानेच ऐकलेला आहे. परंतु समाज चळवळीमध्ये सुद्धा भक्त असतात हे मात्र कदाचित नवीन संकल्पना आहे.  भक्त हा कधीच समीक्षक नसतो. त्याचा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या विचारावर दृढ विश्वास असतो. त्या व्यक्ती किंवा विचार यापुढे जाऊन सुद्धा नवीन काही असू शकते यावर त्याचा कधीच विश्वास नसतो. किंवा स्विकारायला तयार नसतो.  यापुढे जाऊन काहींना तर अंधभक्त शब्द सुद्धा वापरू शकतो. काही भक्त तर एखाद्या व्यक्तीकडे सत्तेचा लाभ किंवा एखाद्याकडून आर्थिक फायदा मिळवून घेण्यासाठी त्या व्यक्तीची भक्ती करतात किंवा करीत असल्याचं सॉंग सुध्दा करीत असतात.  "..........
  चा मी कट्टर समर्थक" अशा भूमिकेतील लोकांचा  यामध्ये समावेश होतो.

२) कार्यकर्ता 
       हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्याकडे स्वतःचा विचार असतो. तो समीक्षक असतो. चांगलं काय? वाईट काय? हे सुद्धा तो समजून घेत असतो. घेण्याच्या पात्रतेचा असतो. विरोधी विचारांचा सुध्दा त्याला आदर असून त्यातील यथार्थता तो समजून घेत असतो. मान्य करीत असतो. असाच विचारी कार्यकर्ता समविचारी कार्यकर्त्यांशी जुळवून घेत असतो आणि त्यामधून समविचारी कार्यकर्त्यांची एक वैचारिक प्रवाही चळवळ निर्माण होत असते. तीच समाजाचे भले करू शकते आणि अशाच चळवळीची समाजाला आज गरज आहे.  तिथे व्यक्तीना नाही तर विचारांना महत्त्व असतं. विचार प्रमाण असतो पण अंतिम नाही. विचाराची सातत्याने समीक्षा होत असते. आणि त्याच्यातून काळ सापेक्ष विचार स्वीकारला जातो. स्वीकारण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी असते. अशा कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढ होणे समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
         
      ३) समाज सेवक - हा समाज कार्यकर्त्यांमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार असून तो खरा समाज सुधारक असतो. त्याला केवळ समाजहिताचा शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची हाव नसते. त्याच्या सर्व बाबी समाज हितासाठीच असतात.  ते समाजहितासाठी केवळ सत्याचे आग्रही असतात. "हाडाचा कार्यकर्ता" शेवटी समाजसेवक  पदापर्यंत पोहचू शकतो. वयाच्या सत्तर च्या दरम्यान असलेल्या अनेक धनगर कार्यकर्त्यांचा समाजसेवक या सदरामध्ये समावेश करू शकतो. माझ्या नजरेत असलेली अनेक नावे मला या ठिकाणी देता आली असती. परंतु याठिकाणी व्यक्तीसापेक्षता टाळण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन स्विकारून मी ती टाळतो आहे. माझ्या साठी ते नेहमी प्रेरणास्थान आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर अशा समाजसेवकाचा शोध घ्यावा ही वाचकांना विनंती
       आता पर्यंत मांडलेले विचार हे माझं मत असल्याने, ते प्रमाण माणण्याची गरज नाही. मात्र त्यावर विचार व्हावा. त्यापेक्षा नवीन विचार समाजासमोर यावा. वैचारिक क्रांती ची पावलं वेगानी पडावी ही मात्र अपेक्षा. 

त्यादृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

Thursday, May 21, 2020

आ. गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आ. *गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..* 
            (कोणीही भावनात्मक होवून वाचू नये)

                 *डॉ. प्रभाकर लोंढे* 

               इतिहासात महाराष्ट्रातील पेशवाईचा काळ सर्वांना अभिमानाची बाब आहे. म्हणून तो समजून घेण्याची  गरज आहे. कारण भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमानाची पावलं भविष्याकडे टाकत असताना आजची व्यवस्था तशी समजून घेतली तर पेशवाईची पूनर्स्थापना होत आहे. *मराठे सरदार पहीलेच मजबूत बनले आहे. ते पेशव्यांना हातात घेऊन प्रसंगी त्यांची मुंडी मुरगाळून सत्ता उपभोगत आहेत.*  याबाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 
          फडणवीस साहेबांनी यापूर्वी मागील पाच वर्षे जी सत्ता उपभोगली तेव्हा *त्यांनी धनगरांना इतकं महत्व दिलं नसलं तरी धनगरांचा साथ मात्र घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.* धनगरांचा आधार घेऊन मराठा सरदारांना शह दिला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटला आहे म्हणून खोटे  का असेना आरक्षणाचे आश्वासन देऊन जानकर साहेब व शिंदे साहेब यांना मंत्री पदापर्यंत सोबत घेऊन आपली पेशवाई मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.  तेव्हा त्यांनी हा विचार केला की येथील मराठा सरदारांना शह देण्यासाठी धनगर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ *त्यांनी पेशवाई व मल्हारराव यांचा पुरेपूर अभ्यास केला आहे.*  तेव्हा त्यांनी ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे की या *धरगरांमधून पेशवाईवर प्रभाव, दबाव आणि वर्चस्व असलेला नवीन मल्हारराव घडणार नाही.* आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल टाकत (माजी मंत्री शिंदे साहेब व इतरांना टाळून) गोपीचंद पडळकर नावाच्या तरुण, उत्साही व्यक्तीला,  *धनगरांना भावनात्मक करू शकेल, तरुणांमध्ये उत्साह भरू शकेल अशा  धनगर उमेदवाराला विधान परिषद दिलेली आहे.*  
          ही विधान परिषद केवळ आणि केवळ धनगर म्हणून दिलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्याप्रमाणे राजश्री *मल्हाररावांशिवाय येथील मराठीशाही किंवा पेशवाईचा झेंडा मातीमोल होता.* (मल्हाररावांनी एकट्याच्या भरोसावर नाही तर आपल्या विविध धनगर सरदारांच्या भरोशावर एवढा वचक निर्माण केला होता. जागोजागी त्यांनी आपली माणसं पेरली होती.) त्याप्रमाणे आजच्या बीजेपीचा झेंडा धनगरांशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून ते मल्हाररावांप्रमाणे धनगरांच्या काही उमेदवारांना हाताशी बाळगत असतात. त्यांना आजच्या लोकशाहीत धनगर मजुरांकडून मल्हाररावांचा पराक्रम अपेक्षित आहे पण वर्चस्व मात्र नक्कीच नाही. *त्यामुळेच ते वारंवार सरदार बदलत असतात.* 
              आज धनगरांना सरदारकी देत असताना आजच्या लोकशाहीतील लोकमताचा भावी काळासाठी विचार करून ते धनगरातील सरदार निवडत असतात.  आज त्यांच्या दृष्टीने असा उपयोगी सरदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ते *वकृत्वाच्या भरोशावर धनगर तरुणांना आपल्या कहेत नक्कीच घेऊ शकतात. तेवढी त्यांची क्षमता सुद्धा आहेत, असं म्हटलं तर चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकत नाही. परंतु ते सर्व गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढील धोरण व महत्वाकांक्षा यावर अवलंबून आहे.* 
          थोर सुभेदार राजश्री मल्हारराव उदयास आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन *धनगर सरदारांचा साथ घेतला होता. त्यांनी बुळे, वाघमोडे, पांढरे, धायगुडे, .......   अशा अनेक धनगर सरदारांना मोठं केलं होतं.* एवढेच नाही तर अनेकांचं  सत्तेत बस्तान बसविलं होतं. अनेकांना आपल्या साम्राज्यात प्रस्थापित केलं होतं.  त्यामुळेच मल्हारराव आपल्या राज्यकारभारात व पेशवाईत यशस्वी झाले होते. त्याच भरोश्यावर त्यानी अटकेपार झेंडे फडकावले होते. ते *त्यांना एकट्याच्या भरोशावर करता आलं नसतं.* 
         आज गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या भूमिकेत हाताशी पकडलं असलं तरी शिंदे साहेब, गणेश हाके साहेब यासह अनेक जुने सरदार बीजेपी मध्ये विद्यमान कार्यरत आहेत. आ. महादेव जानकर साहेब तर गोपीचंद पडळकर साहेबांचे गुरु आहेत. मंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीत असले तरी ते राष्ट्रवादीतील धनगरांचा प्रमुख सरदार आहे. त्यांच्या नेतृत्वात सुध्दा एक महत्त्वाची फळी उभी आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर साहेबांची ४९  भावी आमदारांची तरुण तुर्क फौज सुध्दा सोबत तयार आहे. 
          सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने व स्वतःच्या धोरण निर्धारण व अचूक पावले टाकून गोपीचंद पडळकर साहेबांना आधुनिक पेशवाई मधील सुभेदार राजश्री मल्हारराव बनणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रथमता आपला सर्वांचा शत्रू असलेली मानसिकता ओळखून त्याविरोधात लढण्याची सांघिक नीती निर्धारित होणे आवश्यक आहे तरच *गोपीचंद पडळकर साहेबांना  मल्हाररावांच्या सरदारकीचा सन्मान व स्वराज्याचे वैभव नक्कीच प्राप्त होणार आहे. नाही तर आमदार गोपीचंद साहेबांमधून, शेंडगे, डांगे, महात्मे मात्र नक्कीच घडणार आहे.* 

 *त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!* 


 *डॉ.  प्रभाकर लोंढे* 
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचे अभ्यासक* 
९६७३३८६९६३

Wednesday, May 13, 2020

गोपिचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

गोपीचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

डॉ प्रभाकर लोंढे

         धनगर नेते म्हणून ब्रँडिंग झालेले मा. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळताच धनगर समाजामध्ये काही प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.  प्रथमतः गोपीचंद पडळकर यांचे त्रिवार विशेष अभिनंदन!!!  ही धनगर जमातीसाठी अभिनंदनाची बाब असली तरी ही  विधान परिषदेची उमेदवारी मिळवून घेण्यासाठी त्यांना बारामती मध्ये येऊन स्वतःच डिपॉझिट जप्त करून घ्यावं लागलं ही बाब अतिशय विचार करायला लावणारी आहे. . धनगर बहुल बारामतीमध्ये येऊन धनगर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणं ही जमातीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असं मला तरी वाटत नाही. परंतु ते बारामतीत का आले? हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगली(जिल्हा) सोडली नसती तर कदाचित ही वेळ आली नसती.
              गोपीचंद म्हणजे एका सामान्य धनगर कुटुंबातील माणूस पण त्यांनी "50 धनगरांना आमदार व तीन महिन्याच्या आत एस.टी.चे सर्टिफिकेट" या मुद्यांवर उत्तम वकृत्व शैलीच्या आधारे धनगर तरुणाईला भारित केलं.  असं एक व्यक्तित्व म्हणून बीजेपी ने गोपीचंद पडळकरांना पुन्हा जवळ केलं. त्याआधारे बीजेपीला जी काही मत मिळायची ती मिळाली. तसा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास हा अत्यंत खडतर, त्यांना प्रस्थापितांच्या कट कारस्थानांच्या बाबतीत चांगला अनुभव आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वत:ला चांगल्या प्रकारे स्थीर ठेवलं. काही प्रमाणात का होईना स्वत:ला आर्थिक राजकीय बाबतीत सक्षम केलं.
          प्रस्थापितांनी त्यांच्याशी कसेही वागले तरी धनगर लाटेला वळविण्याचं काम गोपीचंदनी उत्तम प्रकारे केलं किंवा करू शकतो हा विश्वास बीजेपीला वाटल्यामुळे तसेच धनगरांचा नवीन पत्ता खेळण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी दिलेली आहे, असं मला वाटते. शेवटी हे माझं मत आहे. पण विधान परिषदेतील उधारीच्या सभासदत्वाची धनगर संख्या एक ने वाढेल. त्याबद्दल धनगर जमातीचे विशेष अभिनंदन!!
          गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच मात्र अनेकांनी त्यांची तुलना गोपीनाथ मुंडेशी केली. बीजेपी तील गोपीनाथ मुंडे बनण्याची संधी, ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली. आनंद झाला. डोक्यात  विचार आला. मन गंभीर झालं आणि त्यानी ठरवून टाकलं. की मी लिहून देतो, गोपीचंद पडळकरांना गोपीनाथ मुंडे बनण्याचे मार्ग पूर्णता बंद झालेले आहे. 
           गोपीनाथ मुंडेंचा ज्या परिस्थितीमध्ये राजकीय जन्म झाला, ती राजकीय परिस्थिती बीजेपी मध्ये गोपीचंद यांना नक्कीच मिळणार नाही. याशिवाय गोपीचंदची जमात धनगर, महाराष्ट्रात हेतुपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या जात असलेली धनगर. (आजचा अलिखित नियमच बनून गेला आहे की या महाराष्ट्रात धनगर नेतृत्व सदासर्वकाळ सत्तेत किंवा नेतृत्वात राहूच द्यायचा नाही) आजच्या महाराष्ट्रातील धनगर नेतृत्वाचा इतिहास पाहिला तर धनगरांचा कोणताही पत्ता(नेतृत्व) फूल टाइम वापरला गेला नाही. (आबा अपवाद) धनगरांच्या नेत्याला शह देण्यासाठी नवीन दुसरा धनगर नेता शोधणे व त्याला पुढे करून जमातीला बांधून ठेवणे, ही येथील प्रस्थापित पक्षांची नीती. पडळकरांना  उमेदवारी देण्यामागचा कदाचित हा उद्देश असण्याची दाट शक्यता आहे.  बीजेपीला पडळकरांची राजकीय ताकद वाढवायची असती तर विधानसभेसाठी बारामतीत नेऊन त्यांची डिपॉझिट जप्त होऊ दिली नसती.  
           गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. लोकांना माहीत नसलेला बीजेपी पक्ष त्यांनी घराघरात नेऊन पोहचविला. ती बीजेपी ची गरज होती.  त्यामुळे त्यांची नाळ ही अठरापगड जातीशी व घरात पत्नी महाजन (प्रमोद महाजन ची बहिण) घराण्याची होती. त्या
मुळे गोपीनाथ  मुंडे साहेबांना शेवटचे गोपीनाथ मुंडेसाहेब बनण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली. तशी संधी आज गोपीचंदजीना बीजेपी मध्ये उपलब्ध आहे, असं मला तरी वाटत नाही. 
            तसं पाहिलं तर प्रस्थापितांनी गोपीचंद पडळकरांची  महाराष्ट्रातील विधिमंडळात /राजकारणात सुरुवातच विधानसभेची  डिपॉझिट जप्त करून विधानपरिषदे पासून केली . (याचा अर्थ असा काढू नका की, गोपीचंद पडळकर निवडून येवू शकत नाही ) मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की त्यांच्यासाठी ही परिस्थिती हेतुपुरस्सर निर्माण केल्या गेली. 
             गोपीचंद पडळकरना मिळालेली उमेदवारी ती मागावी लागली. येथे मिळलेली उमेदवारी ही धनगर समाजाला आहेत की गोपीचंद पडळकरांना आहे?, हा मोठा प्रश्र्नच आहे. पडळकर साहेबांच्या कार्याचं ? की धनगर जमातीच्या त्यागाचं फलित? म्हणून ही उमेदवारी मिळालेली आहे. (यापूर्वी धनगरांच्या त्यागाच फलित म्हणून धनगरांना खासदारकी मिळाली आहे)
            या ठिकाणी प्रश्न कितीही असले तरी आलेली संधी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांच्या राजकीय जीवनाचे सार्थक करू शकते. आलेले कटू अनुभव व योग्य पावले पडली तर धनगर जमातीच्या राजकीय पटलावर एक नेतृत्व म्हणून विधानमंडळात महत्त्वाची भूमिका बजावू होऊ शकते. 
   त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!*

🥈🥉🥈🥉🥈🥉🥈🥈🥈🥉
*जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!* 
 
                    *डॉ प्रभाकर लोंढे.* 

                 माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार जगत असतो, असं असलं तरी त्याचा दृष्टीकोन त्याला त्याच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करीत असतो. हा त्याचा दृष्टीकोन त्याच्यावरील संस्कार, उपलब्ध परिस्थिती व त्याने जीवनामध्ये पाहिलेल्या स्वप्नांवरून ठरत असतो. यापुढे त्याने आपल्या दृष्टिकोनाला सांभाळत असताना केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा त्याच्या जीवनाचा दर्जा ठरवित असतो, प्रसंगी त्याच्या/ तिच्या व्यक्तित्वाला अमरत्व प्राप्त करून देत असतो. तेच अमरत्व इतर सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याला महापुरुषाचा दर्जा प्राप्त करून देत असतो. व त्याच्या प्रेरणेतून सामान्य माणूस संपूर्ण जीवन जगत असतो.
        असे *कर्तुत्ववान प्रेरणादायी महापुरुष पैदा करता येत नाही तर ते घडविता येतात. महापुरुष हा विचारांनी व कर्तुत्वानी घडत असतो,*  त्यामुळे स्वतःच्या जीवनातील आचारपद्धती व स्वप्न साकार करण्यासाठी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांची कार्य पद्धती व जीवन कार्य सामान्यांना जीवनामध्ये आधारस्तंभ दीपस्तंभ यासारखे कार्य करीत असते.  समाजात घडून गेलेले महापुरुष समाजात सातत्याने दीपस्तंभासारखे जळत राहावे, सर्वसामान्यांपर्यंत जगण्याची दृष्टी देत राहावे, यादृष्टीने महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या समाजामध्ये साजरा करावयाच्या असतात. 
             *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हे व्यक्तित्व समाजामध्ये अनेक अंगाने मार्गदर्शक असून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जगण्याची ऊर्जा देऊन जात. संपूर्ण जग दुःखमय असताना दुःखातही सुख शोधण्याची वृत्ती निर्माण करतं. खाजगी जगत असताना सार्वजनिक, सर्वकालिक होण्याची प्रेरणा देतं. सर्वधर्मसमभाव यातून सामाजिक समतोल साधण्याची एक विचार प्रेरणा घेऊन जगण्यासाठी माणसाला प्रेरित करतं. सत्तेचा माज उतरवून समाजामध्ये सेवाभावी दृष्टीने जगण्यासाठी मजबूर करतं.* म्हणून ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोनाचार्याचा पुतळा बनवला होता तो पुतळा एकलव्या तील सर्व स्कील विकसित करण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातूनच तो उत्तम धनुर्धारी बनला. यातून मला एवढेच सांगायचे आहे की महापुरुषांचे पुतळे, चित्र, स्मृती ह्या बाबी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठी व स्वतःतील गुण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत असतात. 
                 त्यासाठीच यावर्षीची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे २०२० ला सर्व सामाजिक व राजकीय बंधन पाळून आपण आपल्या घरी वाड्या-वस्त्यांवर राहून उत्साहात साजरी करू शकतो. यावेळी कोणीही शासकीय निर्बंध,नियम, कायदा तोडणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जयंती साजरी करावी. व ते सर्वांवर बंधनकारक आहे. परंतु याचा असा एक फायदा आहे की, त्यामुळे दरवर्षी जयंतीसाठी मोठ्या खर्च होणारा पैसा वाचणार आहे. *हा वाचलेला पैसा खर्च झालाच पाहिजे, असं बंधनकारक नाही. परंतु त्या मधून भुकेलेल्यांना अन्न, पैशावाचून शिक्षण थांबणाऱ्यांना शिक्षणाच्या सोयी, बिमारांना आर्थिक मदत, समाजातील अन्याय, अत्याचारग्रस्त यांना मदत, याशिवाय प्रत्येकाच्या मनात असलेले समाज उद्धारक नवोउपक्रम राबवण्यासाठी या जयंतीचा वापर करून खऱ्या अर्थाने आपण दानदात्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारस असल्याचे सिद्ध करू शकतो.* 
        याशिवाय लॉक डाऊनचा काळ असल्यामुळे कुठे सार्वजनिक स्थळी राजमाता *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी न करण्याचं शल्य मनात येऊ न देता पारंपारिक उत्साह जोश कायम ठेवून त्याला मात्र वेगळ्या वळणावर परिस्थितीसापेक्ष निर्णय घेऊन यावर्षीची जयंती साजरी केली तर ती अविस्मरणीय राहणार आहे.*         

अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वाड्या-वस्त्या यांना महापुरुषांची नावे देण्याची ट्रेंड प्रचलित होताना दिसत आहे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक अंगाने मार्गदर्शक जीवन असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा चौक, रोड, रस्ता उड्डाणपूल दिसत नाही किंवा ऐकायला मिळत नाही.  *यावर्षीच्या जयंती निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव एखाद्या चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वार्ड, मोहल्ला, वाड्या-वस्त्यांना  देऊन, त्याची ३१ मेला तत्वतः घोषणा करून सर्वांनी आपल्या घरीच राहुन ऑनलाइन पद्धतीने विचारविनिमय करून ऑनलाइन पद्धतीनेच त्याची घोषणा केली तर लाकडाऊन नंतर त्याची अंमलबजावणी करता येईल.* या लाकडाऊनच्या निमित्ताने ती अविस्मरणीय बाब ठरणार आहे. 
       सर्वांनी सार्वजनिक व खाजगी आरोग्याची काळजी घेऊन लाकडावून चे पालन करण्यासाठी शासनाला व प्रशासनाला संपूर्णतः सहकार्य करावे. *राष्ट्र प्रथम कर्तव्य समजावे.* .. ही विनंती..

 *त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!* 


 *डॉ प्रभाकर लोंढे*
*गोंदिया* 
९६७३३८६९६३

Wednesday, April 29, 2020

धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

📚🖊️🖊️📚📖🖊️🖊️📚📚🖊️🖊️🖊️📚
 *धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

           *डॉ प्रभाकर लोंढे.*

   या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत सर्वाधिक पराक्रमी सर्वगुणसंपन्न म्हणून नावलौकिक असलेले राजे/ राजकीय वंशांचा विचार केल्यास त्यापैकी बहुतांश धनगर वंशाचे आहेत असा उल्लेख करावा लागतो. हे *मी जातीय अस्मिता म्हणून नाही तर वास्तविकतेच्या आधारे बोलतो आहे.* (ज्यांना कुणाला यावर आक्षेप असेल त्यांनी थोडे इतिहासात डोकावून पाहावं ही विनंती) असे असले तरी मी येथे सर्व वंशांचा उल्लेख करणार नाही. परंतु याच शृंखलेतील *मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ असलेले संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांच्यापासून सुरु झालेल्या होळकर वंशातील राजपुत्र खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, शूरवीर महाराजा यशवंतराव यांना इतिहासकारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा वारंवार बदनाम/संकुचित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
              *तेव्हा प्रश्न निर्माण होतं की असं का झालं???*

याचे उत्तर आपल्याला प्रथमतः

 🖊️१) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनीच दिलेलं आहे. " *आम्हा कडील लोकांची कामे यथास्थित होतात. परंतु उजेडात आणणार कोणी नाही. न होत्याचे उजेडात येते. असो दिवस असेच आहेत"* (महेश्वर दरबारची बातमीपत्रे पान-१९) याचा अर्थ तेव्हापासून असं चालत होतं आणि आजही ते बंद झालं आहे, असं म्हणता येत नाही.
 *🖊️२) "होळकरांची कैफियत"* म्हणजे होळकर यांच्या पराक्रमाचा आलेख आहे. ती *भाऊसाहेबांच्या बखरीच्या तोडीची आहे, परंतु ती मागे पडण्याची दोन कारणे ये. ना. खेडकर यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये दिलेली आहेत.*
 *अ) मराठी इतिहासकारांनी शिंदे* होळकर घराण्याची वारंवार तुलना करून होळकरांची कृती सारी स्वार्थ मुलक तर शिंद्यांची कृती तेवढी सारी उदात्त, असे रंगवण्याचा प्रघात पाडला. यामुळे होळकर बदनाम झाले.
 *ब) "भाऊसाहेबांची बखर" अप्रत्यक्षपणे पेशव्यांची बखर म्हणून प्रसिद्ध झाली, याला कारण लेखन कलेवर त्यांचे असलेले प्रभुत्व. ही बखर भाऊसाहेबांची बखर नावाने ओळखली जात असली तरी त्यामधून शिंद्यांचा उदोउदो करण्यात आलेला आहे.* (हे असं का झालं? याचा सर्वांनी विचार करावा). तुलनेने होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाला, शिंदे व पेशव्यांच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीने दडपण्याचाच किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. *यामध्ये होळकरांचा इतिहास किंवा पराक्रम कमजोर होता हे कदाचित त्यांना सुद्धा मान्य होणार नाही. पण त्यादृष्टीने त्यांची लेखणी मात्र चालली नाही. याला कारण इतिहासामध्ये शिंद्यांपेक्षा होळकरांना श्रेष्ठ दाखवण्याची त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नव्हती. यापुढे जाऊन त्यांची तशी नियत नव्हती असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचे हिरो असलेले होळकर हे खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आहे.* त्यामुळे येथे आपल्याला संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे ही बाब समजून घेतल्याशिवाय पुढचं कार्य करता येणार नाही.

🖊️ *३) माझ्या मते, साधारणता* समाजात जेव्हा एखाद्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येते, तेव्हा त्याच्याशी स्वतःची तुलना करता आपण त्याची बरोबरी करू शकत नाही हे तो मान्य करतो,पण ते त्याला सहन होत नाही.  तिथूनच तो त्या व्यक्तीच्या बदनामीला सुरुवात करतो. यामध्ये समोरच्याला बदनाम करणे हा त्याचा  मुख्य उद्देश नसतो तर आपण त्यापेक्षा कमजोर दिसू नये एवढीच तो दक्षता घेत असतो.व त्याच्यासाठी त्याचा सर्व खटाटोप चाललेला असतो. हेच होळकरांच्या इतिहासाच्या बाबतीत झालेलं नाकारता येत नाही.

🖊️ ४) " *बोलक्याचे बोंड खपते, मुक्याचे मोती लपते"* ही एक म्हण आहे. ती होळकरांच्या इतिहासाला समर्पकपणे लागू होते. मराठी इतिहासकारांना वगळून इतर संदर्भ लक्षात घेता मराठी इतिहासकारांच्या इतिहास लेखनावर संशय निर्माण होतो. त्यामुळे होळकरांच्या इतिहासलेखनासंबंधी ची आत्मियता असणाऱ्या *इतिहासकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असती तर कदाचित होळकरांच्या इतिहासाला न्याय मिळाला असता. होळकरांच्या इतिहासाला बदनाम होण्याची वेळ आली नसती.*

🖊️ *५) या चार बाबींबरोबरच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की समाजातील जागृत लोकांचाच समाजावर, संस्कृतीवर, राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेवर नेहमी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे लेखन सुद्धा त्याच अंगाने झालेल्या आहेत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो कि, धनगर जमातीचे किती लोक इतिहास लेखनाच्या बाबतीत जागृत होते व आहे ??*

 🖊️ *६)  दैनंदिन जीवनात व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीच्या चुका होणे, ही बाब स्वाभाविक आहे. आणि जो कर्तुत्वप्रधान जगत असतो, त्यांच्याकडून तर चुका नक्कीच होतं असतात. त्यामुळे होळकर राजांकडून चुका झाल्या असेल तर ते नक्कीच कर्तुत्व प्रधान होते. म्हणून त्याच्या चुका दाखवत असताना त्यांच्या कर्तुत्वाची सुद्धा तेवढ्याच प्रगल्भ नजरेने मांडणी होणे आवश्यक आहे. पण ती होता ना किंवा झालेली दिसत नाही*

🖊️७) *इतिहास लेखन करताना आपण ज्याप्रमाणे होळकरांच्या इतिहासाविषयीची जे आत्मीयता दाखवतात* त्याप्रमाणे तत्कालीन मराठी इतिहासकारांना होळकरी इतिहासा पेक्षा पेशवे आणि शिंदे यांच्या इतिहासाशी जवळीकता वाटली असेल आणि त्यातून जर ते इतिहास लेखन झाले असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. तर *तो आत्मियता असणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे मान्य व स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.*
             ही बाब सत्य असताना एखाद्याच्या नकळत झालेल्या चुकांचा अतिरंजितपणा किंवा राईचा पर्वत करून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू , व्यक्तिमत्वाचे विविधांगी समाजोपयोगी व कर्तबगार पैलू याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते तेव्हा *ऐतिहासिक दृष्ट्या त्या व्यक्तीत्वावर नक्कीच अन्याय होत असतो. आणि होळकर राजवंशाचे बाबतीत हे नक्कीच झालं आहे,* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. 
       आणि याची आपणास उशिरा का होईना *जाणीव झाली असेल तर इतिहास संशोधना बरोबरच इतिहास लेखन शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही....*


 *धन्यवाद*
------------------------------------
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक*

🖊️ *डॉ. प्रभाकर लोंढे*🖊️
          ९६७३३८६९६३

Saturday, April 18, 2020

राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

                             *डॉ प्रभाकर लोंढे*

     मराठेशाहीच्या इतिहासामध्ये होळकर संस्थान बलाढ्य संस्थान म्हणून सर्वपरिचित होतं. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खुद्द पेशवे तसेच इतर सरदार यांचेवर  तसेच अखंड भारतामध्ये सर्वत्र दबदबा होता.  मल्हाररावांना विश्वासात घेतल्याशिवाय पेशवाईतील कोणताही निर्णय होत नव्हता. अशा या महान सुभेदारांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांना इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. त्या इतिहासाची वास्तविकता सत्तेच्या आधारे पुढच्या काळामध्ये सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी *खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला तो काही संदर्भांवरून संशयास्पद वाटतो.*
                 सुरजमल जाट कुंभेरीचा किल्ला बळकावून बसला होता. त्यावेळी पेशवा रघुनाथराव, जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. तसा हा किल्ला जिंकण्याचा आग्रह सुभेदार मल्हाररावांचाच होता. त्यावेळी *रघुनाथराव व जयाजी शिंदे होळकरांच्या सोबत असले तरी आतून ते जाटांसोबत मिळाले होते.* त्यामुळे ते होळकरांना मदत करीत नव्हते. व ते स्पष्ट दिसत होते.
         तत्पूर्वी मल्हारराव होळकर यांचा पुत्र *खंडेराव होळकर चारशे स्वरांच्या पथकासोबत दिल्ली स्वारी आटोपून जानेवारी १७५४ च्या आरंभी होडाळ येथे आपला तळ ठोकून बसला होता.* जाट वाड्यातील जाटांची त्यांच्या केंद्रापासून दूर असलेली ठाणी उठवून लावण्याचे कामावर तो होता. (कदाचित हा मल्हाररावांचा युद्धनीतीचा भाग असावा) असे असताना या पथकाने आता कुंभेरी च्या वेढ्यात येऊन सामिल व्हावे, असा पिताश्री मल्हारराव कडून त्याला आदेश मिळाला. त्याप्रमाणे खंडेराव होळकर कुंभेरीच्या वाटेने निघाला. वाटेत मेवातचे ठाणे लुटून तो कुभेरीला पोहोचला.(इथे प्रश्न निर्माण होतात की,
 *१) मल्हाररावांना कुभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना का बोलावावं लागलं?*
*२) जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे त्यावेळी काय करीत होते?*
    एकाकी लढा देत असताना  कुंभेरी चा प्रदेश रेताळ असल्याने लांब पल्ल्यांच्या तोफांची आवश्यकता मल्हाररावांना वाटली. त्याची पूर्तता व्हावी म्हणून दिल्ली दरबार कडे *तोफांची मागणी केली परंतु दिल्ली दरबारने ती नाकारली. (दिल्ली दरबारातील गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या मुलाच्या(खंडेराव) नेतृत्वात सेना पाठवणाऱ्या मल्हाररावांना दिल्ली दरबार/ बादशाहाने ही मदत का नाकारली? हा येथे मोठा प्रश्न निर्माण होतो)*
         त्यावेळी जाटां विरुद्ध लढण्यासाठी इमाद उल- मुल्क तसेच अकितब यांना मल्हाररावानी बोलावून घेतले. बोलण्यावरून ते लढ्यात सामील झाले. *खंडेराव सुद्धा नेटाने लढत होते. अतिशय बिकट परिस्थिती असताना खंडेरावांनी किल्ल्याच्या तटा पर्यंत झाकलेल्या भुयारा सारख्या खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा तयार केल्या होत्या व तो किल्ल्याच्या तटा पर्यंत जाऊन पोहोचला होता.* हा खंडेरावाचा इतिहास खंडेरावांवर आक्षेप घेणाऱ्यांसाठी अतिशय चपराक देणारा आहे.
           सुरजमल जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दबा मारून बसला होता. पेशवा रघुनाथराव व जयाजी शिंदे वेढयात उपस्थित असले तरी त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. ते दोन्ही आतून सुरजमल जाटाशी जवळीक साधून होते. (नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवा जाटाशी तह करून २२ मे १७५४ ला कुंभेरीची छावणी मोडून निघून गेला.) त्यामुळे कुभेरीचा संपूर्ण लढा होळकरांना लढावा लागला.         
         *मल्हारराव आणि खंडेराव यांचेकडून सर्वतोपरीने लढा सुरू असताना त्यांना जाटा सह अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागत होता. अन्नाशिवाय पोट भरणे व शस्त्राशिवाय युद्ध जिंकणे कठीण जाते.  कुंभेरीच्या रेताळ प्रदेशावर लढण्यासाठी होळकर पिता-पुत्रांना लांब पल्ल्याच्या तोफा जर बादशहा किंवा कुठून मिळाल्या असत्या तर कदाचित कोणत्याही परिस्थितीत होळकर मराठा साम्राज्याचा झेंडा कुभेरीवर फडकला असता.*
            होळकर पिता पुत्राचे जिकरीचे प्रयत्न सुरू असतानाच *१५ मार्च १७५४ ला खंडेराव जेवणानंतर खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता अचानकपणे किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला.* जंबरुकचा एक गोळा लागून *खंडेराव मारला गेला* .... एकुलता एक खंडेराव मृतप्राय झाला याची माहिती कळताच मल्हारराव देहभान विसरले. या सर्व प्रकारात कुंभेरीचा लढा अर्धमेला झाला खरा.  तरी त्याठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात.  १. *) खंडेराव खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा कसा काय झाला?*
 *२) सुरजमल जाटाशी संबंध जोडून असलेल्या जयाजी शिंदे व खुद्द रघुनाथराव पेशवे यांनी मल्हाररावांचा काटा काढण्यासाठी सुरजमलला माहिती पुरवून खंडेरावांचा मृत्यू घडवून तर आणला नाही ना?*
               परिस्थिती काहीही असो, खंडेरावाच्या मृत्यूने मल्हारराव पुर्णतः खचून गेले होते. अशाही परिस्थितीत *रघुनाथराव व जयाजी शिंदे पातशहाचा दबाव दाखवून जाटांशी मेळ घालण्यासाठी मल्हाररावांना बोलू लागले. दबाव टाकू लागले.* परिस्थितीने अगतिक असलेले मल्हारराव एकीकडे मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने व्याकुळ होते. तेव्हा मल्हारराव उदास होऊन *जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे यांना बोलले "आपण धनी व शिंदे मुखत्यार सरदार, सांगाल ती चाकरी करू!* असे उद्विग्न होवून मल्हारराव बोलले व कोणतीही पूर्वसूचना न देता खंडेरावाच्या मृत्यूचे उत्तरकार्य निमित्त मथुरेला निघून गेले..
          *मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाहेर येणार नाही तो सुभेदार मल्हारराव कसला?* खंडेरावाचे उत्तर कार्य आटोपून मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली." _*सूरजमल जाट याचे शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन. तरीस जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राण त्याग करिन."*_
             यावरून आपल्याला मल्हाररावांना पुत्रमृत्यूचं किती दुःख झालं होतं, हे लक्षात येईल. *यावेळी मल्हाररावांचं दुःख एकट्या मल्हाररावांचं न राहता सर्व मराठा सरदारांचं व ज्यांचं अस्तित्व मल्हाररावाच्या तलवार व भरोशावर निर्माण झालं होतं त्या पेशव्यांना व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही.* (याचा अर्थ खंडेरावाच्या मृत्यू संबंधाने संशयास जागा आहे) *सर्व मराठा सरदार व पेशवे यांनी एकत्र येऊन मल्हाररावांवर आलेला प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती. सर्वांनी मिळून सुरजमलला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही.*
       मात्र मल्हाररावांच्या प्रतिज्ञेने तिकडे सुरजमल जाट पूरता घाबरून गेला होता. त्याने *जयाजी शिंदे कडे आपल्या वकिलामार्फत पगडी व पत्र पाठवून, माहिती मिळेल त्या मार्गाने बचाव करावा, अशी विनंती केली. त्यावर जयाजी शिंदेनी जाटाना बेलभंडार व अभयपत्र पाठवले. दोघेही पगडी बंधू बनले. जयाजी शिंदेनी जाटाची बाजू घेतली व संरक्षणाची हमी दिली.*
   यावेळी प्रश्न निर्माण होतो
     १) सुरजमल जाटानी जयाप्पा शिंदेनाच संरक्षण का मागितले?
     २) जयप्पा शिंदेना खंडेरावाच्या मृत्यूचं दुःख झालं नव्हतं काय?
३) मल्हाररावांच्या दुःखाशी जयप्पा मराठा सरदार म्हणून त्यांच काही नातं नव्हतं काय?
४) खंडेरावाचा मृत्यू संगनमताने तर झाला नव्हता ना?
५) रघुनाथरावानी "पेशवा" या नात्याने मल्हारराव च्या बाजूने उभे न राहता जाटाशी तह करण्याचा आग्रह का धरला?
६) या दोघांना मल्हाररावांपेक्षा जाट जवळचे का वाटले?
 *असे अनेक प्रश्न निर्माण करून*
                  *कुंभारीचा लढा संपला.*
                 खंडेराव मारला गेला.
                 पराक्रमी मल्हारराव काही अंशी खचला.
         *पण हा सर्व प्रकार मला संशय निर्माण करून गेला, की, खंडेरावाच्या मृत्यूमागे येथील प्रवृत्तीचा तर हात नव्हता ना??*
(सत्यता तपासणीच्या दृष्टीने लेख आपणास पाठवित आहे)

------------------------------------
 *डॉ. प्रभाकर लोंढे*
*९६७३३८६९६३*

Saturday, March 14, 2020

समाज दर्पण

समाज दर्पण


पाहिला मी
स्वास घेणारा मुडदा.
ज्याचा फ्याक्चर 
झाला होता गुडघा.

तेव्हा
पहातच राहिलो
आश्र्चर्यचकित होवून
त्या स्वासाला.
जो चालू होता
कसाबसा.
रडत होता ढसाढसा.
दुसरीकडे जागा भेटत नव्हती,
म्हणून बसला होता
देहाची लत्करे पांघरूण.
स्वत्व विसरून
निव्वळ टाईमपास साठी.

तेव्हा विचार आला.
मनाला प्रश्न पडला.
विधात्यानं का बनविलं याला ?
तेव्हा
विधाताच
न राहावून बोलला,
हा प्रश्नच का पडला तुला?
तेव्हा निरूत्तर होवून बोललो.
थोडं समाजात विचारून सांगतो तुला...

डॉ प्रभाकर लोंढे
गोंदिया

Saturday, February 22, 2020

पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

            *डॉ प्रभाकर लोंढे*

आज मी खूप विवादाचा नसला तरी विविधांगी मतेमतांतरे असण्याची शक्यता असलेला महत्त्वाचा विषय हाताळण्याची हिम्मत करतो आहे. त्याला कोणीही भावनात्मक स्वरूपात न घेता वैचारिक दृष्टिकोनातून त्यावर विचारमंथन करावं. एवढीच आग्रही अपेक्षा.
          राजमाता अहिल्याबाई होळकर विचार, आचार, कर्तृत्व,  युद्ध, न्याय, समाजसेवा, जनकल्याणाकारी कार्य यासाठी जगात नावलौकिक असलेलं एक मोठं नाव. एका संस्थानाची महाराणी असली तरी वैश्विक नजरेने जगणारं व्यक्तिमत्व की ज्यामध्ये एक विशाल चरित्र दडलेलं आहे. नाव ऐकताच आदराने चरण झुकावं एवढं निष्कलंकित, सात्विक, संयमी, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेली विधवा स्त्री सलग २८ वर्ष राज्य करणाऱी ती एक महाराणी.  या कर्तव्यदक्ष राणीने जीवनभर जनसेवेला महत्त्वच नाही तर जीवनाचा एक भाग बनवून खाजगी जीवनातील दुःखाकडे  दुर्लक्ष करीत स्वत:ला प्रजेसाठी समर्पित केलं. *प्रजेच्या सुखात स्वतःचे सुख मानलं. याचाच परिणाम स्वरूप किंवा त्यामुळेच त्यांची प्रतिमा किंवा त्यांचं स्थान सामान्य माणसांच्या मनातील ईश्र्वर संकल्पनेपेक्षा कमी नव्हतंच.*
             एवढी समाजनिष्ठा जपत सामाजिक जगत असताना राजमाता अहिल्याबाईंच्या जिवनात त्यांच्या घराण्यातील जेष्ठांविषयी आदर व घराण्याच्या कुलदैवता विषयी श्रद्धेमध्ये कुठेही कमतरता दिसत नाही. त्यांच्या विषयी त्यांना प्रचंड आदर होता, ही विशेष बाब लक्षात येते. व ती अनेक पुराव्यांनिशी सिद्ध होते.
             इतिहासात लक्ष घातल्यास *विशेषत: होळकर व बहुतांश धनगर राजघराणे शिवपुजक असल्याचे दाखले मिळतात. "शिव" ही मुळात द्रविड देवता. यामध्ये शिवपिंड/शिवलिंग पुजा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच कदाचित होळकर घराणे शिवलिंग पुजनाला महत्त्व देत असावे‌. त्यांच्या पैकीच एक म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आपल्या जिवनात शिवलिंग पुजेला महत्त्वपुर्ण स्थान दिले होते. बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला.  त्यांच्या दैनंदिन जिवनात* शिवपिंड पुजनाशिवाय त्यांच्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नव्हती. एवढा अतुट संबंध राजमाता अहिल्याबाई होळकर व शिवपिंड यांचा होता.
               हे जरी खरं असलं तरी शिवभक्ती, *देवभक्ती व धार्मिक कार्याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक, आर्थिक,  राजकीय व सांस्कृतिक विकासाची उल्लेखनीय कामे त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तित्व बहुआयामी होतं हे सिद्ध होते.* तसेच आजच्या काळात सुध्दा त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्टीने सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.  म्हणूनच त्या *व्यक्तित्वाची मांडणी (project),  प्रदर्शन समाजासमोर तसेच भावी पिढ्यांच्या दृष्टीने करीत असताना किंवा त्यांची प्रतिमा साकारताना/ उभी करीत असताना तशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.*
          अहिल्याबाई होळकर आणि शिवपिंड हे समीकरण आज सर्वत्र परिचित झालेलं आहे. ही बाब धार्मिक दृष्ट्या अतिशय मार्मिक असून आम्ही द्रविड असल्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण पुरावा आहे. तशा प्रकारची त्यांच्या विषयीची धारणा समाजात निर्माण झालेली आहे. आज त्यांचा पुतळा बहूतेक ठिकाणी शिवपिंडधारी दिसून येतो. त्या संबंधाने कोणाचाही आक्षेप असू शकत नाही. माझा तर बिलकुल नाही. परंतु धनुर्विद्या घेण्यासाठी एकलव्यानी *द्रोणाचार्याचा जो पुतळा बनवला होता असं म्हणतात.  त्या पुतळ्यात त्याला त्याचा गुरु दिसत होता, गुरूकडून मिळणारी प्रेरणा, गुरूकडून मिळणारी विद्या, म्हणजेच त्या पुतळ्या मधून त्याला गुरूच्या जीवनातील सर्वच अंगांचे दर्शन घडत होतं. व त्या पुतळ्याला नजरेसमोर ठेवून एकलव्य उत्तम धनुर्धारी बनला.* तो त्या पुतळ्या पासून मिळालेल्या प्रेरणेचा परिणाम होता. असं जर असेल आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आमच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान मानत असू ,त्यांच्या व्यक्तित्वाला पाहून भावी पिढ्या घडवाव्या, त्यातून नवनिर्मित समाज हवा असेल, एक आदर्श नवनिर्मित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने आदर्श राजा किंवा राणी अपेक्षित असेल   तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा कसा असावा याचा विचार सर्वांनी करावा. त्यांच्या पिंडधारी पुतळ्यापासून कोणता बोध होणार आहे किंवा भावी पिढ्यांसाठी कोणती प्रेरणा अपेक्षित आहे याचा सुध्दा विचार व्हावा.
        *कोणी मान्य करो अथवा न करो हे सत्य आहे की, राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक असल्या तरी त्यांचा तो शिवपिंडधारी पुतळा त्यांच्या केवळ धार्मिक जीवनाला प्रदर्शित करीत असतो* . आणि वास्तविकता ही आहे की, *कोणताही व्यक्ती कितीही धार्मिक असला तरी आपल्या जीवनाचा कमीत कमी वेळ धर्मकार्यात घालवत असतो.* त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचे इतर कार्य त्यांच्या धार्मिक कार्यापेक्षा खूप मोठे व लोकाभिमुख तसेच अथांग सागरा सारखे आहे. त्या सर्व कार्याला प्रदर्शित करणारा व भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्या व्यक्तित्वातील सर्वगुणसंपन्नता प्रदर्शित करणारा पुतळा हाच अहिल्याबाई होळकरांच्या व्यक्ती व कृतीला सन्मान तसेच पूर्णत्व देऊ शकतो. भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. याचा अर्थ राजमाता अहिल्याबाई होळकरांचा शिवपिंडधारी पुतळा प्रेरक नाही असं होत नाही किंवा मला तसं म्हणायचं सुद्धा नाही. परंतु या पुतळ्याच्या माध्यमातून केवळ धर्मभावना, धार्मिक श्रद्धा, कृती याशिवाय दुसरा भाव निर्माण होत नाही. हे मात्र सार्वजनिक स्तरावर प्रकर्षाने सांगितल्याशिवाय राहणार नाही.
          संपूर्ण होळकर घराणे व स्वतः अहिल्याबाई होळकर शिवपूजक असले तरी त्यांनी लढाया किंवा रणांगणात उतरण्याची हिम्मत तलवारीचे भरोश्यावर, तिच्यावर विश्वास ठेवून केलेली आहे.  त्यामुळे *रनांगणावर लढणारी तलवारधारी अहिल्याबाई होळकर, समाजात दानधर्म करणारी दानशूर अहिल्याबाई होळकर प्रतिमा/पुतळा, नीती व कायद्याच्या चौकटीत न्यायदान करणारी अहिल्याबाई होळकर, बलाढ्य संस्थानाची राजगादी सांभाळणारी सिंहासनाधिष्ठीत अहिल्याबाई होळकर, लोककल्याणासाठी दक्ष व प्रत्यक्ष काम करणारी अहिल्याबाई होळकर,  पर्यावरणाकडे लक्ष देणारी अहिल्याबाई होळकर,  नर्मदा तीरी बसून मासे व प्राणीमात्रांना अन्न टाकणारी अहिल्याबाई होळकर* अशी त्यांचे विविधांगी सत्यरूपे प्रदर्शित करणारी प्रतिमा/ पुतळे सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
       एखाद्या कर्तबगार पुरुषाचा किंवा स्त्रीचा पुतळा कसा असावा ? हा मोठाच प्रश्न असला तरी पुतळा नेहमी त्या *व्यक्तित्वाचा निदर्शक असावा, त्यातून तो भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करणारा असावा, काही नव्हे तर एक विशिष्ट समाजोपयोगी संदेश पोहोचविणारा असावा.*
              झाशीची राणी लक्ष्मीबाई (पेशव्यांची भाची) च्या हातात ढाल तलवार, पाठीवर लेकरू(वारस) घेऊन घोड्यावर स्वार असलेली प्रतिमा व पुतळा आज सार्वत्रिक दिसून येतो. तो पुतळा किंवा प्रतिमा पाहून मनात शूर वीर भाव जागृत होतो. त्या सातत्याने लढत होत्या असा विचार डोक्यात येतो. (काही विचारप्रवाह त्यांच्या लढण्यावर आक्षेप घेऊन त्या लढल्याच नाही, त्यांच्या नावाने झलकारीबाई लढण्याचा पुरावा देतात) पुतळ्या मधून पराक्रमाच्या छटा अलगत झलकतात. त्यांचा पुतळा पाहून भावी पिढ्यांच्या भल्यासाठी त्या ढाल तलवार घेऊन लढल्या, असा संदेश तो पुतळा देतो, त्यापासून मिळणारी प्रेरणा लढण्याची उर्मी निर्माण करतो. पेशवे तर गणपती भक्त धार्मिक प्रवृत्तीचे होते परंतु कुठल्याही पेशव्याची प्रतिमा त्यांच्या धार्मिक भावना प्रदर्शित करणारी सार्वजनिक स्तरावर दिसत नाही.
         रयतेचा राजा शिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांनी शिवरायांला घडवले ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ते त्यांच्या संस्कारात वाढले हे सुद्धा सत्य. त्यामुळेच कदाचित बालशिवाजीला धडे देत जिजाऊंना दाखवले जाते. अलीकडे तर जिजाऊंच्या हातात तलवार दिसायला लागली आहे. तेव्हा मला प्रश्न पडतोय की त्यांच्या हातात तुळजाभवानी किंवा रेणुका मातेची भक्ती करताना जिजाबाईंना का दाखवले जात नाही.
          असो कोणाची प्रतिमा कशी बनवायची हा इतिहासाचा व अभ्यासकांचा  बनविण्याचा भाग असला तरी *भावी पिढ्यांना प्रेरक व सर्व गुण संपन्नता प्रदर्शित करणारा प्रत्येक पुतळा असावा असं मला वाटते.  अहिल्याबाई होळकर यांच्या हातातील पिंडधारी पुतळा यापुढे अहिल्याबाई होळकर यांना मर्यादित करणार नाही. एवढीच अपेक्षा!*


(या संबंधाने काही सूचना मतमतांतरे असल्यास कृपया ९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद मात्र नक्कीच करावा.)
 ________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचा अभ्यासक*
      *डॉ प्रभाकर लोंढे*
             गोंदिया चंद्रपूर

Thursday, January 16, 2020

राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.     
     

              *डॉ प्रभाकर लोंढे*

   अहिल्याबाई होळकर नावाचं व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर अथांग सागरा सारखं आहे. त्यामुळे या उदात्त व्यक्तीमत्वाला वैश्विक दृष्टिकोनातून, उदात्त नजरेतून जगासमोर मांडणे भावी पिढ्यांच्या दृष्टीने व जागतिक पातळीवर एक आदर्श निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काही लोकांना या संबंधाने कदाचित प्रश्न निर्माण होतील की हा माणूस असं का लिहीत आहे?  परंतु  आजच्या परिस्थितीमध्ये या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष, विशिष्ट नजरेतून या व्यक्तीमत्वाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो आहे, हा खरंच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.  *एकीकडे "राईचे पर्वत" बनत असताना पर्वताचं (अहिल्याबाईंचा व्यक्तित्व) खच्चीकरण होवू नये हाच या लेखाचा उद्देश आहे.*
                  सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक या सर्वच अंगाने त्या व्यक्तिमत्वाने सर्वकालिक काम केले आहे,की ज्याला इतिहासात तोड नाही. असे असतानाच त्या व्यक्तिमत्त्वाची केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडणे, केवळ धार्मिक झालर चढवून एक देवी स्वरूपात तिची वैश्विक प्रतिमा निर्माण करणे,  ही बाब तिच्या ऐतिहासिक सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वावर फार मोठा अन्याय व भविष्याच्या दृष्टीने एक वैचारिक पोकळी निर्माण करणारी आहे.
           एखाद्या अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा, सर्वत्र किनाराच म्हटला जात असला तरी प्रत्येक किनाऱ्याचं वैशिष्ट्य, वेगळेपण व महत्त्व अलग असतं. त्यामुळे समुद्राचं वर्णन करताना किंवा त्यासंबंधीची महती गातांना केवळ एका किनाऱ्यावरून समुद्राची किंवा किनारपट्टीची विशालता स्पष्ट करणं शक्य नसतं. त्याप्रमाणेच राजमाता अहिल्याबाई होळकर *या अठ्ठाविस वर्षे राज्य करणाऱ्या रणरागिणी, लोककल्याणकारी, आदर्श महाराणी, पुरोगामी व्यक्तित्वाच्या केवळ धार्मिक अंगाला प्रदर्शित केल्याने संपूर्ण व्यक्तीत्वाचा परिचय होणार नाही. कोणत्याही व्यक्तीचं केवळ धार्मिक जीवन म्हणजे संपूर्ण जीवन नसतं. कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक संकल्पना, धार्मिक विचार आचार हा त्या व्यक्तित्वाचा एक भाग असतो. परंतु त्याला संपूर्ण जीवन म्हणणे अतिशय चुकीचं आहे.* असे जर होत असेल किंवा केले जात असेल तर त्या व्यक्तित्वाला मर्यादित करण्यासारखे आहे. आणि असा तो अधिकार आज कोणालाही नाही.
        साधारणतः कोणताही व्यक्ती जीवनातील जास्तीत जास्त  १० % (खूप झाले) वेळ काळ धार्मिक कार्यामध्ये देत असतो.  याचा अर्थ उरलेला काळ तो इतर समाजकार्य किवा स्वतःसाठी जगत असतो. अहिल्याबाई होळकर एक महापराक्रमी कर्तबगार महाराणी होत्या. *त्यांनी त्यांच्या 28 वर्षाच्या राजकीय काळात या देशाच्या पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण चहू दिशेला केलेले विकास कार्य आजही त्यांच्या व्यक्तित्वाचा, राजकीय कारकीर्दीचा, विकास कार्याचा, त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, लोककल्याणकारी दृष्टिकोन, धार्मिक सहिष्णुता व वैचारिक प्रगल्भतेचा परिचय करून देतात.*
         असे असताना सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडल्याने त्यांच व्यक्तित्व आज हिमखंडा सारखं वाटायला लागलं आहे. त्यांची केवळ धार्मिक बाब प्रकाशात आणल्याने त्यांचे इतर महाकाय लोककल्याणकारी, समाज हितवादी जनकल्याणार्थ कार्य व भूमिका हे अदृश्य झाल्यासारखे वाटायला लागले आहे. 
          ज्याप्रमाणे हिमखंडाचा फार कमी भाग हा पाण्याच्या वर दृश्य स्वरूपात असतो आणि त्यापेक्षा बराच मोठा भाग पाण्यात व्यापलेला असतो, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई होळकरांचे कार्यकर्तृत्व केवळ धार्मिक बाबतीत दृश्य स्वरूपात दाखवले जात असून इतर कार्याला फारसा उजाळा दिला जात नाही. असं का होतं?? हा प्रश्न असला तरी  स्त्रीशक्ती व बहूजन समाजासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे.
           *होळकर संस्थानात २८ वर्षे राज्य करणाऱी एक महाराणी म्हणून जगाच्या पाठीवर जिने कार्यकाळ गाजवला. अनेक विकृतांना त्यांची जागा दाखवली. स्वतःच्या जगण्यातून जगाच्या पाठीवर दीपस्तंभासारखा आदर्श निर्माण केला. स्वतःच्या खाजगी जीवनातील समस्यांची शृंखला संपत नसताना त्याचा परिणाम कधीच जनमानसावर होऊ दिला नाही. लोककल्याणावर होऊ दिला नाही. सर्वत्र मानव, पशु पक्षी, जीव सुखी समाधानी राहतील, याचा सातत्याने प्रयत्न केला. हा प्रयत्न लोककल्याणकारी भूमिकेतून करीत असताना त्यांच्या कार्याला जगाच्या पाठीवर कुठेच तोड नाही.*
   ‌      परंतु या कार्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्याविषयी केवळ धार्मिक स्त्री, पूजा पाठ करणारी स्त्री, व्रत वैकल्य, कर्मकांडा मध्ये गुंतून राहणारी स्त्री, दानधर्म करणारी स्त्री, याच्याही पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्व देवी स्वरूपामध्ये सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. भारतीय समाजातील मानसिकतेला अनुसरून कदाचित काहींना हे अतिशय चांगलं वाटत असेल, काही लोक त्यांना देवी स्वरूपातच स्विकारायला उत्सुक असतील. यावर माझी काय कोणाचीही काहीही हरकत नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो माझ्या तुमच्या अपेक्षांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करण्यामध्ये का व्हावा?
             *माझ्या तुमच्या अपेक्षांमुळे त्यांच्या व्यक्तित्वावर पडणारा प्रकाश का मर्यादित व्हावा? आमच्या लेखणी वाणी, कृती केवळ त्यांच्या धार्मिक जीवना संबंधाने का अग्रेसर व्हाव्यात? त्यांच व्यक्तित्व राशिभविष्य, कर्मकांड पोथ्या पुराण, धार्मिक पारायण यामध्येच आम्ही का आडकवावं?*

 *आमच्या लेखणी त्यांच्या युद्ध, युद्ध कौशल्य, त्यांचे विजय, तलवारबाजी, अस्सल पुरोगामित्व, नीतिमत्ता, न्यायदान, परधर्म सहिष्णुता, शत्रूला दम व सन्मानजनक वागणूक सुद्धा,  गुंडांचा बंदोबस्त, अनिष्ट प्रथा-रूढींचा विरोध, प्राणिमात्रांवर दयाभाव, पर्यावरण रक्षण, लोक कल्याणकारी राज्य, रोजगार हमी योजना, साहित्य व सांस्कृतिक प्रेम, व्यापाराला प्राधान्य, जनकल्याणासाठी खाजगी संपत्तीचा वापर करण्याची वृत्ती.*

या *गोष्टींना आम्ही का उजाळा देत नाही??? का आमच्या लेखनी अंगाने चालत नाही ?? आमची वाणी यादृष्टीने का व्यक्त होत नाही??  त्यांची स्मारक तयार करतांना आम्ही या गोष्टींना का प्राधान्य देत नाही???*

शेवटी एकच विनंती करावीशी वाटते,
 *उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा कृपया हिमखंड मात्र बनवू नका....*

__________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Tuesday, January 7, 2020

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.
 
डॉ प्रभाकर लोंढे.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली."

         धनगर जमातीच्या राजकीय नेतृत्वाची दुरावस्था आज सार्वत्रिक तसेच सर्वमान्य झालेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका धनगर जमातीने अनुभवलेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका धनगर जमातीच्या हातात आहे. जमातीला  सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थावर अधिराज्य निर्माण होणे तसेच जमातीने भावी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका धनगर जमातीसाठी एक संधी स्वरूपात आहेत.
          लोकसभेतील तसेच विधानसभेतील धनगर उमेदवारांचा दारुन झालेला पराभव, निवडून आलेला एकमेव आमदार हा धनगरांचा विजय म्हणावं की पराभव?????  हा प्रश्र्नच असतांना कोट्यावधी धनगरांचा सार्वत्रिक पराभवच झाला आहे असं प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे व तो पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलाच पाहिजे. तरच यापुढे धनगर राजकीय अस्मिता पुनर्जीवित करणे शक्य आहे.
                धनगर राजकीय अस्मितेची वारंवार लाजिरवाणी पडझड सुरू असतांनाच, महाराष्ट्रातील धनगर "संवेदनाशून्य धनगर" आहे, असं म्हणणं चुकीचं ठरलंच पाहिजे. त्यासाठी जिथे कुठे संवेदना शुन्य धनगर लक्षात येईल तेथे सामाजिक संवेदना जागवायला कोणाची हरकत नसावी. तसा प्रयत्न प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अशा प्रयत्नांचा सार्वजनिक व मिशन स्वरूपात प्रत्येकाने स्विकार केलाच पाहिजे.  राजकीय सत्ता किती महत्त्वाची आहे, हे अलीकडेच महाराष्ट्रातील पार पडलेल्या प्रस्थापितांच्या (प्रस्थापित पक्षांच्या) राजकीय नाट्यावरून लक्षात येईल. सत्तेच्या भरोश्यावर जीवनभर केलेली पापं कसे धुता येते.  याचे प्रमाण/ सबुत गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पहायला मिळते. तेव्हा सत्तेचे महत्त्व धनगरांनी समजून घेवूनच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे.
           सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे. किंवा येणाऱ्या भावि काळात लवकरच त्या होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय समजले जाते. यामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर छोट्या का होईना सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सत्तेचा फायदा जमातीला होवू शकतो. भावी काळात निर्माण झालेले जिल्हा परिषद मधील धनगर  नेतृत्वाच्या जाळ्याच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पैकीच काही विधानभवनात आमदार, संसदेत खासदार  म्हणून नक्कीच पाठविता येतील.
     उभरत्या धनगर नेतृत्त्वाला परस्पर सहकार्याने आपला स्वत:चा तसेच जमातीचा राजकीय विकास करता येईल. राजकीय सत्तेपासून वंचित असलेली, हेतूपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या गेलेली धनगर जमात राजकीय प्रवाहात येईल. दिवसेंदिवस जमातीची चाललेली राजकीय परवड, पडझड थांबविता येईल. तुमच्या छोट्याच्या प्रयत्नातून धनगर राजकीय अस्मितेचे पुनर्जागरण झाल्याशिवाय राहणार नाही.
               म्हणून धनगर असाल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनगर उमेदवार दिसेल तिथे, त्यालाच मतदान केल्या शिवाय राहू नका. "विसरून सारे भेद- धनगर सारा एक" या म्हणीप्रमाणे एक जीवाने संघटित होऊन तन-मन-धनाने मतदान करून सर्वांना प्रोत्साहित करून भावी धनगर नेतृत्वाचे पाय मजबूत करा....
वैचारिक मतभेद का असेना रक्ताचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवा.  जिल्हा परिषद,पंचायत समितीतून, ग्रामपंचायत मधून धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि राजकीय अस्मितेचे पुनर्भरण करा.
    त्यावेळी लक्षात ठेवा!!! मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पासूनच होत असते. थेंबा थेंबाने तळे साचत असते. शतकांपासून गमावलेली राजकीय अस्मिता पुनर्जीवित करण्यासाठी कदाचित पुढील शतक सुद्धा लागण्याची शक्यता असेल.  परंतु या कार्याची सुरुवात करणारे तुम्हीच असाल. म्हणून जगायचं तर स्वतःसाठी!! स्वतःच्या माणसांसाठी!! स्वतःच्या राजकीय अस्मितेसाठी!! स्वतःच्या भावी पिढ्यांच्या सुंदर जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवस्था परिवर्तनासाठी!!! 
    उठा!! जागे व्हा!! जागवा आणि मतदान करा!! आपल्यासाठी!! आपल्याच माणसांना!! आपल्या सर्वांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!
,
खूप खूप शुभेच्छा!!!

अरे!
उष:काल होता होता,काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......

___________________________&__
जय यशवंतराव !! जय मल्हार

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३